शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीत बदल करून राज्य सरकारचा पाचवी आणि आठवी या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पूर्वी शाळेच्या प्रगती पुस्तकात ‘पाल्यास वरचे वर्गात घातले आहे/ नाही’ असा शेरा असे. तो गेली दहा वर्षे गायब झाला होता. कारण या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करता वरच्या वर्गात पाठवण्याची तरतूद शिक्षण हक्क कायद्यातच होती. तरीही शाळांकडूनच विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात असे. अर्थात शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे आवश्यक करण्यात आले होते. तरीही मुले ‘नापास’ न होता पुढे पुढेच जात राहिली. एकदम नववीच्या वार्षिक परीक्षेत त्याला उत्तीर्ण होण्याचे दडपण दिल्याने, त्याचा परिणाम त्यानंतरच्या वर्षी येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत अधिक दिसणे स्वाभाविक होते. परीक्षा हे विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या तपासणीचे एक साधन असते. ते परिपूर्ण नसले, तरीही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला आपण किती पाण्यात उभे आहोत, हे समजण्यास मदत होते. आपण कुठे कमी पडतो आहोत आणि कुठे अधिक प्रगती करण्यास वाव आहे, हे लक्षात येण्यास त्यामुळे काही प्रमाणात का होईना, मदत होते. शाळेत आठवीपर्यंत उत्तीर्णच व्हायचे असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दडपणाविना विद्यार्थ्यांना नंतरच्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या ताणांची, स्पर्धाची समजच येऊ शकत नसे. या परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाची अमलबजावणी करताना अनुत्तीर्णाना पुन्हा एकदा संधी दिली जाणार असून त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यांला त्याच वर्गात बसावे लागणार आहे. परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रातून उलटसुलट टीका होत होती. शिक्षण गुणवत्तापूर्ण असायला हवे आणि विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देणारे असायला हवे, हे खरे असले, तरीही राज्यातील विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या, शाळांची, शिक्षकांची आणि शैक्षणिक वातावरणाची परिस्थिती पाहता ‘प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याला मदत करणे’ ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट ठरते. शिक्षणाच्या मुळाशी विद्यार्थ्यांमधील कुतूहल वाढवून, त्याला शिकण्याची, नवे काही समजून घेण्याची इच्छा निर्माण करण्याचे तत्त्व असायला हवे. पाठय़पुस्तकांच्या बाहेर कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचलेल्या माहितीच्या जगात विद्यार्थ्यांना संकल्पना किती आणि कशा समजल्या ते पाहणे एवढाच परीक्षेचा हेतू असायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा