राजेश बोबडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘भारतवर्षांला स्वराज्य मिळून त्याने लोकशाही राजवटीलाही आरंभ केला आहे. परंतु अजूनही जनतेच्या अडचणी नाहीशा झालेल्या नाहीत, दैनंदिन जीवनाचेही प्रश्न सुटलेले नाहीत. अशा वेळी सामान्य माणसासमोर हा प्रश्न साहजिकच उभा राहतो की, स्वराज्य किंवा लोकशाही ती हीच आहे का? याच ध्येयासाठी आमच्या वीरांनी बलिदान दिले. पुढाऱ्यांनी तुरुंगात जीवन घालविले आणि आम्ही वाटेल ते हाल सोसलेत का? त्याचे उत्तर बाहेर धुंडाळण्याची गरज नाही.

हेही वाचा >>> चिंतनधारा : भजन-कीर्तन पोट भरण्याचा धंदा नसावा

‘‘राजा कालस्य कारणम्’ या नात्याने सरकारच परिवर्तन घडवून आणू शकते व म्हणूनच ही सत्ता आपल्या लोकांच्या हातात यावी यासाठी आपण सतत धडपड करीत आलो आहोत. आजच्या राष्ट्राच्या जीवनात हजारो रोगांनी ठाण मांडले आहे. त्यांचे उच्चाटन केवळ सरकारच्या कायद्याने होऊ शकणार नाही. सरकारसमोर जे ठळक प्रश्न आहेत, त्यांची समाधानकारक व्यवस्था लावणे सोपे नाही; मग या विशाल राष्ट्राच्या व्यापक जीवनातील साऱ्या भानगडींची व्यवस्था लावता येणे कसे शक्य आहे? म्हणूनच सत्तेपेक्षा सेवा हा रामबाण उपाय आहे. जनतेची योग्य सेवा, हीच खेडय़ापाडय़ांतील रहिवाशांच्या जीवनाला योग्य वळण लावून सर्वत्र रामराज्याची निर्मिती करू शकते. स्वराज्य हे नुसते पुढाऱ्यांना मिळाले नसून, प्रत्येकाला मिळाले आहे. आपली जबाबदारी वाढली आहे. राष्ट्र सुखी, समृद्ध व उन्नत करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. आम्हाला जर रामराज्याची-समतेच्या व शांतिसुखाच्या सत्ययुगाची तळमळ असेल तर आमच्या आसपास आम्ही त्याच गोष्टी वाढविल्या पाहिजे; त्याविरुद्ध ज्या ज्या गोष्टी आढळतील त्यांचा प्रतिकार केला पाहिजे आणि उत्तम कार्याचीच प्रेरणा दिली पाहिजे. देशातील प्रत्येक सुज्ञ घटकाने हे कार्य केल्यास आजच देशात रामराज्य नांदू लागेल!’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: संतांच्या अनुयायांकडून जनतेची लूट?

‘‘देशाच्या उन्नतीची नुसती व्याख्याने दिल्याने देश उन्नत होणार नाही. त्यासाठी, प्रत्यक्षात चार लोकांना तरी सुधारता आले पाहिजे. उणीव दिसली की ती पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे भरून काढूनच पुढे पाऊल टाकले पाहिजे. अन्यायावर तुटून पडले पाहिजे. व्यक्ती स्वतंत्रपणे या गोष्टी सफल करू शकत नाही, म्हणून अशा व्यक्तींच्या संघटना गावागावांतून निर्माण केल्या पाहिजेत. अन्यायांना वाचा फोडली पाहिजे; ते सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजेत. प्रसंगी स्वत:च संघटितपणे सत्याग्रहाच्या मार्गाने ते दूर केले पाहिजेत. जनतेला आवश्यक सोयी निर्माण करण्यासाठी एकमताने सर्वांनी रचनात्मक कार्य केले पाहिजे. आपण जी प्रार्थना करतो, भजने म्हणतो किंवा ईश्वराची भक्ती करतो तिचा उद्देश हाच आहे की, आपल्या हृदयात असे सत्संकल्प दृढ व्हावेत. आपल्या हातून जनताजनार्दनाची सतत सेवा घडावी. ही शक्ती जर आपल्यात नसेल तर ती प्रार्थना नसून थट्टा आहे.

एकजुटीने समाजजीवन सुखी व सुरक्षित करण्यासाठी झटल्यास रामराज्य निर्माण होणे अवघड नाही.

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj expresse view on ram rajya rule zws