मोहिनीअट्टम नृत्यांगना, त्या नृत्यप्रकारातील गुरू आणि महत्त्वाचे म्हणजे या नृत्यप्रकाराला विद्यापीठीय शिस्त देणाऱ्या विदुषी ही कनक रेळे यांची ओळख काहींना त्यांच्या निधनवार्तेतूनच झाली असेल, पण मुंबईतले ‘नालंदा नृत्य संशोधन केंद्र’ आणि ‘नालंदा नृत्य महाविद्यालय’ या संस्था बहुतेकांना माहीत असतात.. या संस्था हीसुद्धा कनक रेळे यांची निर्मिती! संस्था स्वकेंद्रित न ठेवता तिचा सांधा मुंबई विद्यापीठाशी जोडणे, बी. ए. पासून पीएच.डी.पर्यंतची तजवीज तेथे करणे आणि स्वत: मोहिनीअट्टमच्या इतिहासाबद्दल पीएच.डी. मिळवणे यामागील रेळे यांची दृष्टी आधुनिकतेचा आदर्श ठरणारी आहे. गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोरांच्या काळात ‘शांतिनिकेतन’ मध्ये मामांकडे व्यतीत केलेले बालपण, तेथील शिक्षणाचा संस्कार घेऊन पुन्हा मुंबई आणि मग नृत्यशिक्षणाला लग्नानंतरही अंतर न देणे असा कनक रेळे यांचा प्रवास हा आधुनिकतेच्या कर्त्यां पिढीतल्या व्यक्तीचा प्रवास आहे. त्या काळच्या सधन कुटुंबातला त्यांचा जन्म, त्यामुळे मुलीच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, उच्च शिक्षणासाठी तिला परदेशात पाठविणे या आधुनिकतावादाचाही लाभ त्यांना झाला. मँचेस्टर विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उच्चशिक्षण त्यांनी घेतले होते. या आधुनिकतेची अभिव्यक्ती नृत्यप्रकारातून करताना मात्र अभिजाततेला अंतर द्यायचे नाही, हे पथ्य रेळे यांनी नेहमीच पाळले. ‘नालंदा’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षांत (२०१६) दिल्लीच्या बलात्कार-प्रकरणातील ‘निर्भया’साठी काही करावेसे वाटले, स्त्रीवरला अन्याय नृत्यातून समोर आणण्याचे ठरले, तेव्हाही महाभारतातील पाच स्त्रियांवर आधारित नृत्यप्रयोगच त्यांनी केला. नृत्यपरंपरेच्या मर्यादेत राहून त्यांनी नवनव्या गान-संहिता शोधल्या आणि त्यावर नृत्यप्रयोग केले. के. एन. पणिक्कर यांच्यासारखे समकालीन कवी-नाटककार त्यासाठी प्रेरक ठरले. अर्थात, अन्य नृत्यप्रकारांतील त्यांच्या नंतरच्या पिढीतील नृत्यांगनांनी (उदाहरणार्थ : भरतनाटय़म- मालविका सरुक्काई) गद्यकाव्यावरही नृत्याचा प्रयोग केला, तितक्या पुढे डॉ. रेळे गेल्या नाहीत हेही खरेच. बहुधा इथे, परंपरा आणि विद्यापीठीय शिस्त निराळय़ा काढता येणार नाहीत याची जाणीव रेळे यांना झाली असावी. तरीही, प्रयोगशील राहणाऱ्या नृत्यगुरूंच्या पहिल्या पिढीत त्यांचे नाव आदराने घेतले जाईल एवढे नक्की. आधी कथकली, मग भरतनाटय़मचे रीतसर शिक्षण कनक यांनी घेतले होते, परंतु यतीन्द्र रेळे यांच्याशी विवाह झाल्यानंतर, वयाच्या २८ व्या वर्षी त्यांनी मोहिनीअट्टम शिकणे सुरू केले. ‘नालंदा’ची स्थापना झाली, तेव्हा त्या वयाची पस्तिशी गाठत होत्या. यापुढले शिक्षण हे जुन्याचे संशोधन आणि त्याचे विद्यापीठीय पद्धतीने संधारण, असे त्यांनी ठरवले आणि नृत्याचा रीतसर अभ्यासक्रम तयार केला. मात्र त्यांच्या ‘पीएच.डी.’वर काही हितशत्रूंनी आक्षेप घेतले होते, ही पदवी ‘खोटी’ आहे, असे आरोप झाले होते. तेव्हा भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक, इतिहासकार कपिला वात्स्यायन यांनी डॉ. कनक रेळे यांची बाजू मांडली होती. आधुनिकतावादी दृष्टिकोन जपून भारतीयत्व टिकवणाऱ्या पिढीच्या महत्त्वाच्या प्रतिनिधी, म्हणून इतिहासात डॉ. रेळे यांची नोंद राहील.