‘धार्मिक क्षेत्रातील दुर्दशा संपविण्यासाठी मला त्यागी कर्मवीर पाहिजेत’,  असे सांगून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या प्रचारकांना उद्देशून म्हणतात : खेडय़ाखेडय़ांतून प्रेमाने व त्यागाने कार्य करणारे सेवक तुम्ही तयार करावेत यासाठीच तुमची नेमणूक प्रचारक म्हणून करण्यात आली आहे. स्वतंत्ररीतीने प्रचारकार्य करून प्रत्येक गावात एक बाणेदार मनुष्य सेवेसाठी तयार कराल तर शूरतेचे काम केलेत असे मी समजेन. तुम्ही एकेक मनुष्य असा बनवा. त्याचेकडून खासगी रीतीने प्रतिज्ञा घ्यायला लावा. त्याची जिवंत असेपर्यंत गावात कार्य करण्याची तयारी असली पाहिजे, इतके खंबीर त्याला बनवा. याशिवाय भारताची हाक परमेश्वराच्या कानावर पोहोचू शकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरास आग लागली तर लोक धावून येत नाहीत म्हणून मनुष्य स्वस्थ बसत नाही, तर आपल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करतोच! तसेच आजच्या भयानक स्थितीतही आम्ही आमच्या परीने राष्ट्रसेवेचा प्रयत्न करीतच आहोत. अर्थात पाठीशी धडाडीचे लोक नाहीत म्हणून पाय उचलणे आम्हास जड जात आहे. यासाठी तुम्ही माझे मदतगार बना. त्यागाने आणि श्रद्धेने लोकांना समजावून कार्यप्रवृत्त करा. भारतवर्ष ईश्वराच्या श्रद्धेने चालत असला तरी कर्तव्यवान लोकावाचून ईश्वराने काय करावे? तुम्ही एका विचाराची, एका मनाची पाच-पन्नास माणसे तयार करून माझ्याकडे पाठवा. समाजाला सुखी करण्याचे तत्त्वज्ञान शिकवा. अन्याय सहन करणार नाहीत अशी तेजस्विता लोकांमध्ये निर्माण करा. मी आशा करतो की तुम्ही गावागावातून हा संदेश पोहोचवाल.  स्वराज्य टिकविण्याचे सामर्थ्य बहुसंख्य जनतेत असल्याखेरीज ते टिकत नसते. आजचे स्वराज्य हे खरे स्वराज्यच नव्हे. कारण स्वराज्य मिळविणारे एक दल आहे तर त्यांच्या पाठीशी एक आवाज देऊन ते सांभाळणारे दुसरे दल तयार नाही. स्वराज्य सांभळण्यासाठी प्रत्येक खेडय़ात सात्विक, क्रांतिकारी व निर्भय सैनिक तयार झाल्याखेरीज ते टिकणार नाही अशी माझी खात्री आहे. आज तर मेंढरे हाकलण्याची पाळी आली आहे. जो जास्त कुशलतेने मेंढरे हाकलतो तोच पुढारी गणला जातो, असे दिसते. माणसे मरतात त्याचे तत्त्वज्ञान मरत नसते. योजना मरत नसतात. आपल्या पिढीत ही योजना कदाचित यशस्वी झाली नाही तरी पुढच्या पिढीची ती संस्कृतीच बनणार आहे. जीवनाच्या प्रत्येक बाजूवर राष्ट्रीयतेची भावना आदळणार आहे हे निश्चित समजा.

महाराज ग्रामगीतेत म्हणतात : 

ग्राम सुधारावयाचा मूलमंत्र।

उत्तम पाहिजे प्रचारतंत्र ।

प्रचारकांवाचून सर्वत्र।

नडते आहे।।

राजेश बोबडे

rajesh772@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtrasant tukdoji maharaj lecture on plight in the religious sector zws
Show comments