संविधानाने आपणा भारतीयांना दिलेली ‘ओळख’ कुणाच्या अस्मितेवर आधारित नसून मूल्यांवर आधारलेली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संविधान म्हणजे नियमांचा, कायद्यांचा दस्तावेज आहे, मात्र कोणतेही नियम अथवा कायदे हे निर्वातात जन्माला येत नाहीत. त्यांना संदर्भ असतो. पार्श्वभूमी असते. मुख्य म्हणजे नियम, कायदे, तरतुदी या सगळय़ाच बाबी केवळ तांत्रिक नसतात. त्यांना मूल्यांचे अधिष्ठान असते. त्या मूल्यांच्या अधिष्ठानावरच संविधान आकाराला येते. संविधानाची तीन मुख्य रूपं आहेत: आपलं आयकार्ड, आरसा आणि देशाचा स्वप्ननकाशा.

कायदेपंडित नानी पालखीवाला म्हणाले होते, भारतीय संविधानाची उद्देशिका हे संविधानाचे ओळखपत्र आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत हेच मूल्यांचे अधिष्ठान सारांश रूपात सांगितले आहे. त्यामुळे अमुक जात, धर्म, लिंगभाव, वंश, प्रदेश, राज्य यापुरती सीमित अशी आपली ओळख नाही. या सगळय़ा जन्मजात ओळखी आहेत. आपली ओळख आपल्या संविधानाने तयार केलेली आहे. ती मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळेच संविधान हे आपल्या सगळय़ांचे आयकार्ड आहे.

तसेच भारतीय संविधान हा आपला सर्वासाठीचा आरसा आहे. आपण आरशात पाहून चेहऱ्यावरची धूळ बाजूला करतो. आपले रूप अधिक नीटनेटके असावे, यासाठी प्रयत्न करतो.  आरसा आपल्याला वास्तव दाखवतो आणि आपण त्यानुसार स्वत:च्या बाह्यरूपामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. एक व्यक्ती जशी स्वत:मध्ये आरशात पाहून बदल करू शकते तसंच समूहासाठी संविधान हा एक आरसा आहे. आपण समूह म्हणून करत असलेल्या कृती कितपत योग्य आहेत, त्यात काय बदल करायला हवेत, हे ठरवण्यासाठी संविधान हा महत्त्वाचा संदर्भिबदू आहे. त्यानुसार आपण आपल्यात  अंतर्बाह्य बदल करणे अपेक्षित आहे.

अलीकडे मोबाइलवरील ग्लोबल पोझिशिनग सिस्टीमचा (जीपीएस) वापर करून आपण पत्ते शोधतो. मोबाइलवर आवाज येतो ‘आता उजवीकडे वळा’, ‘आता डावीकडे वळा’, ‘मग सरळ जा’ वगैरे वगैरे. त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचा अचूक पत्ता आपण असा शोधतो. एका व्यक्तीला पत्ता शोधायचा असेल तर हे तंत्रज्ञान ठीक आहे; पण एखाद्या समूहाला, एखाद्या देशाला योग्य पत्त्यावर जायचं असेल तर काय करायचं ? हा योग्य पत्ता सांगायचं काम भारतीय संविधानानं केलं आहे. भारतीय संविधान हे आपल्या सर्वासाठीचं होकायंत्र आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या परिभाषेत ते देशाचे ‘जीपीएस’ आहे!

थोडक्यात, संविधान आपले ओळखपत्र आहे. ही ‘ओळख’ कुणाच्या अस्मितेवर आधारित नाही तर ती मूल्यांवर आधारलेली आहे. मूल्यांवर आधारित आपले वर्तन योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठीचा आरसा संविधानाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि भविष्यात कोणत्या दिशेने जायचे, याचा स्वप्ननकाशा संविधानाने आखून दिलेला आहे. हा स्वप्ननकाशा नेमका काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. अन्यथा देश भरकटेल. असा अनर्थ होऊ द्यायचा नसेल तर या स्वप्ननकाशाचा ‘रिमाइंडर’ प्रत्येक नागरिकाच्या जवळ हवा. हा ‘रिमाइंडर’ आपल्या उज्ज्वल भविष्याच्या वाटा अधिक प्रशस्त करू शकतो, याचं भानही प्रत्येकाने बाळगलं पाहिजे.

डॉ. श्रीरंजन आवटे 

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta constitution indians document of laws provisions amy
Show comments