एल. के. कुलकर्णी

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक

देई ठेवूनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक;

त्याची टिकटिक चालते न कधिही, आहे मुके वाटते;

किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते!

केशवकुमारांची ही प्रसिद्ध कविता पूर्वी शाळेत अभ्यासाला होती. एकेकाळी केवळ आजीचेच नव्हे तर सर्वांचेच दैनंदिन वेळापत्रक पूर्वी सूर्यावरून ठरे. म्हणजे सूर्य उगवला की सकाळ, तो डोक्यावर आला की मध्यान्ह आणि सूर्यास्त म्हणजे सायंकाळ इत्यादी. पुढे घड्याळाचा वापर सुरू झाला. आता आपली घड्याळे आणि वेळापत्रक मात्र सूर्याबरोबर नव्हे तर भारतीय प्रमाण वेळेनुसार चालते. आजीचे घड्याळ ते प्रमाण वेळ हा वेळेचा प्रवास तसा मनोरंजक आहे.

आजीची किंवा सूर्याच्या स्थानावरून मानली जाणारी वेळ म्हणजे ‘स्थानिक वेळ’. ही सर्वत्र सारखी नसते. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि त्यामुळे सूर्य पूर्वेकडे उगवून पश्चिमेला मावळतो आणि दिवसरात्र होतात. अर्थातच जे ठिकाण पूर्वेकडे असेल तिथे सूर्य आधी उगवलेला दिसतो व पश्चिमेकडे तो नंतर उगवतो. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास, म्हणजे ३६० अंशातून फिरण्यास २४ तास लागतात. यावरून तिच्या परिवलनाचा वेग एक अंशास चार मिनिटे एवढा आहे. या गतीने पृथ्वीवरील ठिकाणांच्या स्थानिक वेळेत १५ रेखांशास एक तास एवढा फरक पडतो. पूर्वेकडील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील मागे. उदाहरणार्थ कोलकाता मुंबईच्या पूर्वेला आहे आणि त्या दोन्हीच्या रेखांशात सुमारे १६ अंशाचा फरक आहे. याचा अर्थ कोलकात्याला सूर्योदय झाल्यावर सुमारे एक तास चार मिनिटांनी मुंबईला सूर्य उगवतो.

पण पृथ्वीवर सर्वत्र एकाच वेळी सूर्योदय होत नाही आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक वेळा असतील हे सर्वसामान्यांना माहीत नव्हते. आणि तज्ज्ञांना ते विचारात घेण्याची गरजच पूर्वी पडली नाही. कारण पूर्वी दूरच्या ठिकाणची स्थानिक वेळ समजण्याची सोयच नव्हती. पण प्रवास वेगवान होऊ लागला आणि दूरसंपर्क (तारायंत्र, टेलिफोन) शक्य झाला तेव्हा भिन्न ठिकाणी भिन्न स्थानिक वेळा असतात हे प्रत्ययास येऊ लागले. या भिन्न स्थानिक वेळेमुळे व्यवहारात, विशेषत: रेल्वे वेळापत्रक आणि हवामान भाकिते यात गोंधळ होऊ लागला. रेल्वेचे वेळापत्रक सुरुवातीच्या स्थानकाच्या वेळेनुसार असे. पण तिच्या मार्गावरील इतर ठिकाणची घड्याळे आपापली स्थानिक वेळ दर्शवत. वेळेची सुसूत्रता नसेल तर एकाच रुळावर एकाच वेळी अनेक रेल्वे येण्याचा धोका असे. हे टाळण्यासाठी रेल्वे जिथून सुटे तेथील वेळापत्रकाची वेळ सर्व स्थानकांवर पाळली जाऊ लागली. ही त्या ‘रेल्वेची वेळ’- ‘रेल्वे टाइम’ – म्हणून ओळखली जाई. याच ‘रेल्वे टाइम’चे रूपांतर पुढे ‘स्टँडर्ड टाइम’ किंवा ‘प्रमाणवेळ’मध्ये झाले. अर्थातच प्रमाणवेळ म्हणजे, आपल्या स्थानिक वेळेचा विचार न करता सर्व घड्याळे ज्या एकाच वेळेनुसार लावली जातात ती वेळ होय.

हेही वाचा >>> बुकमार्क : भाषेच्या चाकूला कथनाची धार…

प्रमाणवेळेची संकल्पना प्रथम इंग्लंडने स्वीकारली. इंग्लंडचे राष्ट्रीय घड्याळ लंडनच्या वेळेवर आधारित होते. ती वेळ स्वीकारून पहिली रेल्वे नोव्हेंबर १८४० मध्ये धावली. १ डिसेंबर १८४७ पर्यंत इंग्लंडच्या बहुतेक रेल्वे कंपन्यांनी ती वेळ स्वीकारली. पण हे १८८० पर्यंत सक्तीचे नव्हते. पुढे तिचेच रूपांतर ग्रीनीच प्रमाण वेळेत झाले. याच प्रकारे अमेरिकेत ‘न्यूयॉर्क रेल्वे’, ‘पेन्सिलव्हनिया रेल्वे’ इ. च्या आपापल्या ‘रेल्वे टाइम’ होत्या. हळूहळू ‘रेल्वे वेळ’ इतरही क्षेत्रात वापरली जाऊ लागली व रेल्वे वेळेचे रूपांतर प्रमाणवेळेत होऊ लागले. एकोणिसाव्या शतकात अनेक देशांत प्रमाणवेळा ठरू लागल्या. तरी त्यात जागतिक सुसूत्रता नव्हती. १८८४ मध्ये वॉशिंग्टन येथे एक आंतरराष्ट्रीय मध्यमंडल परिषद (इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स) घेण्यात आली. त्यात अमेरिका, युरोप, आशिया इ. खंडातील २५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तिच्या आयोजनात सर सँडफोर्ड फ्लेमिंग या कॅनेडियन इंजिनीअरची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी जगाची विभागणी २४ कालक्षेत्रा (टाइम झोन) मध्ये करण्याचे सुचवले. हे प्रत्येक कालक्षेत्र (टाइम झोन) १५ अंश रेखावृत्त म्हणजे एक तास विस्ताराचे होते. याच परिषदेत इंग्लंडमधील लंडनजवळील ग्रीनीचवरून जाणारे रेखावृत्त हे शून्य अंश मानून इतर रेखावृत्ते निश्चित करण्याचे ठरले. तेव्हापासून ग्रीनीच येथील वेळ ही ‘ग्रीनीच प्रमाणवेळ’ किंवा ‘जागतिक प्रमाणवेळ’ मानली जाते. तिचा उल्लेख जीएसटी (ग्रीनीच स्टॅंडर्ड टाइम) किंवा यूएसटी ( युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइम) असा करतात. तिच्या आधारे पुढे विविध देशांनी आपापल्या प्रमाण वेळा ठरवल्या. त्या ग्रीनीच प्रमाणवेळेच्या मागे किंवा पुढे अशा सांगितल्या जातात. ज्या देशांचा पूर्व पश्चिम विस्तार मोठा आहे, तिथे एकापेक्षा अधिक प्रमाणवेळा मानल्या जातात. उदाहरणार्थ अमेरिकेत चार, चीनमध्ये पाच तर रशियात ११ प्रमाणवेळा आहेत. भारतात एक प्रमाणवेळ असून तिला भारतीय प्रमाणवेळ (इंडियन स्टँडर्ड टाइम) म्हणतात.

भारतीय प्रमाणवेळेची सुरुवात रेल्वेच्या आगमनानंतर झाली. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावली. पुढे कोलकाता, मद्रास इ. ठिकाणावरून रेल्वे धावू लागल्या. त्यांची आपापली प्रमाणवेळ असे. पूर्वेकडे कोलकाता रेल्वेची प्रमाणवेळ (कोलकाता स्टँडर्ड टाइम) तर पश्चिमेस मुंबई रेल्वेची प्रमाणवेळ (बॉम्बे स्टँडर्ड टाइम) प्रचलित होती. या दोन्ही वेळेत सुमारे एक तासाचा फरक असे. त्यामुळे व्यवहारात अडचणी येत. त्या टाळण्यासाठी या दोन्हींच्यामध्ये असणाऱ्या मद्रासची प्रमाणवेळ देशभर रेल्वेची प्रमाणवेळ म्हणून पाळण्याचे ठरले. ग्रीनीच प्रमाणवेळ अधिक साडेपाच तास अधिक ८ मिनिटे ही मद्रासची प्रमाणवेळ निश्चित केली गेली. हीच ‘मद्रास प्रमाणवेळ’ (मद्रास टाइम) भारतभर २२ वर्षे चालली.

१९०५ मध्ये प्रयागराज म्हणजे अलाहाबादवरून जाणारे रेखावृत्त हे ब्रिटिश भारतासाठी प्रमाण रेखावृत्त म्हणून जाहीर करण्यात आले. त्या आधारे १ जानेवारी १९०६ पासून ब्रिटिश भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली. त्यासाठी अलाहाबादची निवड करण्याचे कारण अर्थात भौगोलिक आहे. सामान्यत: देशाच्या किंवा भूप्रदेशाच्या मध्यातून जाणारे रेखावृत्त हेच वेळेसाठी प्रमाण मानले जाणे अपेक्षित असते. तसेच १८८४ च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत असे ठरवण्यात आले की प्रमाणवेळेसाठी आधारभूत धरले जाणारे रेखावृत्त साडेसात अंशाच्या पटीत असावे. अलाहाबाद हे स्थूल मानाने त्याच अटीत बसणारे म्हणजे जवळपास भारताच्या मध्य भागाजवळ असून ते ८२.१ पूर्व रेखावृत्तावर आहे. प्रत्यक्षात साडेसात अंशाच्या पटीतील रेखावृत्त ८२.५ अंश पूर्व हे आहे. ते उत्तर प्रदेशात अलाहाबादजवळच्या मिर्झापूरवरून जाते. त्यामुळे अलाहाबादऐवजी पुढे मिर्झापूर येथील प्रमाणवेळ ही भारताची प्रमाणवेळ मानली जाऊ लागली. एका अंशास चार मिनिटे, यानुसार ८२.५ अंशाची ३३० मिनिटे म्हणजे साडेपाच तास होतात. भारत ग्रीनीचच्या पूर्वेस असल्याने ती वेळ ही ‘ग्रीनीच वेळ अधिक साडेपाच तास’ असते. १ सप्टेंबर १९४७ पासून मिर्झापूरची वेळ हीच पूर्ण भारतासाठी ‘भारतीय प्रमाणवेळ’ म्हणून अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आली. मात्र मुंबई व कोलकाता रेल्वेची वेळापत्रके नंतरही बरीच वर्षे आपापल्या ‘रेल्वे टाइम’नुसार दिली जात. देशभर एकच प्रमाणवेळ वापरण्याबाबत भारत सरकार आग्रही होते. १९५५ नंतर रेल्वेसह सर्वत्र भारतीय प्रमाणवेळच वापरली जाऊ लागली. ही ‘भारतीय प्रमाणवेळ’- आयएसटी (इंडियन स्टॅंडर्ड टाइम) अशी सांगितली जाते. देशभरातील व्यवहारात सुसूत्रता ठेवतानाच सगळा भारत देश एका कालसूत्रात गोवण्याचे कार्य या प्रमाणवेळेने करून दाखवले. असा आहे आजीच्या घड्याळाचा आयएसटी म्हणजे मिर्झापूर येथील भारतीय प्रमाणवेळेपर्यंतचा प्रवास. 

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.

lkkulkarni@gmail.com