‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या संकटाची खात्री सगळ्यांनाच पटल्यामुळे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, विविध देशांतले ट्रस्ट वगैरे अनेकांना पर्यावरणासाठी ‘काही तरी’ करायचं असतं. तसे प्रयत्न जे कोणी करतील त्यांना बक्कळ आर्थिक साह्य मिळतं. तरीही पृथ्वीची तडफड थांबत नाही…

त्रकारितेत आलो तेव्हापासून दोनचार शब्दप्रयोगांचा वापर सातत्यानं सुरू आहे. ‘ग्रीनहाऊस गॅसेस’, ‘पृथ्वीभोवतीचा ओझोन थर’ आणि ‘क्लोरोफ्लुरोकार्बन्स’. त्या वेळी या विषयावर ‘आकाशवाणी’वर बरेच कार्यक्रम केले. जयंत एरंडे यांच्याकडे नुकतीच मुंबई आकाशवाणीची धुरा आलेली. विज्ञान विषयावर बरंच काही करायची त्यांची इच्छा आणि आपली विज्ञान पार्श्वभूमी दाखवण्याची आम्हा काहींची हौस असं ते समीकरण छान जुळलं. सुरुवातीच्या धडपडत्या काळात या विषयांनी बराच हात दिला. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द फॅशनेबल होण्याआधीचा हा काळ!

पुढे काय झालं हे नव्यानं सांगायची गरज नाही. ‘ग्लोबल वॉर्मिंग’चं गांभीर्य हळूहळू सगळ्यांना समजलं. नंतर हा विषय प्रत्येक जागतिक कार्यक्रमपत्रिकेत पहिल्या क्रमांकावरचा झाला. वसुंधरेच्या वाढत्या तपमानानं जगाची झोप उडवली. कर्ब उत्सर्जन थांबवायचं जाऊ द्या… ते कमी कसं करता येईल, आपल्या घरातले रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर वगैरेतून बाहेर येणारे क्लोरोफ्लुरोकार्बन्स कमी कसे करता येतील यावर साऱ्या जगाची चर्चा सुरू आहे. पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर अधिक पातळ होणार नाही यासाठी काय काय करायला हवं यासाठी आता परिषदा झडतायत. शास्त्रज्ञ विविध मार्ग सुचवतायत वगैरे असं बरंच काही सुरू आहे. थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे काही नरपुंगव सोडले तर सगळ्यांनाच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि त्यामुळे समोर आ वासून उभ्या ठाकलेल्या संकटाची खात्री पटलीये.

या सगळ्यात- म्हणजे पृथ्वीचं तापमान वाढवण्यात- एका घटकाचा वाटा फारच महत्त्वाचा आहे असं लक्षात आलं. कर्ब. म्हणून ज्याच्या ज्याच्यातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो त्या सगळ्यांचा वापर कमी करायचा, अशी जागतिक टूम निघाली.

हेही वाचा >>> भूगोलाचा इतिहास : चक्रीवादळ २

यात सगळ्यात पहिल्या क्रमांकावर होते हायड्रोकार्बन्सचे घटक. म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, नाफ्ता, डांबर, इत्यादी. साहजिकच या सगळ्यांसाठी पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. मग कोणी म्हणालं इथेनॉल अधिकाधिक वापरा. कोणी म्हणालं हायड्रोजन हे पुढचं इंधन आहे. सौर-ऊर्जाप्रेमी तर सगळ्यात चेकाळले. यांच्यापैकी कोणी घराच्या गॅलरीत सौरचुलीवर शेंगदाणे, रवा वगैरे भाजलेला असतो. अधिक प्रगतिशील असतात त्यांच्या शेतघरी किंवा गावाकडच्या घरी ‘सोलर हीटर’वर पाणी गरम होत असतं. त्यामुळे सौर ऊर्जा हा सगळ्या इंधन समस्येवरचा रामबाण इलाज आहे यावर त्यांची खात्री पटलेली असते. पेट्रोल, डिझेलच्या बरोबरीने आणखीही एक इंधनप्रकार बंद करायला हवा, यावर या सगळ्यांचं एकमत असतं.

तो प्रकार म्हणजे कोळसा. कोळसा नकोच आपल्याला, असंच या सगळ्यांचं म्हणणं असतं. त्या ओंगळ खाणी, परिसरात पसरणारी खाणीतली धूळ आणि एकंदरच होणारी खाण परिसराची धूळधाण त्यांना अस्वस्थ करत असते. तसं त्यांचं बरोबरही असतंच. त्यात आता तर आपण ‘२०३० सालापर्यत आपल्या ऊर्जा गरजांचा ५० टक्के वाटा हा कर्बशून्य मार्गांतून भागवू’ अशी प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणजे पुढल्या फक्त सहा वर्षांत हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आपला निर्धार आहे. परत २०७० पर्यंत आपल्या पंतप्रधानांनी देशास ‘कार्बन न्यूट्रल’ करण्याची घोषणा केलीये. त्यामुळेही अनेकांच्य स्व-अभिमानात भर पडलीये. अर्थात या अभिमानधारींतील अनेकांना ‘कार्बन न्यूट्रल’ म्हणजे काय, हे कदाचित माहीत नसेल. पण अभिमान बाळगायला काही माहिती असावी लागते असा कुठे नियम आहे? या उद्दिष्टपूर्तीसाठी पुढच्या ४०-४५ वर्षांत आपल्याला आपल्या विद्यामान सौर आणि पवन ऊर्जा क्षमतेत तब्बल ७० पटींनी वाढ करावी लागणार आहे. ती झाली तर या मार्गांनी होणारी वीज ७७०० गिगावॉट इतकी होईल. (वॉट हे ऊर्जा मापनाचं एकक. एक हजार वॉट म्हणजे एक किलोवॉट, १० लाख वॉट्स म्हणजे एक मेगावॉट आणि १०० कोटी वॉट्स म्हणजे एक गिगावॉट). तर २०७० पर्यंत ७,७०,००० वॉट इतकी महाऊर्जा आपण पर्यावरणस्नेही मार्गांनी निर्माण करू शकू, असा आपला पण आहे. आणि ‘…तो मुमकीन है’ अशी आपली खात्री असल्यानं या शक्याशक्यतेची चर्चा करायची गरजच काय? परत; कोळसा जाळून जगात सर्वाधिक प्रदूषित वीज निर्माण करणाऱ्यालाच हरित ऊर्जा निर्मितीचीही कंत्राटं आपल्याकडे मिळतायत हे तरी आपल्याला कुठे कळून घ्यायचंय हा मुद्दा आहेच. पण प्रश्न हा नाही.

तो आहे पर्यायी, पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांसाठी शोधले जात असलेले वेगवेगळे पर्याय. या सगळ्यांचा प्रयत्न एकच आहे. वसुंधरेचं वाढतं तापमान रोखा…! यासाठी जो कोणी प्रयत्न करताना दिसेल त्याला विविध जागतिक संस्थांकडून बक्कळ आर्थिक साहाय्य वगैरे मिळतं. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, विविध देशांतले ट्रस्ट वगैरे अनेकांना पर्यावरणासाठी ‘काही तरी’ करायचं असतं आणि आपल्याला जमत नसेल तर जो कोणी असं काही तरी करतोय त्याला ‘फूल ना फुलाची पाकळी’ म्हणून मदत करायची असते. जगभरातल्या बँकांत या अशा पाकळ्यांचा नुसता खच पडलाय. पर्यावरण रक्षणार्थ काही तरी करणाऱ्यांसाठी ‘देता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था आहे. आणि काय काय करतायत अभियंत्रे, तंत्रज्ञ, वैज्ञानिक वगैरे मंडळी या क्षेत्रात! कोणी बायो डिझेलचा उपाय सुचवतंय, कोणी साध्या आपल्या एरंडाच्या तेलाचं रूपांतर कसं इंधनात करता येईल ते सांगतोय, वापरून झाल्यावर उरतं त्या खायच्या तेलापासून इंधन बनवण्याचा प्रकल्पच कोणी सुरू करतंय, त्यासाठी गावभरातल्या घराघरातनं तळणीचं राहिलेले तेल गोळा करण्याच्या योजना आखल्या जातायत, सोबत बायोगॅस आहेच, ग्रीन हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या संयुगातून एक ज्वलनशील इंधनयोग्य नवं केरोसिन तयार करतंय कोणी, शिवाय मका/ रताळं/ बटाटे वगैरेंपासून इथेनॉल तयार केलं जातंय, कोणी शुद्ध इथेनॉलवर विमान उडवतंय तर कोणी हायड्रोजनवरच्या मोटारी चालवून दाखवतंय…! या संदर्भात किती आणि काय सांगावं असा प्रश्न पडेल इतकं सगळं सुरू आहे. यातल्या बहुतांश प्रकल्पांवर हजारो डॉलर्स अनुदानाची खैरात होतीये!

असे किती प्रकल्प, किती पर्यायी ऊर्जास्रोतांच्या यशाचे दावे गेल्या काही वर्षांत केले गेले असावेत?

विविध सरकारं, खासगी उद्योजक, पर्यावरणवादी संस्था इत्यादींकडून ‘हे वसुंधरेस हमखास वाचवणार’ असे दावे करून सादर केल्या गेलेल्या प्रकल्प/ प्रयोगांची संख्या आहे तब्बल १५०० इतकी. विज्ञान विषयाला वाहिलेल्या ‘सायन्स’ या विख्यात प्रकाशनानं गेल्या महिन्यात या बाबतचा एक निबंधच प्रसिद्ध केलाय. पण हे १५०० प्रकल्प /प्रयोग इतक्यापुरताच हा प्रश्न नाही. कारण भलं होत असेल तर अधिक भलं होणं केव्हाही चांगलंच. पण यात मेख अशी आहे की या १५०० पैकी फक्त ६३ इतकेच प्रकल्प काही अंशी तरी उपयोगी ठरलेत. अलीकडेच ‘द गार्डियन’नं या संदर्भात वृत्तान्त छापला. याचा अर्थ असा की पर्यावरण या विषयावर, पृथ्वीचं वाढतं तापमान कसं कमी होईल यावर बरेच काही उपाय योजले जात असले तरी त्यातले अगदी मोजके काही प्रमाणात परिणामकारक ठरलेत. पृथ्वीची तडफड तशीच सुरू आहे. आजचे पत्रकारितेचे विद्यार्थीही तीच, तशीच भाषणं करतायत.

म्हणजे बाकी सगळी नुसती चर्चाच! पण अलीकडे प्रत्यक्ष यश-अपयश मोजण्यापेक्षा केवळ प्रयत्नांच्या घोषणेलाच ‘यश’ मानायची पद्धत रूढ झालेली आहे. आभास हेच वास्तव.

पूर्वी अमिन सयानी आकाशवाणीवर कार्यक्रमाची सुरुवात करताना साद घालायचे. ‘‘आवाज की दुनिया के दोस्तो…’’. आज असते तर त्यांनी साद घातली असती… ‘‘आभास की दुनिया के दोस्तो…’’

girish.kuber@expressindia.com

@girishkuber