भारतीय संगीताची गंगा ग्वाल्हेरहून महाराष्ट्रात आल्यानंतर ती पुन्हा देशभर पोहोचवण्यासाठी पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांनी केलेल्या अथक आणि अखंड प्रयत्नांचे आजच्या काळातील फलित म्हणजे पं. केदार बोडस. नितळ आणि मधुर आवाजाची जन्मदत्त देणगी आणि त्यावर वयाच्या आठव्या वर्षांपासून झालेले स्वरांचे संस्कार यामुळे त्यांचे गायन कायमच लक्षात राहणारे ठरले. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव हे तर थेट विष्णु दिगंबरांचेच शिष्य. समाजाच्या सर्व स्तरांत संगीत आवडायला हवे, या तळमळीने विष्णु दिगंबरांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि कराचीपासून ते मिरजेपर्यंत सर्वत्र त्याच्या शाखा निर्माण केल्या. त्या सगळय़ा शाखांमध्ये महाराष्ट्रातील आपल्या उत्तम शिष्यांना पाठवले आणि तेथे संगीत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. लक्ष्मणरावांकडून केदार यांना थेट शिक्षण मिळाले. स्वर, त्याचे लगाव, त्याची मांडणी आणि त्यातून व्यक्त होणारा भाव याची एक बैठकच तयार करून घेतल्यानंतर केदार यांनी संगीताचे अभ्यासक आणि ज्येष्ठ गुरू डॉ. अशोक दामोदर रानडे यांच्याकडे गायन शिकण्यास सुरुवात केली. त्यापूर्वीचे शिक्षण ममत्वाने होणे स्वाभाविक होते. संगीताचार्य रानडे यांनी केलेले विद्यादान आणि रागसंगीताकडे पाहण्याची दिलेली नजर ही अनेक प्रकारे कष्टसाध्य होती. केदार यांनी ते कष्ट उपसले आणि त्याचे त्यांना शेवटपर्यंत समाधान वाटत राहिले. संगीतात जे जे नवे ऐकायला मिळेल, ते सहजपणे टिपून त्यावर कलात्मक साज चढवणे, हे केदार यांचे वेगळेपण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजोबा ग्वाल्हेर गायकीचे पाईक, तर डॉ. रानडे हे गजाननबुवा जोशी यांचे शिष्य आणि संगीताकडे अतिशय वेगळय़ा नजरेने पाहणारे कलावंत अभ्यासक. त्यामुळे केदार यांच्याकडे विष्णु दिगंबर, मुबारक अली, वझेबुवा, सेंदे खाँ, अस्तंगत पावलेल्या गोखले घराण्याच्या खास बंदिशी असा प्रचंड साठा होता. संगीतात अशा कलावंताला ‘कोठीवाला’ गवई म्हणतात. केदार यांनी मैफिलींमधून आपल्या शुद्ध आणि गोड गायनाचे दर्शन घडवले आणि आपल्याजवळील विद्या शिष्यांना देण्यात त्यांनी जराही कुचराई केली नाही. संगीत शिकताना केवळ स्वरच शिकून उपयोग नसतो, काही वेळा ते लहान वयात कंटाळवाणेही होऊ शकते, मात्र संगीतातील व्यक्ती, त्यांची वैशिष्टय़े, त्यांनी गाजवलेल्या मैफिली अशा अनेक घटनांचे किस्से केदार यांना त्यांचे आजोबा आणि वडील नारायण यांच्याकडून ऐकायला मिळाले. असे किस्से ऐकवताना केदार हमखास रंगून जात. विष्णु दिगंबरांच्या हयातीत ध्वनिमुद्रणाचे तंत्रज्ञान विकसित झाले होते; मात्र त्यांचे ध्वनिमुद्रित गायन ऐकण्याची आज सोय नाही. केदार यांच्या गायनातून ती झलक सहजपणे दिसून येई. उमद्या मनाचा, संगीतात बुडून गेलेला आणि कलावंत म्हणून उंची गाठलेला कलावंत म्हणून केदार बोडस यांचे महत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनाने एक अभ्यासू पंडित हरपला आहे.