जगाच्या पाठीवर रोज काही ना काही घडत असतं. ते भलं असो वा बुरं, त्याच्या पाऊलखुणा कुठे ना कुठे उमटलेल्या असतात. लेखक अशा पाऊलखुणा गोळा करतो आणि संगतवार मांडतो. त्यातून कधी सकल मानवजातीच्या भविष्याविषयी प्रश्नांची मालिका उभी राहते, कधी इतिहासाची आजवर बंद असलेली कवाडं किलकिली होऊन नवे प्रश्न खुणावू लागतात, तर कधी मानवी मनात खोलवर सुरू असलेल्या आंदोलनांना आवाज मिळतो. भूतकाळात डोकावणारी, भविष्याचा आदमास बांधू पाहणारी अशी अनेक पुस्तकं गेल्या वर्षभरात प्रकाशित झाली. ‘बुकमार्क’ने दखल घेतलेल्या पुस्तकांचा हा सारांश..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साऊथ व्हर्सेस नॉर्थ

नीलकांतन आर. एस. यांचे हे पुस्तक उत्तर आणि दक्षिण भारतातील सर्वज्ञात तिढा मांडते. लेखक संख्याशास्त्राचे अभ्यासक  असल्यामुळे विदेची गणिते मांडून ते स्वत:चे म्हणणे सप्रमाण सिद्ध करतात. पुस्तकातील भाषा आणि संदर्भ सामान्य वाचकाला बोजड भासू शकतात, मात्र धोरणकर्ते राजकीय नेते, सनदी अधिकारी, अर्थशास्त्राचे अभ्यासक यांच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.

हेही वाचा >>> देशकाल : नव्या यात्रेकडून नव्या अपेक्षा!

स्पेअर 

ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांच्यावर ब्रिटिश राजघराण्याने कसा अन्याय केला, हे सांगणारे हे पुस्तक या वर्षी चर्चेचा विषय ठरलेल्या पुस्तकांपैकी एक. या पुस्तकातून हॅरी यांनी आपण राजघराण्यापासून का विभक्त झालो, त्यामागे कोणत्या कटू घटना आहेत, याच्या आठवणी अगदी तपशीलवार सांगितल्या आहेत. पुस्तकात ब्रिटिश राजघराण्यातील वर्णभेदांपासून या घराण्यावर सदैव डोळा ठेवून असणाऱ्या माध्यमांपर्यंत अनेक मु्द्दयावर भाष्य करण्यात आले आहे. 

लॉर्डस ऑफ द डेक्कन

भारतीय इतिहास लेखनात दक्षिण भारताच्या इतिहास लेखनावर अन्याय झाल्याचे अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. हा अन्याय दूर करू पाहणाऱ्या पुस्तकांपैकी हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. हर्षवर्धन आणि दिल्ली सुलतान यांच्यामधील ६०० वर्षांचे अंतर होते. अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे हे पुस्तक या कालखंडाचा मागोवा घेते.

प्लॅनिंग डेमॉक्रसी

 ‘बिग डेटा’चा विचार सकारात्मकरीत्या ७० वर्षांपूर्वीच हाताळणाऱ्या प्रो. महालनोबिस यांच्या कारकीर्दीविषयीचा आणि त्यांनी स्वतंत्र भारताच्या पायाभरणीत दिलेल्या योगदानाचा दस्तावेज निखिल मेनन यांचे हे पुस्तक मांडते.  केम्ब्रिज विद्यापीठात पदार्थविज्ञानात अव्वल ठरलेल्या महालनोबिस यांचा प्रवास अंकशास्त्राच्या वाटेवर कसा वळला, याची रंजक कथा सांगते.

टी शर्ट्स आय लव्ह’  

हे पुस्तक मुराकामीच्या अन्य अकथनात्मक पुस्तकांसारखे आहे. जगभरातील शहरांत पुस्तक प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरताना स्वस्त दुकाने- समुद्रकिनाऱ्यांवरील विक्रेते यांच्याकडून विकत घेतलेल्या आवडत्या टीशर्टाविषयी लिहिली गेलेली ही लेखांची मालिका आहे. आकर्षक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कपडे विक्री दालनांना टाळूनच झालेली ही खरेदी मुराकामीतल्या अतिहौशी टीशर्टप्रेमीची आहे.

वॉकिंग थ्रू सोल सिटी

डॉ. सुधीर पटवर्धन यांचे नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात मुंबईच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला दालना’त भरलेले ‘वॉकिंग थ्रू सोल सिटी’ या नावाचे प्रदर्शन पटवर्धनांची चित्रे आपल्या सांस्कृतिक अस्तित्वाचा भाग असल्याचा प्रत्यय देणारे ठरले होते. हे पुस्तक त्या प्रदर्शनावर आधारित आहे. पुस्तकात पटवर्धन यांच्या चित्रांविषयीचे कलाक्षेत्रातील मान्यवरांचे लेख, स्वत: पटवर्धन यांनी लिहिलेल्या टिपा, २५०हून अधिक प्रतिमा, प्रदर्शनात नसलेली ३६ छायाचित्रे यांचा समावेश आहे. सुमारे १०० रेखाटने आणि बाकी रंगचित्रेही यात आहेत.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : लाल समुद्रात लाल बावटा!

नो वन एल्स

ही चित्रकादंबरिका लेखक किकुओ जॉन्सनच्या मोई या हवाई बेटाजवळच्या शहरगावात घडते. यात तीन मुख्य पात्रे आहेत. उपपात्रांमध्ये बॅटमन नावाचे मांजर (तिच्या हातात खेळण्यासारखे पकडून ठेवलेले उंदीर) तसेच उसाने लगडलेले हवाई बेटावरचे शेत आणि जवळचा साखर कारखाना आहे. या तिघांच्या आयुष्यासह, त्यांच्यातील तुटत जाणाऱ्या संवादासह एका शहराचे जगणे अवलंबून असलेल्या साखर कारखान्याला टाळे लागण्याच्या, उसाला आग लागण्याच्या वाईट घटनांची मालिका या कथेत आहे. यातील चित्रकथा आर. किकुओ जॉन्सन याच्या शैलीसाठी पकडून ठेवतात.

बॉम्बे आफ्टर अयोध्या : अ सिटी इन फ्लक्स

१९९२ साली अयोध्येतील बाबरी मशीद पाडली गेली आणि आता तिथे राममंदिर उभे राहिले आहे. मधल्या तीन दशकांत देशात प्रचंड राजकीय, सामाजिक उलथापालथ झाली. देशाचे प्रतििबब समजली जाणारी मुंबई त्याला अपवाद नाही. पत्रकार जितेंद्र दीक्षित यांचे ‘बॉम्बे आफ्टर अयोध्या’ हे पुस्तक शहरातील या बदलांचा दस्तावेज ठरते. दंगली, राज्याच्या सत्ता समीकरणांतील शिवसेनेचे बदललेले स्थान, बॉम्बे-बंबईचे मुंबई होणे अशा अनेक स्थित्यंतरांची दखल या पुस्तकात घेण्यात आली आहे.

इसेन्शियली मीरा

एका उच्चभ्रू पंजाबी कुटुंबात जन्म. शिमल्यातील कॉन्व्हेंटमध्ये शालेय शिक्षण, श्रीमंत व्यक्तीशी लहान वयात लग्न आणि त्याची व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार अशा अनेक स्थित्यंतरांतून जात, आव्हानांचा सामना करत मीरा कुलकर्णी ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ नावाच्या लग्झरी आयुर्वेदिक कंपनीच्या सीईओ कशा झाल्या याची कहाणी या पुस्तकात आहे. ‘फॉर्च्युन इंडिया’च्या ‘मोस्ट पॉवरफुल बिझिनेस वुमन’च्या यादीत मीरा यांचे नाव सलग १० वर्षे झळकत होते. एकल पालकत्वाच्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत केलेली ही वाटचाल प्रेरणादायी ठरते.

क्रिमिनल्स इन युनिफॉर्म 

आरोपींचे कोठडीत मृत्यू होतात, भरदिवसा भरवस्तीत चकमकी होतात, एखाद्या महत्त्वाच्या खटल्यातील साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू होतो तेव्हा त्यामागे कोणती कारणपरंपरा असते यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. वृत्तवाहिन्यांसाठी दीर्घकाळ शोधपत्रकारिता केलेल्या संजय सिंग आणि राकेश त्रिवेदी यांनी संबंधितांची नावे बदलून या सर्व कथा लिहिल्या आहेत. गुन्हेगारी आणि त्यामागचे वर्चस्वाचे राजकारण यातून उलगडते. 

इंडियाज् पाकिस्तान कॉनन्ड्रम

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त म्हणून काम केलेल्या आणि भारतीय परराष्ट्र सेवेत अनेक महत्त्वाची पदे भूषविलेल्या शरत सभरवाल यांचे हे पुस्तक प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे पाकिस्तानच्या संस्थात्मक जडणघडणीचे विश्लेषण करणारे आहे. पुस्तक दोन भागांत विभागलेले असून पहिला भाग पाकिस्तान या राज्याचे स्वरूप, त्याचे आंतरिक शक्तिसंघर्ष आणि या सर्वांचा भारतावर होणारा परिणाम यावर भाष्य करते. दुसऱ्या भागात भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांतील प्रमुख मुद्दे, धोरणात्मक पर्यायांचे मूल्यांकन आणि पुढे जाण्याचा मार्ग याची मीमांसा करण्यात आली आहे.

अल्ट्रा- प्रोसेस्ड पीपल

डॉ. ख्रिस व्हॅन टूयेकेन या इंग्लंडमधील वैद्यकीय शास्त्रज्ञाचे हे पुस्तक अतिप्रक्रिया केलेल्या अन्नाविषयी भाष्य करते, पण आरोग्याबाबत किंवा आहाराबाबत थेट कुठलेही सल्ले देत नाही. ते फक्त यूपीएफचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण समजावून सांगतात. एका अर्थाने हे अन्न सहज सुलभरीत्या कुठेही, कधीही, कितीही कसे काय उपलब्ध होते आणि मुख्य म्हणजे त्याचा आपल्या आरोग्यावर आणि समाजावर काय परिणाम होतो हे डॉ. टूयेकेन समजावून सांगतात. त्यांच्या मते लोकांना जिभेवर आणि मनावर ताबा ठेवायला सांगून भागणार नाही कारण आपण या पदार्थाना कसे बळी पडू याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करूनच या कंपन्या बाजारात उतरल्या आहेत.

नॉर्थईस्ट इंडिया : अ पोलिटिकल हिस्ट्री

संग्राम चौधुरी यांचे हे पुस्तकात ह्युएन त्संग (युआन श्वांग) आसामच्या राजाकडे आला होता का? महाभारतात ‘किरात’ असा ज्यांचा उल्लेख आहे ते लोक ईशान्येकडील असावेत का? याची उत्तरे शोधते. ही उत्तरे इथे राजकीय इतिहासाची भूमीच किती भुसभुशीत आहे, याची कल्पना देतात. बंगाल पादाक्रांत करणाऱ्या कुतुबुद्दीन ऐबकाने आसामवरही स्वारी केली, तेव्हा काय झाले? १८१० पासून आसामचे ‘अहोम साम्राज्य’ आणि ब्रह्मदेशचे राजे यांच्यात लढाया कशा होत राहिल्या, अखेर इंग्रजांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ची मदत अहोम राजा चंद्रकांत सिंहाला घ्यावी लागली आणि १८२६ चा तह थेट इंग्रजांशी झाल्यामुळे हा प्रदेश कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली कसा आला हे प्रश्न राजकीय इतिहासाकडे नेतात.

द एंजल

आज सुरू असलेल्या इस्रायल-पॅलेस्टाइन वादाच्या पार्श्वभूमीवर उरी बार जोसेफ यांचे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. योम किप्पुर लढाईत काय घडले, इंटेलिजन्स फेल्युअर म्हणजे काय, डबल एजंटची कार्यशैली, दोन देशांतील लढाईमध्ये जगातील अन्य देशांची भूमिका काय, अशा अनेक मुद्दयांविषयीची माहिती यात मिळते.

वेस्टर्न लेन

चेतना मारू यांच्या या पहिल्यावहिल्या कादंबरीने बुकरच्या लघुयादीत स्थान मिळविले. ब्रिटनमध्ये स्थलांतर केलेल्या गुजराती कुटुंबातील पुढच्या पिढीच्या आयुष्याचे चित्रण या कादंबरीत आहे. आहार वगळता पूर्णपणे ब्रिटिश असलेल्या आपल्या मुलींना एखाद्या रचनात्मक गोष्टीत गुंतवून ठेवण्यासाठी त्यांचे वडील त्यांना स्क्वॅशच्या प्रशिक्षणासाठी पाठवतात. हा खेळ रूपकाच्या स्वरूपात वापरून त्याआधारे कुटुंबातील सदस्यांची भावनिक आंदोलने, त्यांच्यातील वाद आणि कौटुंबिक जिव्हाळयाचे चित्रण करण्यात आले आहे.

द आर्ट थीफ

मायकेल फिन्केल यांचे हे पुस्तक एका शर्विलकाची गोष्ट सांगते. स्तेफान ब्रेटवाईजरची याने फक्त त्याच्या मैत्रिणीच्या साहाय्याने १९९५-२००१च्या दरम्यान, जगातल्या २०० संग्रहालयांतून केवळ हातचलाखीने आणि कोणालाही इजा न करता तीनेकशे अभिजात कलापूर्ण वस्तूंची अगदी शांतपणे उचलेगिरी केली. त्या आपल्या घरी आणून ठेवल्या. त्याने त्यातील एकही कलाकृती विकली नाही. म्युझिअममध्ये काचपेटयांमागे ठेवलेली कला, तुरुंगात डांबल्यासारखी भासते. तिला मुक्त करावे आणि स्वत:ला अशा उत्कृष्ट सौंदर्याकृतींनी  वेढलेले जीवन जगता यावे, एवढाच उद्देश या जिवावर खेळून केलेल्या या गुन्ह्यांमागे होता.

१९२३ : फरगॉटन क्रायसिस..

पहिल्या महायुद्धानंतरचा शांतता करार- ‘व्हर्साय तहा’च्या आर्थिक परिणामांचा विचार करण्यासाठी जो लहानसा गट तयार करण्यात आला होता, त्याचे नेतृत्व जॉन मेनार्ड केन्स या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाकडे होते. या केन्सला बैठकीच्या पहिल्या काही दिवसांतच भविष्याचा अंदाज आला. जर्मनीसारख्या एका महासत्तेला अस्थिर करणे हे साऱ्या युरोपलाच आर्थिक व राजकीय संकटात टाकणारे ठरेल, याची जाणीव केन्सला सर्वात जास्त होती. जर्मन लोकशाहीने या संकटातून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न कसा केला, याचे वर्णन प्रा. मार्क जोन्स लिखित या पुस्तकात करण्यात आले आहे.

व्हाय डिडन्ट यू कम सुनर?

मूळचे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले कैलाश सत्यार्थी बालहक्क कार्यकर्ते का आणि कसे झाले, याची गोष्ट हे पुस्तक कथन करते. त्यांच्या कारकीर्दीतील तीन दशकांचा काळ यात उलगडण्यात आला आहे. बालमजुरीचे, बालकांच्या शोषणाचे दाहक वास्तव हे पुस्तक मांडते. दगडखाणीत, जरी कारखान्यांत, सर्कसमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या हृदयद्रावक कथा आणि बालमजुरीतून सुटका झाल्यानंतर संघर्ष करत या मुलांनी प्राप्त केलेल्या यशाच्या गाथा या पुस्तकात समाविष्ट आहेत.

द बॅटल फॉर युअर ब्रेन

जीवशास्त्र आणि डिजिटल तंत्रज्ञानाची सांगड घालताना कोणी मानवी मेंदू, विचारप्रक्रिया, निर्णयक्षमता यांच्यावरच पाळत ठेवू लागले तर, मेंदूमध्ये घुसखोरी करू लागले, मेंदूमध्ये केवळ सुख निर्माण करणाऱ्या संवेदना कृत्रिमरीत्या निर्माण करू लागले तर काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न नीता फरहानी यांचे हे पुस्तक करते. मेंदूत घुसखोरी करणाऱ्या तंत्रज्ञानातील धोक्यांची जाणीव करून देते. क्लिष्टता टाळणारे आणि विविध मुद्दे संदर्भासहित स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे.

पायर

पेरुमल मुरुगन यांची ही कादंबरी ग्रामीण आणि शहरी भारतातील दरी अधोरेखित करणारी आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आजही कोणत्या यातना सहन करतात, हे सांगणारी आहे. प्रेमासाठी आपले शहरातील घरदार सोडून आलेल्या तरुणीच्या आणि आपल्या आईच्या मनाविरुद्ध परजातीतील मुलीशी लग्न केलेल्या, दारिदय़्राशी दोन हात करत धडपडणाऱ्या तरुणाच्या व्यथा यात मांडण्यात आल्या आहेत. एकंदर भारतीय समाजरचनेवर परखड भाष्य यात आहे.

मल्टिप्लिसिटीज

एमएमआरडीएने ११९६ मध्ये ‘मुंबई महानगर क्षेत्र वारसा संधारण संस्था’ (एमएमआरएचसीएस) स्थापन केली. या संस्थेने मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल २७०० वारसा स्थळे शोधली. नीरा आडारकर यांचे हे पुस्तक या वारसास्थळांविषयीच्या जाणीवजागृतीचे कार्य ताकदीने करते. यात मुंबईच्या मौखिक इतिहासापासून, येथील गड- किल्ल्यांचे नकाशे, जुनी छायाचित्रे, लेणी- शीलालेखांची माहिती आहे. शहरातील विविध भाषिक, धार्मिक गट प्रामुख्याने कुठे राहतात याच्या नोंदी आहेत. शहराचा भूतकाळ जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि त्याचे जतन करण्याकरिता धडपडणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे.

बुकरायण

ग्रंथविश्वातील अतिशय प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारासंदर्भातील घडामोडी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘लोकसत्ता’ने वाचकांपर्यंत पोहोचविल्या. बुकरच्या लघुयादीतील निवडक पुस्तकांचे सविस्तर परीक्षण करण्यात आले. यंदा पॉल लिंच यांच्या ‘प्रॉफेट साँग’ या पुस्तकाला बुकरने सन्मानित करण्यात आले. या पुस्तकाचे रसग्रहण सई केसकर यांनी केले. त्याव्यतिरिक्त लघुयादीतील जोनथन एस्कोफरी यांच्या ‘इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू’ या पुस्तकाचे परीक्षण गणेश मतकरी यांनी, सेरा बर्नस्टाईन यांच्या ‘स्टडी फॉर ओबिडियन्स’चे परीक्षण अभिजीत रणदिवे यांनी, पॉल मरे यांच्या ‘द बी स्टिं ग’चे परीक्षण सुकल्प कारंजेकर यांनी केले.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summary of books published last year noticed in loksatta bookmark colums zws