‘तीन पिढय़ांचा तमाशा’ या संपादकीयामध्ये लक्ष्मणराव फाटक यांच्या भागीदारावर चिखलफेक केलेली आहे ती ‘लोकसत्ते’ला शोभेशी नाही. वालचंद हिराचंद हे जैन होते म्हणजे अमराठी होते असे जे ध्वनित केले आहे ते चूक आहे. वालचंद हिराचंदांचे कुटुंब त्यांच्याआधी चार पिढय़ा महाराष्ट्रात स्थायिक होते आणि वालचंद हे मराठी माध्यमातूनच शिकलेले होते. त्यांची मातृभाषा, घरी बोलली जाणारी भाषा मराठीच होती, गुजराती नव्हे. त्यांचे वडील हिराचंद नेमचंद हे जैन समाजातील पहिले पत्रकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात, केसरीनंतर फक्त चार वर्षांनी, सुरू केलेले ‘जैन बोधक’ हे मराठी नियतकालिक आजही सुरू आहे. याउलट कल्याणी किंवा किर्लोस्कर हे तर कानडी होते. आजही वालचंद समूहाचे कार्यालय महाराष्ट्रात आहे, किर्लोस्कर बंगळूरूला गेले. फाटक हे ब्राह्मण होते असे आपण लिहिले का? नाही, तर मग वालचंद हिराचंद हे जैन होते आणि त्यांनी भागीदारी करून फाटक यांना फसवले असे का ध्वनित करावे? टाटा, म्हैसूरचे महाराज, शिंदे सरकार अशांशी भागीदारी करूनच वालचंद यांनी पृथ्वी (कार कारखाना), जल (जहाजबांधणी आणि वाहतूक) आणि आकाश (हिंदुस्थान एरोनॉटिक्स हा विमानबांधणीचा कारखाना) असे तिन्ही आपल्या कर्तृत्वाने पादाक्रांत केले होते. वालचंद यांच्यावर अमराठी असल्याचा आरोप त्यांच्या हयातीतच झाला होता. पण त्या सभेतच त्यांनी वाचलेल्या मराठी पुस्तकांची आणि त्यांना अवगत असलेल्या मोडी लिपीचीही साक्ष देऊन बोलणाऱ्यांची तोंडे बंद केली होती. मराठीतील पहिला शिलालेख हा श्रवणबेळगोळच्या बाहुबली मूर्तीवर आहे आणि मराठी जैन साहित्य हे ज्ञानेश्वरीइतकेच जुने आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा