‘मित्रांनो, ‘पार्टीलेस डेमॉक्रसी’ या संस्थेच्या वतीने आपल्या सर्वाचे स्वागत. महाराष्ट्रातील राजकारण्यांविषयी जनतेच्या मनात असलेला आदरभाव कायम राहावा तसेच वृद्धिंगत व्हावा यासाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. ‘माझी पक्षनिष्ठा’ या विषयावरच्या परिसंवादाने संस्थेच्या कार्यक्रमांचा शुभारंभ झाला. त्यात कोकणचे नारायणराव व नगरचे राधाकृष्णजी सहभागी झाले होते. त्यांच्या हृद्य मनोगताची आठवण आजही अनेक जण काढतात. नंतर ‘पक्षांतरविरोधी कायदा आणि मी’ यावर कुलाब्याचे निष्णात विधिज्ञ राहुल यांचे बीजभाषण ठेवले होते. त्या वेळी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलेले विवेचन अजूनही अनेकांच्या लक्षात आहे. त्यानंतर इंदापूरचे हर्षवर्धनराव यांचे ‘पक्ष व मन:शांती’ या विषयावरचे अनुभवकथन सर्वाना आवडले होते. या कार्यक्रमानंतर झोपेची समस्या दूर झाली असे अनेकांनी आम्हाला कळवले. चौथ्या कार्यक्रमाला बारामतीचे अजितदादा आले होते. त्यांनी ‘पहाटेचे राजकारण’ या तुलनेने नव्या असलेल्या विषयावर विस्तृत प्रकाश टाकला. तेही भाषण आज अनेकांच्या स्मरणात आहेच. संस्थेच्या या सततच्या व नावीन्यपूर्ण कार्यक्रमामुळे राज्यातील जनतेचा लोकशाहीवरील आदर दुणावला. पक्षनिष्ठा या शब्दावरून त्यांच्या मनात निर्माण झालेली किल्मिषे दूर झाली. केवळ राजकारणीच नाही तर एकूण राजकारणाविषयी त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली हे आम्हाला मिळालेल्या भरभरून प्रतिसादातून दिसून आले. आमच्या या कार्यक्रमांपासून प्रेरणा घेऊन अनेक नेते ‘गुवाहाटी नाटय़ात’ सहभागी झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा