प्रिय कांद्या, लोकांना रडवण्याचा मक्ता आपणच घेतला हा तुझा दीर्घकाळ टिकलेला भ्रम आम्ही अखेर तोडला. शेवटी निसर्गाच्या मदतीने का होईना पण गेलो आम्ही शंभरीच्या पार. भाजीपाल्याच्या पिशवीत कुठेतरी दबून राहणारे आम्ही आता सर्व भाज्यांच्या वर दिसू लागलो. ग्राहकांकडून होणारी हळुवार हाताळणी केवळ महाग झाल्यामुळे आहे याची जाणीव आहे आम्हाला. आमचे महत्त्व आणखी काही दिवस असेल याचीही कल्पना आहे, पण यानिमित्ताने तुझ्याएवढेच महत्त्व आम्ही मिळवले याचा अपार आनंद झाला. लोकसभेत सत्ताधाऱ्यांना तू रडवले, आता विधानसभेत आमची पाळी. हा बदल तू लक्षात घ्यायला हवा. अरे नसेल तुझ्यासारखा उग्र वास आमच्यात. आमचे हृदयच रसाळ पण केवळ एका भाववाढीने डोळ्यात पाणी आणू शकतो हेच दाखवून द्यायचे होते आम्हाला. तसे बघायला गेले तर प्रत्येक फोडणीत तू जेवढा महत्त्वाचा तेवढेच आम्ही. चवीसाठी तू जेवढा महत्त्वाचा तेवढेच आम्ही. तरीही आजवर कुणाच्या खिजगणतीतही नव्हतो. ना ग्राहकाच्या, ना सरकारच्या. आता जाईल लक्ष साऱ्यांचे. आमचीही विक्री होईल सरकारी पातळीवर. तेच हवे होते आम्हाला. रोजच्या आहारातले सगळेच जिन्नस महत्त्वाचे हे देशात लक्षातच घेत नाही कुणी. त्यामुळे झटका द्यावा लागतो मधून मधून. त्याचा ठेका तुझ्याकडे नाही हेच दाखवून दिले आम्ही. त्यामुळे किमान आतातरी आमच्याकडे आदराच्या नजरेने बघायला शिक. जेव्हा तुझे लोकांना रडवणे ऐन भरात होते तेव्हा अर्थमंत्री म्हणाल्या होत्या ‘कांदा खाल्ला नाही तर काय बिघडते?’ या एका वाक्याने तू संतापाने ‘लाल’ झाला होता. आम्ही तर मुळातच लाल. त्यामुळे आता त्या काय म्हणतात हे आम्हाला बघायचेच आहे. तुझ्यासारखाच संताप एकदा अनुभवायचा आहे. सत्ताधारी कोणतेही असोत, ते फक्त ग्राहकहितच जोपासतात. पिकवणाऱ्याच्या नशिबी केवळ अवहेलनाच येते. आता तुझ्याप्रमाणेच आमच्यामुळेसुद्धा त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा आनंदाश्रू तरळले आहेत. त्यामुळे मीच एकटा बळीराजांचा लाडका असा तोरा आता मिरवू नकोस. आम्हीही त्या लाडक्याच्या पंक्तीत आलो आहोत, हे लक्षात घे. मी सरकार पाडले ही तुझी मिजास आता थांबव. वेळ आली तर आम्हीसुद्धा ही अवघड कामगिरी पार पाडू शकतो असा विश्वास या भाववाढीने आमच्यात जागवला आहे. त्यामुळे उगाच तोरा मिरवण्यापेक्षा आमच्यासारख्या लहान भावंडांचे कौतुक करायला शिक. आपल्यासारख्या नाशवंतांना उपद्रवमूल्य सिद्ध करण्याची संधी फारच कमी वेळा मिळते. तू जसा त्याचा फायदा नेहमी घेत आलास तसा आता आम्हालाही घेऊ दे. असूया बाळगशील तर त्यात आमच्यासोबत तुझेही नुकसान आहे, याची जाणीव ठेव. या देशात सहमतीचेच राजकारण दीर्घकाळ चालते ही परंपरा आहे. ती न पाळता ‘मी मी’ करण्याचे काय हाल होतात हे नुकतेच साऱ्यांनी अनुभवले. त्यामुळे स्वत:च्या ताकदीचा फार गर्व न बाळगता आमच्या केंद्रस्थानी येण्याला मनापासून दाद दे. भलेही आम्ही आंबट, गोडसर असू पण अनेकांच्या जिभेवर रुळलेल्या या सवयीचे महत्त्व काय हे यानिमित्ताने साऱ्यांना दिसू दे. बाकी सारे क्षेमकुशल. या रडवण्याच्या काळात लोभ कायम ठेवशील ही अपेक्षा. - तुझा टोमॅटो