अपेक्षेप्रमाणे पराभव पदरी पडल्यावर नेतानिवडीसाठी हरियाणा भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक चंदीगडमध्ये भरली तेव्हा साऱ्यांचेच चेहरे पडलेले होते. दिल्लीहून पक्षश्रेष्ठींनी पाठवलेल्या प्रभारींनी ‘चला, करा सुरुवात समीक्षेला’ असे म्हणताच नेहमीच्या सवयीप्रमाणे अनिल विज उभे राहिले. ‘सामान्य जनतेलाच आपण नकोसे झालो होतो. मी मुख्यमंत्री पदाबाबत अनेक विधाने केली पण काही फरक पडला नाही’ हे ऐकताच मावळते मुख्यमंत्री सैनी उठले. त्यांनी प्रतिवाद करणे सुरू करताच एकच गोंधळ उडाला. अखेर प्रभारींनी मध्यस्थी करत पराभवाचे नेमके कारण सांगा असे म्हणताच एकेकजण बोलायला लागला.

हेही वाचा >>> उलटा चष्मा :‘तिथून’ अभिनंदन!

कुणी जाटांना दोष देणे सुरू केले तर कुणी शेतकरी आंदोलकांचा अपमान करायला नको होता, अशी मते मांडू लागले. तेवढ्यात नव्याने निवडून आलेला एक आमदार उभा राहून त्वेषाने बोलू लागला. “ये सब झूठ है। खरे कारण वेगळेच आहे व दुर्दैव हे की त्यावर कुणी बोलायलाच तयार नाही. ‘खर्ची व पर्ची’ या दोन शब्दांचे यमक जुळवत आपण केलेला प्रचार हेच पराभवाचे मुख्य कारण आहे. ही आयडिया दिल्लीहून लादली गेली, असे आम्हाला सांगण्यात आले पण सत्तेत असतानाचे वास्तव काय याकडे कुणी लक्षच दिले नाही. मी या पदावर येण्याआधी साधा ब्लॉक अध्यक्ष होतो. प्रत्येक वेळी बेरोजगारांना घेऊन नोकरीसाठी मंत्रालयात गेलो की ‘खर्ची’ म्हणजे देता किती व ‘पर्ची’ म्हणजे शिफारसपत्र कुणाचे हे दोनच प्रश्न विचारले जायचे. त्याचे ‘योग्य’ उत्तर दिले तरच नोकरी मिळायची. हे साऱ्या राज्यातील तरुणांना ठाऊक आहे. तरीही एक लाख ४३ हजार नोकऱ्या या प्रश्नाविना दिल्या असा खोटा प्रचार आपण केला. बोलण्यात स्पष्ट असलेला हरियाणवी यावर कसा विश्वास ठेवेल याचा साधा विचारही कुणी केला नाही. अजूनही वेळ गेली नाही. हे यमक जुळवण्याचे धंदे आता परिवाराने सोडावेत व आणखी बदनामी नको असेल तर खर्ची व पर्चीचे पुरावे तातडीने नष्ट करावेत.” हे ऐकताच बैठकीतील वातावरण पूर्णपणे सुतकी झाले.

मग प्रभारींनी एकेका मंत्र्याची झाडाझडती सुरू केली. किमान आता तरी खोटे बोलू नका. नक्कल करण्याच्या नादात अशी वाईट सवय लावून घेऊ नका असे त्यांनी खडसावताच मंत्र्यांच्या साहाय्यकांमध्ये पळापळ सुरू झाली व पाहता पाहता शिफारसपत्रांचा ढीग मंचाच्या बाजूला तयार झाला. किमान एक ट्रक भरेल एवढे कागद बघून प्रभारींचा चेहरा संतापाने लाल झाला पण त्यांनी स्वत:ला आवरले. “आताच्या आता ही पत्रे जाळून टाका” असा आदेश त्यांनी दिला. मग पुन्हा तोच आमदार उभा राहील. “२०२१ मध्ये लोकसेवा आयोगाचे उपसचिव अनिल नागर यांना एक कोटी लाच घेताना पकडले होते. आता काँग्रेसवाले त्या नागरकडे चकरा मारत आहेत. त्याच्या तोंडून आपल्या नेत्यांची नावे वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला आधी आवरा” हे ऐकताच प्रभारींनी घाम पुसतच दिल्लीला फोन केला. तो नागर काहीही बरळायला नको यासाठी ईडी व सीबीआयला कामाला लावण्याची विनंती त्यांनी वरिष्ठांना केली. नंतर बैठकीचा नूरच पालटला. पराभवाची कारणमीमांसा करण्याच्या भानगडीत कुणी पडले नाही. प्रभारींनी दिल्लीला जाऊन अहवाल दिला. त्यात यमक जुळवत लिहिले होते. “सत्ता के हर डगर पर, बैठा है एक नागर, पर्ची पर्चीसे भरा है यहा, हर पक्ष का सागर.”