नरो वा कुंजरो वा… महाभारतातला एक कलाटणी देणारा प्रसंग. संदेशाचे मार्ग खेळ पालटणारे ठरू शकतात याचे हे उत्तम उदाहरण. राज्य करणे म्हणजे केवळ युद्धे करून सीमांचे संरक्षण करणे नसून जनमत बनविणे, त्याला बळकट करणे, प्रसंगी त्याच्याशी छेडछाड करणे, जनतेशी संवाद साधणे, कठीण प्रसंगी संदेशाची देवाणघेवाण रोखणे, इतर देशांत आपल्या फायद्यानुसार कथानके पेरणे आणि त्यांना खतपाणी देणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. कौटिल्याच्या काळापासून या सर्व युक्त्यांचा वापर राज्यकारभारात झाल्याचे आढळते. मात्र २० व्या शतकात संदेशप्रसाराला साथ मिळाली ती तंत्रज्ञानाची. माध्यमतंत्रज्ञानाच्या प्रभावाने युद्धांचे स्वरूपच बदलून टाकले, विचारप्रवाहांना बळकटी दिली. सत्य आणि प्रचार यांच्यातील रेषाही पुसट केल्या. या तंत्रज्ञानाने ठरविले की समाजात कोणाचा स्वर प्रबळ होईल आणि कोणाला इतिहासाच्या पानांतून हद्दपार केले जाईल. माध्यमतंत्राची जागतिक उड्डाणे महायुद्धे ही मोठ्या बदलांचे आरंभबिंदू! अस्तित्वाचा प्रश्न येतो तेव्हा सृजनाची आणि विध्वंसाची गती कैकपटीने वाढते. संपर्क माध्यमांनी पहिल्या महायुद्धात एकाच वेळी अनेकांच्या दारात पोहोचण्याचे प्रभावी तंत्र अवगत केले. वृत्तपत्रे, भित्तिपत्रके आणि चित्रपटांच्या माध्यमातून मित्र आणि अक्ष राष्ट्रांनी युद्धासाठी नागरिकांचे जनमत बळकट करण्यास सुरुवात केली. १९१५ मध्ये ब्रिटनने प्रकाशित केलेला ब्राईस अहवाल जागतिक पातळीवर लोकप्रिय झाला आणि जर्मनीविरुद्ध लोकमत एकत्रित झाले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर्मन अत्याचारांचे वर्णन करण्यात आले होते. ते बनावट असल्याचे नंतर सिद्ध झाले. झिमरमन तार या घटनेत जर्मनीचा मेक्सिकोशी युद्धात लष्करी युती करण्याचा प्रस्ताव उघडकीस आला. त्याच्या व्यापक प्रसिद्धीमुळे अमेरिकेच्या युद्धातील सहभागाच्या निर्धारास गती मिळाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा