राज्यातील शहरांचा आकार वाढत असताना त्या तुलनेत नागरी सुविधा पुरविण्यात महानगरपालिका कमी पडत असल्याची सार्वत्रिक तक्रार केली जाते. राज्यात २०११च्या जनगणनेनुसार ४५ टक्के नागरीकरण झाले होते. त्यानंतरचा गगनचुंबी झपाटा लक्षात घेता गेल्या दशकभरात ६० टक्क्यांच्या आसपास भागाचे नागरीकरण झाल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा पुरविण्यात स्थानिक स्वराज्य संस्था कमी पडताहेत. मुंबई, पुणे वा ठाण्यासारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी किमान निधी उपलब्ध असतो. छोट्या महानगरपालिकांची तर बोंबच असते. नगरपालिकांची अवस्था आणखी वाईट. शहरांचा कारभार बघण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती अशी त्रिस्तरीय रचना आहे. महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत, असा नेहमीचा सूर असतो. पण सध्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था परावलंबी झाल्या आहेत. वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यापासून जकात कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर असा महानगरपालिकांचा हक्काचा आर्थिक स्राोत बंद झाला. जकातीमुळे पालिकांकडे रोख जमा होत असे. जकात वा अन्य कर बंद झाल्याबद्दल राज्य शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईवर महापालिका व नगरपालिकांचा कारभार सुरू आहे. मालमत्ता कर वसुलीवर सारी मदार; पण ती करणार किती? मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणांवर सुरू असलेल्या बांधकामांमुळे पालिकांच्या तिजोरीत भर पडत आहे. इमारतींच्या बांधकामाकरिता विकासकांना पालिकांना विकास नियोजन शुल्क (प्रीमियम) भरावे लागते. मुंबई महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्षात ५८०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते, पण डिसेंबरअखेर- म्हणजे एक तिमाही आधीच- त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाली. परिणामी, पुढील आर्थिक वर्षात १० हजार कोटींच्या आसपास निधी इमारतींच्या बांधकामांतून जमा होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील श्रीमंत महानगरपालिका. पण इथेही राज्य शासनाकडून मिळणारी सुमारे १४ हजार कोटींची नुकसानभरपाईची रक्कम महत्त्वाची ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा