अक्साई चीन हा भारताचा भूभाग १९६२ मधील युद्धानंतर चीनने व्यापला. अरुणाचल प्रदेशाला चीन दक्षिण तिबेट असे संबोधतो. या वर्षी एप्रिल महिन्यात अरुणाचलमधील ११ स्थळांचे एकतर्फी चिनी नामकरण त्या देशाने केले होते. आता चीनने नुकत्याच जारी केलेल्या त्यांच्या ‘अधिकृत’ नकाशामध्ये अक्साई चीन आणि अरुणाचल हे चीनचे प्रदेश म्हणून दाखवण्यात आले आहेत. चीनतर्फे जारी ‘अधिकृत नकाशा’मध्ये तैवान आणि दक्षिण चीन समुद्राच्या काही भागावरही चीनचे स्वामित्व दाखवल्याचे आढळून आले. त्याबद्दल तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, ब्रुनेई आदी देशांनी आक्षेप नोंदवलेला आहे. तसा तो भारतानेही यथास्थित नोंदवला. चीनने बुधवारीच याविषयी निवेदन जारी करून, नकाशे प्रसृत करणे हा नित्याचाच भाग असल्याचे आणि त्यावरून उठलेला वाद अनाठायी असल्याचे म्हटले आहे. चीनचा हा ‘नवनित्य’ पवित्रा तीन वर्षांपूर्वीच्या गलवान चकमकीनंतर अधिक उग्र बनला आहे. त्यावर फुटकळ उपयोजनांवर बंदी आणण्यापलीकडे प्रतिसाद म्हणून आपण काही ठोस करू शकलेलो नाही हे वास्तव स्वीकारावे लागते. चीनच्या ताज्या पवित्र्याबाबत कुतूहलाचा भाग म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ‘ब्रिक्स’ बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात प्रत्यक्ष ताबारेषेवरून सैन्यमाघारीचे प्रयत्न करण्याविषयी मतैक्य झाल्याचे भारताने म्हटले होते. येत्या दहा दिवसांत हे दोन नेते नवी दिल्लीत जी-२० समूहाच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पुन्हा भेटणार आहेत. ब्रिक्समधील वरकरणी काही क्षणांच्या भासलेल्या भेटीदरम्यान नेमके काय घडले याविषयी प्रसृत भारतीय आणि चिनी निवेदनांमध्ये तफावत आढळली. बालीमध्ये गतवर्षी झालेल्या भेटीदरम्यानही संघर्ष निवळण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याविषयी मतैक्य झाल्याचे चीनने अलीकडे सांगितले आणि ‘तसेच काहीसे’ झाल्याचे भारताला मान्य करावे लागले. तरीही चीनच्या वागण्यात फरक पडलेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा