पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ठरावीक मंत्री वगळता अन्य मंत्र्यांचे तसे अस्तित्वच जाणवत नाही. भाजप आणि प्रसिद्धी हे खरे तर जुने समीकरण; पण सध्याचे मंत्री उगाच नेतृत्वाची खप्पामर्जी नको म्हणून प्रसिद्धीपासून चार हात लांबच राहणे पसंत करतात. तरीही काही मंत्री त्यांच्या वक्तव्यांवरून वादग्रस्त ठरतात. अशा बोलघेवडय़ा मंत्र्यांपैकी किरेन रिजिजू एक. विधि व न्यायमंत्रीपदी असताना थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात जाहीर वक्तव्ये करून त्यांनी इतके वाद ओढवून घेतले की, रिजिजू स्वत:हून बोलतात की त्यांचा बोलविता धनी दुसराच, अशीही चर्चा न्यायपालिकांच्या वर्तुळात घडू लागली. रिजिजू यांचा वारू जणू काही चौफेर उधळला असतानाच त्यांच्याकडील विधि व न्याय हे खाते काढून घेण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनातून आलेल्या आदेशामुळेच रिजिजू यांच्या खात्यात बदल झाल्याचे समजले. खातेबदलात चांगले खाते मिळाल्यास ती बढती समजली जाते. पण तुलनेत कमी महत्त्वाच्या खात्याचा पदभार सोपविल्यास ती एक प्रकारे शिक्षा मानली जाते. विधि व न्याय खात्याचा पदभार काढून पृथ्वी विज्ञान या विभागाचा पदभार सोपविण्यात आल्याने रिजिजू यांचे पंख कापले गेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा