तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे बहुतांश शिक्षण गुरुकुल पद्धतीच्या व्यवस्थेतून झाले. प्राज्ञपाठशाळा, वाईची शिक्षण पद्धती लक्षात घेता मौखिक अध्ययन-अध्यापनावर भर असायचा. त्यातही स्वयंशिक्षण हेच ज्ञानप्राप्तीचे महाद्वार होते. एका अर्थाने तर्कतीर्थांची प्राच्यविद्या विशारद म्हणून झालेली घडण ही अनौपचारिक शिक्षण पद्धतीची परिणती होती, म्हणून त्या घडणीला स्वयंप्रज्ञता आणि स्वावलंबनाचे अधिष्ठान होते. त्यात गुरू स्वामी केवलानंद सरस्वतींचा सिंहाचा वाटा होता. तो तर्कतीर्थांनी वेळोवेळी मान्य तर केला आहेच, शिवाय त्यांचे समाधी स्मारक उभारणे, त्यांच्या मीमांसाकोश (सात खंड), धर्मकोश (पाच खंड / २० भाग) यांचे संपादन व प्रकाशन कार्य, संस्कृत हस्तलिखित ग्रंथ विवरण सूची (भाग १, २) ची पूर्तता ही गुरूऋणातून मुक्त होण्याची सकारात्मक कृती आणि श्रद्धांजलीच होती. प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांनी लिहिलेले संस्कृत निबंध तसेच चरित्र, मानपत्र इत्यादींचे लेखन नोंद घेण्याजोगे ठरते. ‘शुद्धिसर्वस्वम्’ (१९२८), ‘भारतीय धर्मतिहासतत्त्वम्’ (१९३३), अस्पृश्यत्व -मीमांसा (१९३४), ‘श्रीकेवलानंदयतेश्चरित्रसार:’ (१९६०) यांचा त्यात अंतर्भाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या विशारद परिषदांत तर्कतीर्थ नेहमी हजेरी लावत. ती केवळ प्रातिनिधिक उपस्थिती नसे. वेळोवेळी फ्रान्स, अमेरिका, रशिया, ब्रह्मदेश येथे संपन्न अशा परिषदांत मूलभूत संशोधनावर आधारित प्रस्तुत केलेले शोधनिबंध हे तर्कतीर्थांच्या परिणत प्रज्ञेचे पुरावे होत. विशेषत: वैश्विक स्थिती आणि वैदिक देवतांचे सामूहिक संबंध (दि कॉस्मिक स्टेट अँड कलेक्टिव्ह किनशिप ऑफ वैदिक गॉडस्) सारखा त्यांचा शोधनिबंध हा प्राच्याविद्योतील त्यांचा अधिकार अधोरेखित करतो. प्रस्तुत शोधनिबंध तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १६ ते २२ जुलै, १९७३ ला पॅरिसमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या विशारद परिषदेत वाचलेला होता नि तो त्या परिषदेच्या इतिवृत्तात (प्रोसीडिंग्ज) प्रकाशित झालेला आहे. ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय, खंड- ९’ (लेखसंग्रह- संकीर्ण)मध्ये तो मराठी भाषांतरासह जिज्ञासू वाचकांना वाचण्यास उपलब्ध आहे.

भारतीय प्राच्याविद्या वाङ्मय मूलत: संस्कृत भाषेत लिहिले गेले आहे. वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद, श्रुती, वाङ्मय आणि महाकाव्ये, धर्मसूत्रे, पुराणे, वेदांगे इ. स्मृती ग्रंथ यांचा त्यात प्रामुख्याने अंतर्भाव होतो. या सर्व वाङ्मयाचा तर्कतीर्थांनी प्राज्ञपाठशाळेत विधिवत अभ्यास केला होता. पुढे काशी येथे जाऊन त्यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवीचा अभ्यास करीत व्याकरण, न्याय, मीमांसा आणि वेदांताचे अध्ययन केले. यातून त्यांना संस्कृत विद्या, भारतविद्या (इंडॉलॉजी) उमगली. त्याआधारित त्यांचे ‘हिंदुधर्माची समीक्षा’, ‘वैदिक संस्कृतीचा विकास’, ‘सर्वधर्मसमीक्षा’, ‘शिखांचा पंथ व इतिहास’, ‘आद्या शंकराचार्य : जीवन आणि विचार’सारखे मराठी ग्रंथ निर्माण झाले. ते मूलत: भाषणसंग्रह असले तरी भारत विद्योची ती अभिजात साधने आहेत. संस्कृत विद्योत पारंगत व्हायचं तर त्या विशेषज्ञास संस्कृत हस्तलिखित ग्रंथ (पोथ्या) नित्य चाळाव्या लागतात. ‘धर्मकोश’ संपादनाच्या निमित्ताने प्राज्ञपाठशाळेमधील संस्कृत विद्वानांनी जमविलेल्या सुमारे अकरा हजार संस्कृत हस्तलिखित ग्रंथांची दोन भागांत जी विवरण सूची संपादित केली आहे, ती तर्कतीर्थांचे प्राच्यविद्या विशारदत्व सिद्ध करण्यास पुरेशी आहे.

संस्कृत भाषेवरील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा अधिकार ज्यांना समजून घ्यायचा आहे, त्यांना तर्कतीर्थांनी ‘भारतीय राज्यघटना’ (१९५२)चे ‘भारतस्य संविधानम्’ शीर्षकाने केलेले भाषांतर वाचले तरी प्रत्यय येईल. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषांमधील तर्कतीर्थांची भाषणे, लेख, मुलाखती, प्रबंध, शोधनिबंध त्यांना बहुभाषाविद सिद्ध करतात. तर्कतीर्थांच्या या कार्याचे समालोचन करताना संस्कृत कोश विशेषज्ञ चिं. ग. काशीकर यांनी म्हटले आहे की, ‘‘विश्वसंस्कृतीचा एक स्पृहणीय भाग म्हणून भारतीय संस्कृतीच्या भूत-वर्तमान-भविष्याचे स्वरूप विशद करणे आणि संस्कृतीच्या उन्नतीची चिंता वाहणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले आहे. विश्वसंस्कृतीच्या अभ्यासाची पूर्वतयारी म्हणून त्यांनी प्रथम भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. तो करण्यासाठी ती संस्कृती जिच्यामध्ये प्रामुख्याने निविष्ट झाली आहे, त्या संस्कृत विद्योचे त्यांनी प्रगाढ अध्ययन केले.’’

drsklawate@gmail.com