मणिपूरमधील गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे आधीच्या जखमांवरील भरू लागलेल्या खपल्या पुन्हा निघाल्या आहेत. या भळभळीवर निव्वळ फुंकर घालून उपयोगाचे नाही. त्यावर कायमस्वरूपी मलमपट्टी करण्याचीच गरज आहे. ज्या क्रौर्याने तेथील प्रतिस्पर्धी जमाती आजही परस्परांचे जीव घेण्यास आतुर आहेत, ते पाहता दुभंगलेली मने सांधण्याची मोहीम अजूनही यशस्वी ठरलेली नाही असेच म्हणावे लागेल. ताज्या असंतोषाच्या मुळाशी एक चकमक आहे. यात दहा कुकी ‘बंडखोरां’नी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या कुकींचे शवविच्छेदन अहवाल दडवले जात असल्याचा आरोप करत कुकींनी संबंधित रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. ज्या जिरिबाम जिल्ह्यात हा प्रकार घडला, तेथे वांशिक हिंसाचाराच्या घटना फारशा घडत नाहीत. मे २०२३ पासून या राज्यात मैतेई आणि कुकी-झो या जमातींमध्ये सुरू झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला असून, ५० हजारांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना अजूनही परिस्थिती आटोक्यात आणता आलेली नाही. ते भाजपचे आहेत. केंद्रातही भाजपचेच सरकार आहे. पण या ‘डबल इंजिन’ योजनेचा लाभ मणिपूरमध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अजून तरी झालेला दिसत नाही. जिरिबामसह आणखी काही पोलीस ठाणी आता लष्करी विशेषाधिकार कायद्याच्या (अफ्स्पा) कक्षेत आणण्याची अधिसूचना गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली. आतापर्यंत ही ठाणी वगळून उर्वरित मणिपूरमध्ये ‘अफ्स्पा’ लागू होता. म्हणजे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘अफ्स्पा’ लागू करावा, तर तो असूनही शांतता नांदत नाहीच असे हे दुष्टचक्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा