एल. के. कुलकर्णी
अभि क्रंद स्तनय गर्भं धा उदन्वता परिदिया रथेन दृतिं सुकर्ष विषितं न्यंच समा: भवन्तूद्वतो निपादा: ।।

(भावार्थ – (हे पर्जन्यदेव) पृथ्वी सन्मुख होऊन गर्जना करा. औषधीत गर्भा (जल)ची स्थापना करा. जलयुक्त रथाच्या सर्व बाजूंनी प्रदक्षिणा करा. विशिष्ट प्रकारे बंदिस्त असलेल्या जलपात्राचे मुख खालच्या दिशेने करून जल मुक्त करा. )

ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलात पर्जन्यसूक्त ही प्रार्थना आहे. माणूस शेती करू लागला आणि मग पावसाची वाट पाहणे त्याच्या नशिबी आले. प्रार्थना हे त्या दिशेने पहिले पाऊल होते. ख्रिाश्चन, मुस्लिमांतही पावसासाठी प्रार्थना आहेत. पर्जन्ययाग, आदिम समूहांची पर्जन्यनृत्ये हाही अशा प्रयत्नांचाच एक आविष्कार. पावसासाठी प्रार्थनेपासून ते कृत्रिम पर्जन्यापर्यंतचा इतिहास रंजक तसाच उद्बोधक आहे.

हेही वाचा : अन्वयार्थ: ‘फेडरल रिझर्व्ह’ने करून दाखवले!

मानवी प्रयत्नांनी ढगातून पाऊस पाडणे म्हणजे कृत्रिम पर्जन्य होय. पाऊस ढगातून पडतो. पण हजारो वर्षे ढगांपर्यंत पोहोचणे माणसाला शक्य नव्हते. तोफांचा शोध लागल्यावर उंच आकाशात काही फेकणे माणसाला शक्य होऊ लागले. पूर्वी युरोपात असा समज होता, की विजेच्या कडकडाटामुळे ढगातून पाऊस पडतो. युरोपातील सप्तवार्षिक युद्ध, नेपोलियनची युद्धे, अमेरिकेतील यादवी युद्धे यानंतर पाऊस पडल्याच्या अनेक घटना सांगितल्या जात. यामुळे अनेक शहरांत पावसासाठी तोफांचे बार केले जाऊ लागले. एकोणिसाव्या शतकात अमेरिकन सैन्यातील रॉबर्ट डायरेन्फोर्थ हे ‘रेन मेकर’ म्हणून ओळखले जात. वरील प्रकारे टेक्सासमध्ये पाऊस पाडण्यासाठी नऊ हजार डॉलर्सची स्फोटके विकत घेण्यात आली होती. पण डायरेन्फोर्थ यांच्या निगराणीखाली झालेले ते प्रयोग निष्कर्षहीन ठरले. १८९१ मध्ये जर्मन संशोधक लुई गाथमन यांनी असे सुचवले की पावसाच्या ढगात द्रवरूप कार्बन डाय ऑक्साइड फवारल्यास पाऊस पडेल. १९०३ मध्ये ल्युक हॉवर्ड यांचे ढगांचे वर्गीकरण प्रकाशित झाले व ढगांचे स्वरूप समजू लागले. १९३० च्या दशकात बर्गेरॉन – फिंडसेन नावाची प्रक्रिया शोधली गेली. त्यानुसार ढगात अतिशीत पाण्याचे थेंब असतात. शून्य ते – ४० अंश से. पर्यंत द्रवरूपात असणारे पाणी म्हणजे ‘अतिशीत पाणी’ होय. शून्य अंशापेक्षा कमी तापमान असणाऱ्या ढगात अतिशीत पाणी असते. असे अतिशीत जलबिंदू गोठण केंद्राच्या संपर्कात आले, तर ढगात हिमस्फटिक व अतिशीत जलबिंदूचे मिश्रण तयार होते. ते जलबिंदू हिमस्फटिकाभोवती साकळून पाण्याचे थेंब बनतात व ते पुरेसे मोठे व जड झाले की पाऊस पडतो. तात्पर्य ज्यात पुरेसे अतिशीत जलबिंदू आहेत, त्या ढगात गोठणकेंद्रके ( Freezing nuclei) पोचली तर पाऊस पाडणे शक्य होते. १९३६ मध्ये जपानी शास्त्रज्ञ युकिशिरो नकाया यांनी सर्वप्रथम कृत्रिम हिमवृष्टीचा पहिला प्रयोग केला होता. इरविंग लँगमुर हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ. ते अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीत असताना व्हिन्सेंट शिफर हे त्यांचे संशोधक साहाय्यक होते. त्या दोघांनी बर्गेरॉन – फिंडसेन प्रक्रिया पडताळून पाहिली. त्याच काळात शिफर यांनी जुलै १९४६ मध्ये कृत्रिम पर्जन्य किंवा ढगपेरणीचे ( Cloud seeding) तंत्र शोधले, तोही एक किस्साच आहे. ‘जनरल इलेक्ट्रिक’च्या प्रयोगशाळेत गोठणकेंद्रक म्हणून मीठ, टाल्कम पावडर, माती इ. वापरून शिफर अतिशीत ढगात स्फटिक निर्मितीचे प्रयोग करीत होते. त्यासाठी डीप फ्रीजमध्ये अतिशीत ढग तयार करण्याचा प्रयत्न चालू होता. एक दिवस प्रयोग करताना डीप फ्रीज पुरेसे थंडच होत नाही हे पाहून शिफर थोडे त्रस्त झाले. फ्रीज अधिक थंड करण्यासाठी त्यांनी त्यात थोडा कोरडा बर्फ (घनरूप कार्बन डाय ऑक्साइड) टाकला. आणि अचानक डीप फ्रीजमध्ये अतिशीत ढग व त्यात असंख्य हिमस्फटिक व जलबिंदू तरंगताना दिसू लागले. अनपेक्षितरीत्या त्यांना ‘ढगपेरणी’ म्हणजेच कृत्रिम पर्जन्याचे तंत्र सापडले होते. तो दिवस होता १४ जुलै १९४६. महिन्याभरातच शिफरचा सहकारी बर्नार्ड व्होनेगट याने सिल्वर अयोडाईड वापरून ढगपेरणी करण्याची पद्धत शोधून काढली.

कृत्रिम पर्जन्याचा पहिला प्रयोग १३ नोव्हेंबर १९४६ रोजी अमेरिकेत करण्यात आला. एका ढगावर अडीच किलोग्राम शुष्क बर्फाची फवारणी करून शिफर यांनी माउंट ग्रेलॉक इथे हिमवृष्टी साध्य केली. पुढे जगभर विविध देशांत ढगपेरणीद्वारे कृत्रिम पर्जन्याचे प्रयत्न करण्यात येऊ लागले. पर्जन्यास अनुकूल अशा ढगातूनच कृत्रिम पर्जन्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यात फवारण्याचे (पेरणीचे) रसायन ढगांच्या तापमानावर अवलंबून असते. शून्य अंश से. पेक्षा अधिक तापमान असणाऱ्या ढगात अमोनियम नायट्रेट व युरिया यांचे मिश्रण फवारण्यात येते. तर शून्य अंश से. पेक्षा कमी तापमान असणाऱ्या ढगात कोरडा बर्फ किंवा सिल्व्हर आयोडाइडची भुकटी फवारली जाते. कृत्रिम पर्जन्यासाठी कोरडा बर्फही पेरणी घटक म्हणून वापरतात. रसायनांची फवारणी सामान्यत: विमानातून केली जाते. जमिनीवरूनही जनरेटर्स नावाच्या तंत्राद्वारे उंच ढगात बीजारोपण केले जाते. पण त्या तंत्राचा वापर कमी केला जातो. कोणत्याही ढगात गोठण मिश्रण फवारल्याने पाऊस पडत नाही. त्यासाठी तिथे विशिष्ट प्रकारचे पर्जन्यमेघ असणे आवश्यक असते. आजकाल त्यासाठी रडारची मदत घेतली जाते. रसायने भरून विमाने तयार ठेवतात. रडारद्वारे आकाशाचा वेध घेऊन वैमानिकांना संदेश दिला जातो. मगच त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन ढगात फवारणी केली जाते. अशा प्रयत्नांतून दहा टक्क्यांपर्यंत पर्जन्य प्राप्त केल्याचे दावे करण्यात आले आहेत.

हेही वाचा : लोकमानस: बाबा-बुवांना पुरस्कार नाहीत, हेच नवल!

कृत्रिम पर्जन्याचा वापर एखाद्या प्रदेशातील पाणीपुरवठ्यात वाढ, पाणीटंचाईवर मात, जलसिंचन, विद्याुत निर्मिती अथवा इतर कारणांसाठी केला जातो. उदा. अमेरिकी सैन्याने १९६७ ते ७२ दरम्यान व्हिएतनाममध्ये कृत्रिम पर्जन्याद्वारे मान्सूनचा पाऊस महिनाभर अधिक मिळवण्यात यश मिळवले. १९८३, १९८४ ते ८७ व १९९३- ९४ मध्ये तमिळनाडूत दुष्काळ पडला होता. त्या काळात तेथे कृत्रिम पर्जन्याचा वापर केला गेला. २००३ व २००४ मध्ये कर्नाटक व महाराष्ट्रात कृत्रिम सिंचनाचे प्रयोग केले गेले. भारतातील ‘सृष्टी एव्हीएशन’ ही कंपनी कृत्रिम पर्जन्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

पण कृत्रिम पर्जन्याच्या वापराबद्दल मतभिन्नता आहे. एक तर हे प्रयोग सर्वत्र सारखेच परिणामकारक व उपयोगी ठरलेले नाहीत. दुसरे, समजा कृत्रिम पर्जन्याचा वापर केला नसता, तर नंतर तिथे पाऊस पडला असता की नाही, हे कुणी सांगू शकत नाही. यावर रूटगर्स विद्यापीठातील प्रा. रोबॉक यांचे उत्तर असे. ‘आपल्या प्रयत्नांमुळे एखाद्या ठिकाणच्या पावसात समजा फक्त दहा टक्के फरक पडला, तरी त्यासाठी केलेला खर्च परवडू शकेल.’ अजून कृत्रिम पर्जन्याच्या सहपरिणामांबद्दल ( Side effects) पुरेसा अभ्यास झालेला नाही. उदा. ढगपेरणीतून वातावरणात मिसळणारी सिल्व्हर आयोडाइडसारखी संयुगे पर्यावरणास घातक ठरू शकतात. तसेच एखाद्या भागातील कृत्रिम पर्जन्यामुळे दुसऱ्या ठिकाणच्या पावसात घट होते का हे अजून निश्चित झालेले नाही. चीनमध्ये २००४ च्या बीजिंग ऑलिम्पिकच्या वेळी पावसामुळे स्पर्धेवर पाणी फिरू नये यासाठी ढगपेरणीद्वारे पाऊस इतरत्र वळवण्याची फार मोठी तयारी करण्यात आली होती. पण त्यातून इतर भागात अनावृष्टी व अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे त्यावर टीका झाली होती. पर्जन्य असो, फळे पिकवणे किंवा खते – जे नैसर्गिक ते श्रेष्ठ, हे तर निर्विवादच आहे. पण अस्तित्वाचाच प्रश्न येतो किंवा जेव्हा अपरिहार्यच ठरते, तेव्हा ही तुलना अनावश्यक होते. पर्यावरणाच्या संदर्भात अस्तित्वाचा प्रश्न केव्हा मानायचा किंवा अपरिहार्य केव्हा ठरते याचा योग्य निर्णय म्हणजेच भूगोल विवेक. मानवाचे शास्त्रीय नाव होमो सेपियन्स आहे. यातील सेपियन्स म्हणजे विवेकशील. मानवाचे पर्यावरणाच्या बाबतीतले वर्तन त्याच्या नावाला सार्थ करील अशी आशा करू या.

लेखक भूगोलाचे निवृत्त शिक्षक आहेत.