नदी कुणासाठी जीवनदायिनी तर कुणासाठी माय… कित्येक शहरं, गावं नद्यांवर वसलेली. कैकांचा पिंड या पाण्यावर पोसलेला आणि स्वभावांचे विशेषही त्यानुसार ठरलेले. माणसांपासून ते मुक्या जनावरांपर्यंत सर्वांच्याच जगण्याला नदीचा भक्कम आधार. शांत नदीचा प्रवाह. संध्याकाळचे सगळे रंग पाण्यात उतरले आहेत. अजून अंधार पडायचा आहे. नदीकाठच्या गवताचा अशा वेळी एक उग्र असा वास यायला लागतो. दिवसभर स्वत:च्या बाहूंनी अंतर कापणारा नावाडी किनाऱ्यावर विसावला आहे. त्या नावाड्याची छाया नदीच्या पाण्यावर दूरवर पसरली आहे. जराशा तरंगानेही ती डचमळते… किंवा एखाद्या घाटावर दिवे प्रवाहात सोडले जात आहेत आणि अशा असंख्य दिव्यांची तारकादळे जणू पाण्याच्या पृष्ठस्तरावर हेलकावत हेलकावत पुढे पुढे जात आहेत. कधी एखाद्या ठिकाणी सुंदर असे झोकदार वळण घेऊन मार्गस्थ झालेली नदी अचानक लुप्त होते, दिसतच नाही. कुठे एखाद्या नदीचे पात्र अक्षरश: रखरखीत. विवस्त्र अवस्थेतली ही नदी अगतिक, असहाय भासू लागते. कुठे नदीचा प्रवाह अतिशय संथ गतीने तर कुठे तिची उतावीळ लगबग आणि पुढे निघून जाण्याची घाई… कुठे फेसाळत्या पाण्यासह दुथडी भरून वाहणारी तर कुठे अरुंद प्रवाहात अक्षरश: तटतटून जाणारी. नदीची अशी असंख्य दृश्यरूपे, चित्रे आपल्या मनावर कोरलेली. कुणासाठी ती जीवनदायिनी तर कुणासाठी माय… कित्येक शहरं, गावं नद्यांवर वसलेली. कैकांचा पिंड या पाण्यावर पोसलेला आणि स्वभावांचे विशेषही त्यानुसार ठरलेले. माणसांपासून ते मुक्या जनावरांपर्यंत सर्वांच्याच जगण्याला नदीचा भक्कम आधार. ती वाहते म्हणजे जणू सर्वांना जगण्याचीच हमी देते. अनेक साम्राज्ये नदीतटावर स्थापित झाल्याची साक्ष मिळते. कित्येक ठिकाणी मोठमोठ्या नद्यांना अडवून त्यांचे पाणी शेताशिवारात खेळवले गेले आणि त्यामुळे त्या परिसरात एक समृद्धी आली. पण नद्यांनी केवळ जीवनच दिलंय असं नाही तर भारत जोडण्याचंही काम केलंय. राज्याच्या आणि देशाच्याही सीमा ओलांडून या नद्या वाहत राहतात. त्यांचे प्रवाह माणसांना जोडून घेतात. सळसळणाऱ्या मासोळ्यांमुळे प्रवाहात उमटणारे शहारे आणि किनाऱ्यापर्यंत येणाऱ्या माणसांची सुखदु:खं, वेदनेचे कढ नद्यांशिवाय कोणाला माहीत असणार…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय साहित्यात कित्येक लोककथा, कहाण्या, गीतं, कविता नदीचं वर्णन करणाऱ्या आहेत. नदी म्हणजे जणू जिवंत हाडामांसाची गोष्ट. ‘गंगा आये कहाँ से’पासून ते ‘जमुना किनारे मेरा गाँव’पर्यंत नदीशी नातं सांगणाऱ्या असंख्य उत्कट अशा गोष्टी. प्रवासात नदी पार करताना किंवा एखाद्या पुलावरून जातानाही जवळचं एखादं नाणं श्रद्धेनं नदीच्या पात्रात भिरकावत मनात काही तरी पुटपुटणारी असंख्य भोळीभाबडी माणसं आपल्याला दिसतात. भारताचा इतिहास प्रांताच्या, राज्याच्या नुसार लिहिण्याऐवजी तो जर नद्यांच्या नुसार लिहिला गेला तर लोक आणि निसर्ग यांच्यातील नात्यांच्या घनिष्ठ संबंधांची प्रचीती येईल असे एक निरीक्षण काका कालेलकर यांनी नोंदवून ठेवले आहे. नद्यांनी आपलं जीवन समृद्ध केलंय. हे निर्विवाद! विनोदकुमार शुक्ल यांची कविता आहे, ‘जो मेरे घर कभी नही आयेंगे’… जे माझ्या घरी कधी येणार नाहीत, मी त्यांना भेटायला त्यांच्या जवळ जाईन. एक उधाणलेली नदी कधीच येणार नाही माझ्या घरी. नदीसारख्या लोकांना भेटण्यासाठी मी नदीकिनारी जाईन.

‘जीवनलीला’ हे काका कालेलकर यांनी लिहिलेलं पुस्तक. देशातल्या अनेक नद्यांना भेटी दिल्यानंतरचे हे अनुभव आहेत. मूळ गुजराती असलेल्या या पुस्तकाचा अनुवाद रवींद्र केळकर यांनी हिंदीत केला आहे. नद्यांच्या संस्कृतीविषयी; मोठमोठे तलाव, सरोवर, प्रपात यांच्याविषयी खूपच रोचक पद्धतीने त्यांनी लिहिलेलं आहे. ‘यात्रावर्णन’ असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. नद्यांना त्यांनी लोकमाता म्हटलंय. नद्यांच्या उगमाची पार्श्वभूमी, त्यांची वाहण्याची गती, वाटा-वळणं, त्यावरून त्यांचे स्वभाव, नद्यांसाठी दिलेली विशेषणं खूप अर्थपूर्ण आहेत. ‘सखी’ मार्कंडी, ‘उभयान्वयी’ नर्मदा, ‘सेवाव्रता’ रावी, ‘स्तन्यदायिनी’ चिनाब,‘गुर्जरमाता’ साबरमती ही काही वानगीदाखल नावं… तुंगभद्रा, पिनाकिनी, गोदावरी, रेणुका, घटप्रभा, वाघमती, लुनी अशा अनेक नद्यांची वर्णने या पुस्तकात आहेत.

नद्या समतल जमिनीवरून धावतात तेव्हा त्यांना कोणतेही अडसर जाणवत नाहीत, पण डोंगरामधून, विशाल पहाडातून वाहणाऱ्या नद्यांना अडथळे आहेत. तिस्ता नदीबद्दलची नोंद करताना काका कालेलकर म्हणतात, की या नदीला जर विचारलं तर ही नदी म्हणेल मी स्वभावाने नागीण नाही. वळणं घेत चालणं माझा स्वभाव नाही पण ते माझं प्राक्तन आहे. ‘तिस्ता पार वृत्तांत’ ही देवेश राय या बंगाली लेखकाची कादंबरी आहे. तिस्ता नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या उठावाची ती बृहतकादंबरी मानली जाते. रूढ अर्थाने या कादंबरीत कोणीच नायक, नायिका केंद्रस्थानी नाहीत. नदी, जंगल, पर्यावरण या गोष्टींबद्दल ही कादंबरी बोलत राहते. ‘गाथा तिस्ता पार की’ या नावाने हिंदीत आणि ‘तिस्ते काठचा वृत्तांत’ या नावाने ती मराठीतही उपलब्ध आहे.

अर्थात प्रत्येक वेळी नदीची रूपं विलोभनीयच असतील असं नाही. अनेकदा तिचा भयप्रद अवतार जनजीवन उद्ध्वस्त करून टाकतो. ‘नदी कोपणे’ या शब्दाच्या उच्चारानेही थरकाप उडतो. फणीश्वरनाथ रेणू यांनी ‘बिहार’मधल्या कोसी या नावाच्या एका महत्त्वाच्या नदीवर ‘डायन कोसी’ हा रिपोर्ताज लिहिला आहे. डायन या शब्दातच नदीच्या रौद्रतेविषयी कळून जातं. विच्छिन्न झालेली ‘कोसी’ एका सुनसान रात्री आपलं असली रूप दाखवत गरजत येते. रेणू तिचं वर्णन करतात. आली… मैया आली. प्रचंड उधाणलेल्या लाटा आणि लहरी यांचं तांडव नृत्य… माणसं, पशुपक्षी भयभीत होतात. कोसीचा प्रचंड गडगडाट आणि अक्राळविक्राळ पुरासोबत वाहत जाणाऱ्या प्राण्यांच्या आर्त किंकाळ्या, माणसांचे भयव्याकूळ आवाज हळूहळू वाढत जातात. माहीत नाही कोसी आपल्या माहेरी कधी पोहोचेल… जोवर माहेरी पोहोचत नाही तोवर या बाईचा राग काही केल्या शांत होत नाही. पूर्व मुलखातल्या बंगालमधून आपल्या सासरच्यांवर रागावून, भांडून ही मैया पश्चिमेकडे आपल्या माहेरी रडत-पडत, ऊर बडवत, डोकं आपटत जात आहे आणि तिच्या अश्रूंचे नदी-नाले वाहू लागले आहेत. रेणू यांचं गाव अशा इलाख्यात आहे की जिथे पश्चिम, पूर्व आणि दक्षिणेच्या बाजूने असणाऱ्या कोसी, पनार, महानंदा, गंगा या नद्यांच्या पुराचा फटका बसलेले असंख्य जीव आश्रयाला येतात. आणि पूर ओसरल्यानंतर पुन्हा त्यांच्या जगण्याच्या धडपडीला सुरुवात होते. या आश्रयाच्या ठिकाणावरून ते पुन्हा आपल्या गावाकडे निघू लागतात. त्याचं वर्णन त्यांनी केलंय, ‘सर्वस्व गमावलेल्या लोकांचे जथे झुकलेल्या मानेने, उरल्यासुरल्या आपल्या जितराबाला हाकत, कोंबड्या, बकरे, लहान लेकरं अशा सगळ्यांचं ओझं पाठीवर, एखाद्या बैलगाडीवर टाकून आपापल्या गावाकडे परतत असतात… तिथं ना त्यांचं खोपटं शिल्लक उरलेलं आहे ना चिमूटभर धान्य. तरीही त्यांची पावलं गतीने पडत राहतात.’ ही झाली नैसर्गिक आपत्ती पण काही गोष्टी माणसाने स्वत: ओढवूनही घेतल्यात.

माणूस नद्यांवर आक्रमण करायला लागला. तिच्या अंगणात घर बांधायला लागला. कित्येक शहरांनी पूररेषा ओलांडून आगळीक केलीय. वाळूसाठी असंख्य नदीपात्रांची चाळण झालेली आहे. नद्यांचे प्रवाह बदललेत. घाण सांडपाणी, घातक रसायनं नदीच्या पात्रात सोडून दिले जातात. प्रवाह गढूळ होतो. नद्यांचे पाणी विषारी होऊ लागतं. प्रवाहातल्या जीवसृष्टीलाही त्याचा फटका बसतो. विचित्र अशा रसायनांचा फेस पाण्यावर तरंगू लागतो. नदीचा श्वास मग अशा वेळी गुदमरतो.

कवी केदारनाथ सिंह यांची ‘नदियाँ’ ही प्रसिद्ध कविता आहे.

नदियाँ जो असलमें शहरों का आरंभ है

और शहर जो असलमें नदीयों का अंत

हमारे देश में नदियाँ जब कुछ नही करती

तब वे शवों का इंतजार करती है…