महेश सरलष्कर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना थांबण्याचा सल्ला दिलेला आहे. काका ८३ वर्षांचे झाले आहेत, त्यांनी आता राजकारणात सक्रिय राहू नये, असे ते म्हणाले. तरुणांनाही संधी दिली पाहिजे, ज्येष्ठांनी पदे सोडली नाहीत तर ही संधी मिळणार नाही असे अजित पवारांचे म्हणणे आहे. अजित पवारांच्या म्हणण्यात तथ्य असेल; पण इथे प्रश्न वयाचा नाही तर परिपक्वतेचा असू शकतो. काँग्रेसचे उदाहरण द्यायचे तर पक्षात तरुणांना संधी मिळालीच नाही असे नव्हे. तरुण नेतृत्वाला पक्ष नीट सांभाळता आला नाही. अखेर ऐंशीपार केलेल्या मल्लिकार्जुन खरगेंकडे पक्षाध्यक्षपद द्यावे लागले, ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल?
भाजपने देशाचे राजकारण द्वेषाने भरून टाकल्यानंतर अत्यंत बिकट काळात खरगेंनी काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे. वयाच्या ८० व्या वर्षी भाजप आणि संघाविरोधात आक्रमक आणि कडवी भूमिका घेणारा आत्ताच्या घडीला काँग्रेसमध्ये दुसरा परिपक्व नेता नाही. २०१९ नंतर पहिल्यांदाच काँग्रेसबद्दल आशा निर्माण होऊ लागली आहे, त्याचे थोडे तरी श्रेय खरगेंना दिले पाहिजे. अजित पवारांप्रमाणे काँग्रेसमधील कोणीतरी खरगेंना थांबण्याचा सल्ला दिला तर काँग्रेसचे काय होईल, याचा केवळ विचार केलेला बरा!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पद फेकून देणारे राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेनंतर नव्या अवतारातील राहुल गांधी यांच्यामध्ये फरक जरूर आहे. काँग्रेसच्या निर्णयप्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका निभावतही असतील. पण, आत्ताच्या राजकीय वादळात भरकटलेल्या काँग्रेसला पुन्हा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न खरगे मनापासून करताना दिसतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची महाआघाडी यशस्वी होऊ शकते ही भीती भाजपच्या मनात निर्माण होणे हीच मोठी गोष्ट म्हणायची. २०१९ मध्ये जे घडले नाही ते खरगे आणि नितीशकुमार यांच्यासारख्या सत्तरी आणि ऐंशीतील नेत्यांमुळे शक्य झालेले आहे. विरोधकांच्या ऐक्यासाठी काँग्रेस तडजोड करायला तयार झाला, त्यामागे खरगेंचा गंभीर विचार कारणीभूत आहे. एकटे राहुल गांधी काँग्रेसची संघटना सांभाळत असते तर कदाचित विरोधकांचे ऐक्य ही कल्पनेतील बाब ठरली असती. खरगेंनी इतर विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधला, नितीशकुमार यांनी नंतर पुढाकार घेतला. दिल्लीत खरगेंच्या घरी बैठका झाल्या, पाटण्यात बैठक झाली, तिथे राहुल गांधींनी घेतलेली सामंजस्याची भूमिका ही खरगेंच्या परिपक्वतेचे द्योतक म्हटले पाहिजे. पाटण्यामधील काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांसमोर त्वेषाने बोलले पाहिजे. पण, विरोधकांच्या बैठकीत भाजपविरोधी अजेंडा पुढे नेणारी मुद्देसूद मांडणी केली पाहिजे, हे राहुल गांधींमध्ये आलेले शहाणपण खरगेंशिवाय कदाचित शक्य झाले नसते.
पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहिलेल्या खरगेंकडे पक्षाध्यक्षपद येण्यापूर्वी काँग्रेसमध्ये निर्नायकी होती. राहुल गांधींचे निष्ठावान आणि लोकांचे पाठबळ नसलेल्या गुलाम नबी आझाद यांच्यासारखे ज्येष्ठ नेते यांच्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू होता. काँग्रेसमधून एकामागून एक नेते भाजपमध्ये जात होते. पंजाबसारख्या छोटय़ा राज्यांतदेखील नेत्यांमध्ये बेदिली माजली होती. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांचा गट भाजपला मिळून सत्ताधारी झाला होता आणि राजस्थानात सचिन पायलट यांनी बंड केले होते. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातून विस्तव जात नव्हता. महाराष्ट्रात काँग्रेसमधील नेते आपल्याच सहकाऱ्यांला निवडणुकीत पराभूत करत होते. काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याने संसदेमध्ये विरोधी पक्ष विखुरलेला होता. खरगेंनी न बोलता; पण खमकेपणाने पक्षातील बंडखोरी हळूहळू मोडून काढण्यास सुरुवात केली आहे. खरगेंनी ज्येष्ठ नेत्यांना फोन करून पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन केले. काँग्रेसच्या मुख्यालयात अशोक गेहलोत यांच्यापासून जी-२३ गटातील एखादा अपवाद वगळता सर्व नेते खरगेंचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते. काँग्रेसमधील जी-२३ गट संपुष्टात आला आहे. खरगेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कर्नाटक जिंकले. मध्य प्रदेशचे नेतृत्व कमलनाथ यांच्याकडे देण्यात आले आहे. छत्तीसगढमध्ये पक्षांतर्गत नेतृत्वाचा प्रश्न सामंजस्याने मिटलेला आहे. राजस्थानमध्ये खरेंनी गेहलोत आणि पायलट या दोघांना नि-संदिग्धपणे ‘झाले ते पुरे झाले, आता निवडणूक जिंकून द्या’, असे निक्षून सांगितलेले आहे. खरगेंच्या स्पष्टवक्तेपणाचा सचिन पायलट यांच्यावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसू लागले आहे. खरगेंच्या आदेशानुसार वागू, असे पायलट यांनी जाहीरपणे सांगितले आहे. आता खरगे महाराष्ट्राकडे वळण्याची शक्यता आहे!
खरगेंबद्दल इतके लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत विचारांशी तडजोड न करता भाजपविरोधात लढण्याची तयारी दाखवणाऱ्या अपवादात्मक नेत्यांमध्ये खरगे येतात. त्यांच्या हातून तीन वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद हिरावून घेतले गेले होते, तरीही ते काँग्रेसमध्ये राहिले. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी भाजपशी जवळीक साधली नाही. अजित पवारांप्रमाणे खरगेंना मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, गांधी घराणे मला संधी देत नाही असे म्हणता आले असते. पण, त्यांनी भूतकाळातील अन्यायाचा पाढा वाचणे टाळले. आता हेच खरगे काँग्रेस पक्षाला संकटातून बाहेर काढत आहेत, पक्षाला निवडणूक जिंकून देत आहेत. पक्षांतर्गत घडी पुन्हा बसवत आहेत तेही वयाच्या ऐंशीव्या वर्षी. राज्या-राज्यातील प्रादेशिक पक्ष नष्ट करण्याचा घाट घातलेल्या भाजपमध्ये अनेक नेते विरघळून गेले आहेत. अशा वेळी काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेऊन भाजपशी मुकाबला करण्याची आखणी करत आहे. कधीकाळी काँग्रेसवर नाराज होऊन देशभर प्रादेशिक पक्ष जन्माला आले, त्यांनी काँग्रेसच्या विरोधात वेळोवेळी भाजपची मदतही घेतली. पण, आता याच प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची मदत घ्यावी लागत आहे. काँग्रेसमधील अजूनही काही नेत्यांना पक्षाने एकटय़ाने लोकसभा निवडणूक लढवली पाहिजे, असे वाटत असले तरी, पूर्वीचा अजेंडा राबवण्याची ही वेळ नाही याची जाणीव असल्यामुळे पाटण्यातील बैठकीत जागावाटपाबाबत काँग्रेस लवचीकता दाखवेल असे राहुल गांधी म्हणाले. ही सामंजस्याची भूमिका प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन जाणारी आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेसला इतर पक्षांशी तडजोड करावी लागणार नाही. शिवाय, अनेक राज्यांमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला कमाल जागा मिळाल्या आहेत, तिथे २०२४ मध्ये कदाचित भाजपच्या जागा घटण्याची शक्यता असू शकते, ही संधी काँग्रेसने साधली तर आगामी लोकसभेतील काँग्रेसचे चित्र बदललेले दिसेल. या संभाव्य यशाचे श्रेय काँग्रेसच्या अनुभवी नेतृत्वाला द्यावे लागेल. नाही तर काँग्रेसमधील कोणी उपटसुंभ खरगेंनाही थांबा म्हणेल! महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीसाठी काकांना विरोधकांची मोट बांधावी लागेल, त्यासाठी ते पुन्हा सक्रिय झाले असतील तर त्यांना थांबा कसे म्हणणार?