आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताने रविवारी न्यूझीलंडला हरवून या स्पर्धेचे अजिंक्यपद विक्रमी तिसऱ्यांदा पटकावले. ५० षटकांच्या पुरुष विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा असला, तरी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये भारताचे प्रगतिपुस्तक त्या देशापेक्षा सरस ठरते. २०१३ पासून सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ धडकला. २०१३ मध्ये आपण अजिंक्य ठरलो, २०१७ मध्ये अंतिम लढतीत पाकिस्तानशी हरलो. यंदा न्यूझीलंडचे कडवे आव्हान मोडून काढत आपण बाजी मारली. अशा रीतीने २००२, २०१३ आणि २०२५ अशा तीन स्पर्धांमध्ये भारताने अजिंक्यपद मिळवले. ऑस्ट्रेलियाला आजवर ही स्पर्धा दोनदाच जिंकता आली. सहसा तो संघ मैदानावर सातत्यपूर्ण कामगिरीचे उच्च मानदंड निर्माण करतो असे मानले जाते. या पार्श्वभूमीवर भारताच्या कामगिरीला दाद द्यावी लागेल. कारण कमालीचे सातत्य आपणही दाखवत आहोतच. कसोटी अजिंक्यपद, एकदिवसीय विश्वचषक, टी-ट्वेण्टी विश्वचषक आणि आता चॅम्पियन्स करंडक अशा सलग चार आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक. दोहोंत अजिंक्यपद आणि दोहोंमध्ये उपविजेतेपद. विश्वचषकातील पराभव, मध्यंतरी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये दारुण पराभव, नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरने केलेली वादग्रस्त विधाने, त्याच्या नियुक्तीस असलेली वादग्रस्त राजकीय किनार या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा, तसेच विक्रमवीर फलंदाज विराट कोहली यांच्या वर्तमान आणि भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. पण क्रिकेटच्या बाबतीत एक वैश्विक चिरंतन सत्य म्हणजे, आपल्याविषयीच्या किन्तु-परंतुला मैदानावरील कामगिरीनेच चपखल उत्तर द्यायचे असते. गतवर्षी टी-ट्वेण्टी विश्वचषक आणि आता चॅम्पियन्स करंडक अशा दोन अजिंक्यपदांच्या माध्यमातून तसे उत्तर रोहित शर्माने दिले आहेच.
या भारतीय संघाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फिरकी गोलंदाजांची कामगिरी. रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या चौकडीने सत्तरच्या दशकातले भारताचे सोनेरी दिवस जिवंत केले. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीने केलेले पुनरागमन भारतासाठी आशादायी ठरले. पुढील जून महिन्यात इंग्लंडविरुद्ध खडतर कसोटी मालिकेसाठी बुमरा-शमी ही तेज जोडगोळी लयीत असणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. रोहित आणि विराटने या स्पर्धेत काही चांगल्या खेळी केल्या. तरी श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांचे योगदान नजरेआड करण्यासारखे नाही. पाकिस्तानविरुद्ध, तसेच ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे उपान्त्य आणि अंतिम सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करताना मोक्याचे फलंदाज बाद झाले, तरी श्रेयस, राहुलसारख्यांनी जबाबदारी व्यवस्थित निभावली.
भारतासाठी सोयीस्कर वेळापत्रक जय शहा यांच्या आधिपत्याखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने मुद्दाम आखले, या काही वर्तुळांमध्ये झालेल्या टीकेचे गालबोट मात्र आपल्या विजयाला नक्कीच लागले. टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्याला हवे तसेच करायचे, की टीकेची दखल घेऊन जरा विनम्रता दाखवायची हे आपले आपण ठरवायचे आहे. गतवर्षी टी-ट्वेण्टी विश्वचषकादरम्यान त्या सामन्यांचे वेळापत्रक भारतातील टीव्ही प्रेक्षकांसाठी आखले गेल्याची टीका झाली, ती सर्वस्वी अनाठायी नव्हती. या वेळी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्या देशात सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाठवला जाणार नाही, हे आपल्या क्रिकेट बोर्डाने केंद्र सरकारचा हवाला देऊन आधीच स्पष्ट केले. यासाठी मग संमिश्र प्रारूप (हायब्रिड मॉडेल) राबवले गेले. म्हणजे भारताचे सर्व सामने दुबईत, अंतिम सामन्यात भारत असेल तर तोही सामना दुबईत आणि इतर सर्व सामने पाकिस्तानात खेळवण्याचे ठरले. वास्तविक रोहित, विराटसारख्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंचे निस्सीम चाहते पाकिस्तानातही आहेत. तेव्हा अंतिम सामना तेथे खेळण्याविषयी विचार व्हायला हवा होता. दुसरी बाब म्हणजे, दुबईतील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस आणि मग फिरकी उत्तम खेळू शकणाऱ्या फलंदाजी फळीस पोषक होती. पक्षी- भारतालाच! या आरोपाचा प्रतिवाद आपण फार सशक्तपणे करू शकलेलो नाही. सध्याच्या भारतीय संघाची सामूहिक प्रतिभा पाहता आपण कोणत्याही परिस्थितीत खेळण्यास सिद्ध आहोत. पण अशा प्रकारे निष्कारण टीकेची संधी दिली नसती तर या विजयाची खुमारी अधिक वाढली असती.