जगातली पहिली यशस्वी हृदयारोपण शस्त्रक्रिया दक्षिण आफ्रिकेत, केपटाउन शहरात ३ डिसेंबर १९६७ रोजी डॉ. ख्रिास्तिअन बर्नार्ड यांनी केली. त्यानंतर ही शस्त्रक्रिया अनेक देशांत करण्यात येत होती, भारत मात्र ‘हा खर्चिक प्रकार खरोखर आपल्या देशात हवा का?’ ही चर्चा रास्त ठरल्याने यापासून दूर राहिला. अखेर नवी दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये ३ ऑगस्ट १९९४ रोजी डॉ. पनंगिपल्ली वेणुगोपाल यांनी भारतातली पहिलीच हृदयारोपण शस्त्रक्रिया केली आणि ती यशस्वी झाली. तेव्हा डॉ. वेणुगोपाल होते अवघ्या ३२ वर्षांचे. पुढल्या आयुष्यात त्यांना, कित्येक रुग्णांचे आयुष्य वाढवण्याची संधी मिळाली. जन्मत:च हृदयदोष अथवा हृदयाशी संबंधित विकार असलेल्या कित्येक अर्भकांना तर, डॉ. पी. वेणुगोपाल यांच्या शल्य-कौशल्यामुळेच पुढे जगता आले. ‘पद्माविभूषण’ (१९९८) सह कित्येक सन्मान मिळवलेल्या, केवळ शल्यविशारद नव्हे तर ‘एम्स’चे संचालक, तिथल्या हृदय व संबंधित विकार विभागाचे प्रमुख म्हणून प्रशासकीय कारकीर्दही केलेल्या डॉ. वेणुगोपाल यांचे निधन ८ ऑक्टोबर रोजी झाल्याची बातमी मात्र काहीशी दुर्लक्षित राहिली.

‘हार्टफेल्ट’ हे आत्मकथन डॉ. वेणुगोपाल यांनी, पत्नी प्रिया सरकार यांच्या साथीने लिहिले आहे. आंध्रमधील खेड्यात ४० एकर भातशेती असूनही शिक्षक म्हणून राजमुंद्री या जिल्ह्याच्या ठिकाणी आलेले वडील. शिक्षणाचा त्यांना ध्यास असल्यानेच प्राध्यापक, अभियंता झालेले मोठे बंधू, घरकामात गर्क असलेली आई आणि तिला मदत करू लागलेली बहीण अशा कुटुंबातल्या या ‘बाबू’चे तिसरीपर्यंतचे शिक्षण घरीच झाले. मग शाळेच्या पटावर नाव नोंदवताना वडिलांनीच विचारले- ‘या तीनपैकी कोणते नाव हवे तुला?’ – तेव्हापासून ते वेणुगोपाल झाले! किंवा, आधी वेल्लोरच्या वैद्याकीय महाविद्यालयात शिकून १९५९ सालात दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये आल्यानंतर तिथल्या ‘पहिल्या बॅचची सीनियर मंडळी’ या ‘तिसऱ्या बॅचच्या’ पोरांना मीठ-मिरपुडीचा चहा पिण्यास देऊन कसे भंडावत असत, अशी वेल्हाळ वर्णने करणारे हे पुस्तक डॉक्टर म्हणून आलेले अनेक अनुभवही सांगते. त्यापैकी एक प्रसंग ३१ ऑक्टोबर १९८४ रोजीचा… ‘‘पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शरीरातून सर्व गोळ्या काढण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो’’- असा!

१९६३ मध्ये (एम्सच्या पहिल्या पदवीदान समारंभात) पं. नेहरूंच्या हस्ते सुवर्णपदक, पुढे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते पहिल्या हृदयारोपण शस्त्रक्रियेबद्दल सत्कार आणि ‘एम्स’च्या वतीने, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेला ‘कारकीर्द गौरव’ अशा तिघा पंतप्रधानांकडून सन्मानित झालेले ते एकमेव डॉक्टर असावेत. ‘एम्स’च्या उत्कर्षकाळाचा कर्ता साक्षीदार त्यांच्या निधनाने लोपला आहे.