अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सोडून हे राजकीय आगी लावण्याचे काम कधीपासून सुरू केले? राज्यात गेल्या पाच वर्षांत जितक्या आगी लागल्या त्या काय कमी वाटल्या का तुम्हाला? देशमुख व फडणवीसांमध्ये नेमके काय घडले ते ठाऊक होते साऱ्यांना. अगदी माध्यमांसकट. तरीही सारे चूूप होते. मग तुम्हालाच तोंड उघडायची काय गरज होती? काही कामधंदे उरले नाहीत का तुम्हाला? की अंधश्रद्धा दूर करण्याच्या कामाचा कंटाळा आला? लोकसभेच्या वेळी काय तर मोदी निर्मूलन, आता विधानसभेच्या तोंडावर काय तर फडणवीस निर्मूलन. त्यासाठी लोकांनी करायचे काय तर निवडणुकीत यांच्या सरकारांचा पराभव करायचा. तोही तुमच्या सांगण्यावरून. कारण काय तर हे दोघे सत्तेत कायम राहिले तर हुकूमशाही आणतील. अहो, श्यामभाऊ ही तुमची वक्तव्येच अंधश्रद्धा पसरवणारी आहेत.

सरकार काँग्रेसचे असो वा भाजपचे. त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली की हुकूमशाहीच आवडू लागते. आजवरचा हा अनुभव तुमच्या तल्लख डोक्यातून निसटलाच कसा? लोकांना संमोहनशास्त्र शिकवणारे तुम्ही, काँग्रेसच्या संमोहनात अडकलात की काय? सत्तेत कुणीही येवोत, सामान्य जनतेला त्याचा काहीच फायदा होत नसतो. त्यांच्या समस्याही कायम असतात. तरीही लोक प्रत्येक निवडणुकीत उत्साहाने भाग घेतात. काहीतरी बदल घडेल या आशेने. खरे तर हीच अंधश्रद्धा. लोकांच्या मनात कायमची घर करून बसलेली. ती दूर करण्याचे काम तुमचे. ते सोडून तुम्ही याला पाडा, त्याला निवडून द्या असे म्हणू लागलात तर मग या रुजलेल्या अंधश्रद्धेचे काय? ती कुणी दूर करायची? त्यासाठी आता दुसरा श्याम मानव तयार करायचा अशी तुमची अपेक्षा आहे काय?

पक्ष कोणताही असो, अतार्किक गोष्टी तर्कसंगतपणे मांडणे हेच त्यांचे काम. यातून लोकांच्या मनात फसवी आशा निर्माण होते. त्याचेच रूपांतर पुढे अंधश्रद्धेत होते. जाणकारांना कळणारा हा प्रकार निर्मूलनाच्या क्षेत्रात दीर्घकाळ वावरूनही तुम्हाला कळला कसा नाही? कोडेच आहे बुवा! मी ना जातीचा ना पातीचा असा उच्चार करत तुम्ही मानव हे नाव धारण केले. केवढा आनंद झाला होता तेव्हा या पुरोगामी राज्याला, पण अजूनही लोक जातपात पाहूनच मत देतात. ही जातीय अंधश्रद्धा तुम्ही केव्हा दूर करणार? ती रुजवण्यात तुम्ही ज्यांची कड आज घेत आहात त्या पक्षाचा वाटासुद्धा मोठा. हे तुम्ही जाहीरपणे मान्य कराल का?

आता काही लोक म्हणतात या सरकारने तुमचा निर्मूलनाचा निधी गोठवला, उच्चाधिकार समितीच्या सहअध्यक्षपदावर नामधारी ठेवले म्हणून तुम्ही चिडलात व विरोधी भाषा बोलू लागलात. आधीच्या सरकारांनी तर हा सन्मानसुद्धा दिला नव्हता. या सत्याकडे तुम्ही कशी काय डोळेझाक करू शकता? यांच्या काळात बुवाबाजी वाढली असे तुम्ही म्हणत असाल तर आधीच्या काळातही ती होतीच की! जोवर समाजातला पापभिरूपणा कायम आहे तोवर सारे पक्ष बुवा, बापूंचा आधार घेणारच. तो कमी करण्याचे काम तुमचे. ते सोडून तुम्ही हा चांगला, तो वाईट अशी भलतीच अंधश्रद्धा पसरवू लागलात. खरे म्हणजे तुमच्यावरच आता अंधश्रद्धाविरोधी कायद्याने गुन्हा दाखल करायला हवा. आहे का तुमची तयारी श्यामभाऊ, कोठडीत जाण्याची?