भारतीय संविधानाच्या ४३ व्या अनुच्छेदाने कामगारांना निर्वाहापुरते वेतन (लिव्हिंग वेज) मिळेल, यासाठीच्या तरतुदी राज्यसंस्थेने केल्या पाहिजेत, असे मार्गदर्शक तत्त्व सांगितले आहे. निर्वाहाचा अर्थ गुजराण होऊ शकेल, दोन वेळचे खायला मिळू शकेल, इतपत वेतन मिळणे. या अनुच्छेदाच्या शीर्षकात ‘निर्वाह वेतन’ असा शब्दप्रयोग केलेला असला तरी अनुच्छेदामध्ये उल्लेख केला आहे तो समुचित जीवनमानाचा (डिसेंट स्टॅण्डर्ड ऑफ लाइफ). काहीएक दर्जा असलेले समुचित जीवनमान कामगारांना मिळावे, ही जबाबदारी राज्यसंस्थेची आहे. त्यापुढे म्हटले आहे फुरसतीचा आणि सामाजिक, सांस्कृतिक संधींचा पूर्ण उपयोग त्यांना करता येईल, अशी कामाची परिस्थिती निर्माण करणे जरुरीचे आहे. फुरसत हा शब्द येथे वापरला आहे, हे आवर्जून नोंदवले पाहिजे. केवळ एकसारखे घाण्याला बांधलेल्या बैलासारखे किंवा एखाद्या यंत्रासारखे कामगारांचे जीवन असू नये तर त्यांना फुरसत मिळेल, मोकळा श्वास घेता येईल, एवढी उसंत हवी. कार्ल मार्क्ससारख्या तत्त्ववेत्त्याने मांडलेली ‘परात्मभाव’ (अॅलिएनेशन) ही संकल्पना येथे महत्त्वाची ठरावी. जबरदस्तीचे, सक्तीचे श्रम यातून कामगार आपल्या उत्पादन प्रक्रियेपासून दुरावतो. त्यानंतर सहकाऱ्यांपासून दुरावतो. त्यापुढील टप्पा म्हणजे कामगार समाजापासून दुरावतो आणि अखेरीस स्वत:पासून दुरावतो. स्वत:पासून दुरावणे हा परात्मतेचा अंतिम टप्पा आहे. मंगेश जोशी दिग्दर्शित ‘लेथ जोशी’ (२०१६) हा सिनेमा परात्मभावाविषयी भाष्य करतो. या परात्मभावाच्या चक्रात अडकू नये म्हणून संविधानाच्या त्रेचाळिसाव्या अनुच्छेदातील हे तत्त्व कामगाराच्या सर्वागीण जीवनमानाची खबरदारी घ्यायला सांगते. तसेच अनुच्छेद ४३ (क) कामगारांचा उद्योगधंद्यातील व्यवस्थापनात सहभाग वाढावा, यासाठी राज्यसंस्थेने प्रयत्नशील असावे, असे सांगते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा