एल.के.कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते’ असे म्हटले जाते. ते खरेही आहे. परंतु भूगोल म्हणजे केवळ इतिहासातील घटना व साम्राज्यांचे उदयास्त यांची नेपथ्यरचना नव्हे. त्याचा अर्थ यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. खडकांपासून ढगांपर्यंत, भूगर्भापासून ते तारकाविश्वांपर्यंत, वनस्पतींपासून ते लोकजीवनापर्यंत, नदीपासून महासागरापर्यंत, उद्याोग व्यापारापासून भूकंप, ज्वालामुखीपर्यंत असा भूगोलाचा व्यापविस्तार आहे. जीवनाशी संबंधित असा तो सर्वव्यापी, सर्वस्पर्शी विषय आहे. मानव आणि त्याचे पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेचा अभ्यास म्हणजे भूगोल. अर्थातच मानवी जीवन आणि एकूणच मानवी संस्कृतीला आकार देण्याचे व विकासाचे कार्य भूगोलातून घडते. यामुळे ‘जे लोक भूगोल समजावून घेतात तेच इतिहास घडवू शकतात’, असे म्हटले जाते.

दुर्दैवाने आपण मात्र प्राचीन काळापासून भूगोलाला योग्य तो न्याय व महत्त्व दिलेले नाही. भूभागांचे संशोधन, स्थळातील अंतरे व नकाशे, रस्ते, भूरचनेची वर्णने, हवामान विषयक नोंदी, उत्पाती घटनांचा अचूक काळ व कालावधी यांच्या नोंदी, हे सर्व आपल्याकडे अभावानेच आढळते. १४०० वर्षांपूर्वी आर्यभट्टासारखा महान संशोधक आपल्याकडे होऊन गेला. पण त्याची पुरेशी दखल आपण घेतली नाही. अकराव्या शतकात अलबेरुनी या विद्वानाने आर्यभट्ट व वराहमिहिराच्या ग्रंथांचा फार्सी भाषेत अनुवाद केला. त्याच्याही पूर्वी आर्यभट्टाच्या ग्रंथाचा अरबीत अनुवाद झाल्याचा उल्लेख त्याने केला आहे. त्याच ग्रंथांचा मराठी अनुवाद उपलब्ध होण्यास विसावे शतक उजाडावे लागले. ३०० वर्षांपूर्वी राजा सवाई जयसिंह यांनी भारतात दिल्ली, जयपूर, वाराणसी आणि उज्जैन आणि मथुरा इथे वेधशाळा उभारल्या. प्रात्यक्षिक भूगोलाचे जागतिक आश्चर्य ठराव्या अशा आणि आजही वेध घेता येतील अशा या वेधशाळा. पण ‘जंतर मंतर’ या नावाने आज त्या केवळ शोभेच्या आणि त्याही उपेक्षित वास्तू म्हणून उभ्या आहेत. एकूण पूर्वीपासूनच काही क्षेत्रात मोठी प्रगती करताना आपण भूगोलाची उपेक्षा केली.

ही चूक सुधारण्याचा अंशत: प्रयत्न स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झाला. धरणे व सिंचन, रस्ते, उद्याोगनिर्मिती या सर्व क्षेत्रातील विकासयोजना हे भूगोलाच्याच उपयोजनाचे प्रयत्न होते. परंतु हे करताना शिक्षणात मात्र आपण भूगोलाला योग्य ते स्थान दिले नाही. खरे तर स्वतंत्र भारतात तरी शिक्षणात स्वतंत्र विषय म्हणून भूगोलाला महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक होते. पण गेली ७० वर्षे शालेय अभ्यासक्रमात ‘सामाजिक शास्त्र’ ( म्हणजे इ.भू. ना.शा.) या विषयाचा एक उपविषय – तोही १०० पैकी ४० गुणांचा – एवढेच स्थान भूगोलाला दिले गेले. परिणामी विद्यार्थी, शिक्षक आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेकडून या जीवनस्पर्शी विषयाच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आली. या विषयाच्या पदवी व पुढील शिक्षणाची सोय अगदी मोजक्या महाविद्यालयात आहे. त्यामुळे भूगोलात विशेष रस असणारे, उच्चशिक्षित, पारंगत अध्यापक अभावानेच उपलब्ध आहेत. त्याची व्यापक, सखोल माहिती एकत्रितपणे भारतीय भाषेतून देणारी पुस्तके व संदर्भग्रंथ फारच कमी आहेत.

खरे तर भारत हा कृषिप्रधान देश. शेती हवामानावर अवलंबून. हवामान व त्याची भाकिते हा भारतीयांच्या सर्वात जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ढगांचे प्रकार, पर्जन्य, हवामानाचे आविष्कार, नैसर्गिक उत्पात, धरणे, सिंचन इ. ची माहिती इथे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना असणे अपेक्षित होते. या विषयावर शास्त्रीय माहिती व शिक्षण देणाऱ्या संस्था, शाळा सर्वत्र असायला हव्या. पण वास्तव विपरीत आहे. दुर्दैवाने ज्याची कमीतकमी शास्त्रीय माहिती व संशोधन संस्था उपलब्ध आहेत, असा हा विषय ठरला आहे.

पण असे दुर्लक्ष फार महाग पडते, हेच आजवरच्या इतिहासाकडे पाहिल्यावर दिसून येते. ज्यांनी भूगोल व भौगोलिक ज्ञानाचे महत्त्व जाणले व ते आत्मसात केले, तेच सर्व क्षेत्रात यशस्वी ठरले. सिकंदर, नेपोलियन ते हिटलरपर्यंत अनेकांच्या पराभवात भौगोलिक ज्ञानाकडे दुर्लक्ष महत्त्वाचे ठरले. उलट आपल्या साधनसंपत्तीचा कौशल्याने वापर करणारे जपानसारखे देश विनाशानंतरही फिनिक्स ठरले. सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी असणारे आफ्रिकी देश गुलामीत खितपत राहिले. आणि स्वत:साठी अन्नही पिकवू न शकणारे, साधनसंपत्तीचा तुटवडा असणारे युरोपीय देश राज्यकर्ते बनले. ही सर्व भौगोलिक ज्ञानाचीच लीला होती.

भारतातही भूगोलाच्या ज्ञानाअभावी सिकंदरापासून ते अब्दालीपर्यंत महत्त्वाच्या अनेक लढाया आपण हरलो. परकीय आक्रमणाच्या संदर्भात खैबर खिंड अतिशय महत्त्वाची. पण हजारो वर्षे राणा रणजीतसिंह वगळता एकाही राजाने या संदर्भात काही विशेष केले नाही. गंगा, यमुना, गोदावरी यांसारख्या जलसमृद्ध नद्या आपल्याकडे आहेत. पण एकोणिसाव्या शतकापर्यंत याच नद्यांच्या खोऱ्यात एकेका दुष्काळात लक्षावधी भूकबळी जात राहिले. जगातील सर्वात उंच शिखर आपल्या हिमालयात आहे, पण हे आपल्याला १८५२ पर्यंत माहीत नव्हते. उलट ज्यांनी भूगोलाचे महत्त्व जाणले, त्या चोल राजांनी समुद्रात दूर पोहोचलेले व हजारो वर्षे टिकलेले भारतातील एकमेव साम्राज्य निर्मिले. राणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, पाहिले बाजीराव पेशवे यांनी बलाढ्य शत्रूविरुद्धही यशस्वी लढा दिला. त्यामागेही त्यांचे भूगोलाचे अचूक आकलन व त्याचा योग्य वापर याचा मोठा वाटा होता. तात्पर्य कितीही बलाढ्य राजा जरी असला तरी कुठे, कधी, केव्हा काय करायचे हे तो स्वइच्छेने ठरवू शकत नाही. तर पर्वत, नद्या, हवामान, पर्जन्य, पूर, वादळे, दुष्काळ यांचा परिणाम फार निर्णायक ठरतो. म्हणजे भूगोल हा समान्यांपासून तो त्यांच्या नायकांपर्यंत सर्वांना खेळवणारा खेळिया आहे. हे जाणून जो भौगोलिक ज्ञानाचा अचूक उपयोग करतो तोच महानायक ठरतो.

या सर्व पार्श्वभूमीवर भूगोलाचे महत्त्व स्पष्ट करून त्याकडे सर्वांचे लक्ष वेधणे ही या सदरामागील भूमिका आहे. म्हणजेच भूतकाळ व वर्तमानाच्या संदर्भात भूगोलाचे सामर्थ्य जनमानसात ठसवण्याचा हा एक प्रयत्न आहे. जगाच्या व भारताच्या इतिहासातील काही निर्णायक घटना, जग बदलणारे भौगोलिक शोध व मोहिमा, क्रांतिकारक संशोधन प्रकल्प हे सर्व म्हणजे भूगोलाच्या रंगमंचावर सादर होत असलेल्या महानाट्याचे अंकच होत. आणि शोधमोहिमांचे प्रणेते, जग बदलून टाकणारे संशोधक, हे अशा नाट्याचे महानायक आहेत. असे काही प्रसिद्ध – अप्रसिद्ध भौगोलिक शोध, क्रांतिकारक संशोधने, मोहिमा, ऐतिहासिक घटनांमागील भूगोल, भूगोलातले महानायक व त्यांचे असामान्य कार्य, हेही या लेखमालेचे विषय आहेत. त्यांचे काही ज्ञात व अज्ञात पदर या निमित्ताने या साप्ताहिक लेखमालेत येणार आहेत.

भूतकाळात आपण भूगोलाकडे केलेले दुर्लक्ष पाहता आपण भूगोलाचे फार मोठे देणे लागतो. या लेखमालेद्वारे भूगोलाचे महत्त्व अधोरेखित होईल व वाचकांपैकी काही जण तरी भूगोलाच्या अधिक अभ्यासाकडे आकर्षित होतील अशी आशा आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta column history of geography on jantar mantar asj
Show comments