भारतीय राज्यघटनेने न्यायालयांकडे एक अभूतपूर्व आणि अनेक पदरी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी निव्वळ राज्यघटनेचे ‘रक्षण’ करण्याविषयीची नाही तर बदलत्या सामाजिक संदर्भात राज्यघटनेचा सयुक्तिक अन्वयार्थ लावून तिच्यातील लोकशाही; समावेशक आशय विस्तारण्याचीदेखील आहे. या संदर्भातली भारतातल्या न्यायालयांची आजवरची कामगिरी ‘संमिश्र’ स्वरूपाची राहिली आहे असे फारतर म्हणता येईल. परंतु त्या पार्श्वभूमीवर मागच्या आठवड्यात आलेला आरक्षणासंबंधीचा न्यायालयीन निर्णय अधिक चमकदार अधिक उठावदार ठरतो. हा निर्णय महत्त्वपूर्ण असण्याचे आणखी एक कारण म्हणजे (यापूर्वीच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे) आरक्षणाच्या राजकारणाला आलेले कुंठित स्वरूप. सत्ताधारी पक्षाचा जातवार आणि एकंदर जनगणनेला असणारा विरोध असो किंवा महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून सुरू असणारी सुंदोपसुंदी; वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असले तरी हा आविर्भाव ताणला जाऊन राहुल गांधींनी अर्थसंकल्पाच्या हलव्यासंबंधीची शेरेबाजीपर्यंत; आरक्षणासंदर्भातील आपल्या राजकीय कल्पनाशक्तीचे दारिद्र्य इतक्यातल्या इतक्यात वारंवार उघडे पडले. त्या दरिद्री पार्श्वभूमीवर न्यायालयाने घेतलेला अनुसूचित जातींमधील संभाव्य वर्गीकरणाविषयीचा निर्णय काही एक नवे दिशादिग्दर्शन करतो. मात्र या न्यायालयीन युक्तिवादाचे रूपांतर आरक्षणासंबंधीच्या अधिक निर्णायक; अधिक सघन राजकारणात आणि समाजकारणात व्हायचे असेल तर एक राष्ट्रीय समाज म्हणून आपल्याला आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकावे लागेल. त्याची जबाबदारी निव्वळ न्यायालयांवर निश्चितच सोपवता येणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा