योगेंद्र यादव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदारमतवादी-पुरोगामी समूहांनी विवेकानंदांबद्दल कायमच सौम्य उदासीनता ते सक्रिय संदेह अशी वृत्ती ठेवली. त्यामुळेच स्वामी विवेकानंदांना ताब्यात घेणे आणि त्यांचा गैरवापर करणे संघ परिवारासाठी सहजसोपे झाले.

मागील आठवडय़ात या स्तंभात मी स्वामी विवेकानंदांना हिंदू वर्चस्ववादाचे विचारवंत किंवा संघ परिवाराचे पूर्वज म्हणून मांडणे ही कशी फसवणूक आहे याबद्दल लिहिले होते. गोविंद कृष्णन व्ही. यांच्या ‘विवेकानंद : द फिलॉसॉफर ऑफ फ्रीडम’ या पुस्तकाचा मी स्वामीजींबद्दलची काही मिथके खोडून काढण्यासाठी वापर केला होता. स्वामी विवेकानंद यांच्या सामाजिक न्याय आणि समानतेसंदर्भातील विचारांबाबत आणखी कोणकोणते गैरसमज आहेत आणि स्वामीजींकडून शिकणे म्हणजे काय याबद्दल काही मुद्दे मांडून मी ही चर्चा संपवतो. मी हा विषय पुन्हा घेतला कारण हा काही केवळ शैक्षणिक शब्दच्छल नाही जो केवळ कल्पनाच मांडत बसणाऱ्या इतिहासकारांना आवडेल. विवेकानंदांबद्दलची खुली चर्चा म्हणजे भारताच्या वर्तमान तसेच भविष्याबद्दलचा राजकीय वादविवाद आहे.

धर्मनिरपेक्ष भारतीयांनी या मुद्दय़ांवर पुन्हा विचार करणे, दिशा शोधणे महत्त्वाचे आहे. कारण उदारमतवादी-पुरोगामी समूहांच्या विवेकानंदांबद्दलच्या सौम्य उदासीनता ते सक्रिय संदेह या वृत्तीमुळे स्वामी विवेकानंदांचा गैरवापर करणे संघ परिवाराला सोपे झाले. संघ परिवार अनेकदा विवेकानंदाबद्दल मौन बाळगणे किंवा त्यांची विनम्रपणे प्रशंसा करणे एवढय़ावरच थांबला होता. पण विवेकानंदांना नाकारण्याच्या धर्मनिरपेक्ष समुदायाच्या वृत्तीमुळे संघ परिवाराची विवेकानंदांना आपल्या ताब्यातच घेण्याची प्रवृत्ती बळावली. प्रभा दीक्षित यांच्या लेखापासून ते ज्योतिर्मय शर्मा यांच्या ‘अ रिस्टेटमेंट ऑफ रिलिजन : स्वामी विवेकानंद अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू नॅशनॅलिझम’ या पुस्तकापर्यंत विवेकानंदांना हिंदू वर्चस्ववादी आणि सामाजिक रूढीवादी म्हणून चित्रित करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. या विवेचनांना यापूर्वीदेखील आव्हान विशेषत: स्वामी मेधानंद (ऊर्फ अयोन महाराज) यांनी दिले आहे. गोविंद कृष्णन यांचे पुस्तक आपल्याला अशा चुकीच्या पुस्तकांना बाजूला ठेवायला मदत करते.

हिंदू वर्चस्ववादाच्या आरोपांप्रमाणेच, विवेकानंदांना जातिव्यवस्थेचे आणि ब्राह्मण वर्चस्वाचे रक्षक म्हणून सादर करण्यामागे अनेकदा फक्त चुकीचे वाचनच नाही, तर जाणीवपूर्वक केलेली विकृती कारणीभूत असते. गोविंद कृष्णन यांनी अशा आक्षेपांवर आणि त्यांच्या खंडनमंडनावर एक दीर्घ प्रकरण खर्च केले आहे. विवेकानंद हे समाजवादाबद्दल बोलणारी पहिली व्यक्ती नसले तरी सुरुवातीच्या भारतीयांपैकी होते, हे सर्वज्ञात आहे. ते लंडनमधील ब्रिटिश समाजवादी कवी एडवर्ड कारपेंटर आणि पॅरिसमधील सत्ताविरोधी विचारवंत पीटर क्रोपॉटकिन यांच्या संपर्कात आले. विवेकानंद वाचतात, ते कुणीही विवेकानंदांच्या लेखणीतून झरणारा समतावादी प्रवाह चुकवू शकत नाहीत. ते लिंग समानतेच्या सुरुवातीच्या आणि ठाम पुरस्कर्त्यांपैकी एक होते. ते महिला शिक्षण आणि मताधिकाराचे कैवारी होते. धर्म किंवा परंपरेच्या नावाखाली महिलांबाबत होणाऱ्या कोणत्याही भेदभावाचे ते कठोर विरोधक होते.

तरीही विवेकानंदांच्या भाषणातून आणि लेखनातून वेगवेगळी विधाने उचलून विवेकानंद हे जातिव्यवस्थेचे समर्थक कसे आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. विवेकानंदांच्या जातीबद्दलच्या टिपण्या बघितल्या तरी हे स्पष्ट होते की ते विशिष्ट जैविक गट किंवा समूह वा प्रजाती या सामान्य अर्थाने जात (किंवा संस्कृतमध्ये ‘जाती’) आणि सामाजिक पदानुक्रमाची व्यवस्था म्हणून जात यांच्यात स्पष्ट फरक करतात. ते सजीवांच्या वैविध्याची सार्वत्रिक अभिव्यक्ती या अर्थाने जात या संकल्पनेचे समर्थन करतात आणि निर्मूलनाच्या वाटेवरची सामाजिक पदानुक्रमाची व्यवस्था असलेली जात ही संकल्पना एक असमंजसपणाची आणि अन्यायकारक सामाजिक व्यवस्था म्हणून नाकारतात. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘‘आधुनिक जातिभेद हा भारताच्या प्रगतीतील अडथळा आहे. तो बंधने घालतो, प्रगती कुंठित करतो, लोकांमध्ये भेद निर्माण करतो. तो लवकरच कोसळेल.’’

त्याचप्रमाणे, ते ‘ब्राह्मण’ हा शब्द दोन वेगवेगळय़ा अर्थाने वापरतात. हे दोन्ही अर्थ भारतीय बौद्धिक परंपरांमध्ये परिचित आहेत: एक म्हणजे विशिष्ट गुण असणाऱ्यांसाठी तो एक अमूर्त संदर्भ असतो आणि दुसरे म्हणजे जन्माने मिळालेला विशिष्ट सामाजिक गट असतो. विवेकानंद पहिल्या परंपरेचे समर्थन करतात आणि दुसऱ्या परंपरेचा तिच्याकडून अपेक्षित असलेल्या गुणांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल निषेध करतात. ‘‘ब्राह्मण जात स्वत:च्या हाताने स्वत:ची समाधी उभारत आहे; आणि हे असेच असायला हवे. उच्च जातीत जन्मलेल्या आणि विशेषाधिकार प्राप्त असलेल्या प्रत्येक अभिजात वर्गाने स्वत:च्या हातांनी स्वत:ची चिता रचणे हे आपले प्रमुख कर्तव्य मानले पाहिजे. ’’

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विवेकानंद हे काही समाजशास्त्रज्ञ नव्हते आणि त्यामुळे या विषयावरील त्यांच्या मतांमध्ये संदिग्धता, टाळाटाळ आणि विसंगती आहेत. परंतु त्यांचा मूळ हेतू मात्र नीट आहे. त्यामुळे त्याला दोष देणे खोडसाळपणाचे ठरेल. केरळमधील इझ्वा (एक विशिष्ट जमात) कार्यकर्ते डॉ. पद्मनाभन पालपू यांना इंग्लंडमधील जातीय अन्यायाचा मुद्दा मांडण्यासाठी विवेकानंद मोठा आधार ठरले होते. अर्थविन्यास बाजूला ठेवू, पण विवेकानंद हे जन्माने ठरणाऱ्या जातीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या असमानता आणि अन्यायांना ठामपणे विरोध करत होते. त्यांच्या दृष्टीने जात ही एक सामाजिक – धार्मिक संस्था नव्हती आणि त्यामुळे ती हिंदू धर्मासाठी आवश्यक नव्हती, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हे डॉ. आंबेडकरांच्या (जातीवादाला विरोध करणाऱ्या केरळमधील नारायण गुरू या समाजसुधारकांच्या अगदी जवळचे) म्हणण्यापेक्षा वेगळे असेल, पण त्यामुळे ते जातीय अन्यायाबद्दल माफी मागणारे ठरत नाहीत. विवेकानंदांनी आंबेडकरोत्तर कालखंडात आपण ज्या पद्धतीने जातीवर चर्चा करतो तशी अपेक्षा करणे कोणत्याही परिस्थितीत विसंगत ठरेल.

कालविसंगतता आणि ऐतिहासिक घमेंड या वृत्तीवर मात करत स्वामी विवेकानंदांसारख्या व्यक्तीच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हे आपल्यापुढचे खरे आव्हान आहे. राजकीय उदारमतवाद, सामाजिक न्याय आणि आधुनिकतावादाच्या या आपल्या समकालीन मानकांनुसार स्वामी विवेकानंदांवर न्यायनिवाडा करणे आपल्यासाठी खूप सोपे आहे. आज आपण त्यांचे कौतुक करतो तेव्हाही आपण असे म्हणत असतो की ‘‘ते धार्मिक असले तरीही तर्कशुद्ध दिसतात. ते धर्माभिमानी असले, तरीही ते धर्मनिरपेक्ष आहेत. ते आपला वारसा पुढे नेणारे, त्यांचं संरक्षण करणारे असले तरीही, ते आधुनिक आहेत.’’ येथे मुळातूनच काहीतरी गफलत आहे. ती यासाठी नाही की आपण त्यांच्याकडे ज्या गोष्टी असायला हव्यात अशी अपेक्षा करतो, त्या त्यांच्या काळात प्रचलित नव्हत्या.. ती यासाठी नाही की आज आपण मांडणीच्या पातळीवर जिथे पोहोचलो आहोत, तिथे पोहोचणे त्यांच्यासारखे विचारवंत एकेकाळी होते, म्हणून शक्य झाले आहे..  तर या सगळय़ापलीकडे जाऊन आपण असे गृहीत धरतो की आज आपण मानत असलेली मूल्ये विश्वाचे मूल्यांकन करण्यासाठी एक स्थिर, सोयीस्कर बिंदू आहेत.

विवेकानंद आपल्याला आपल्या स्वत:च्या गृहीतकांवर आमूलाग्र पुनर्विचार करण्यास भाग पाडतात. धर्मनिरपेक्ष स्थानांचे वैशिष्टय़ असलेल्या आध्यात्मिक पोकळीचा सामना करण्याचे, धर्माबद्दलच्या तर्कशुद्ध अंधश्रद्धांवर मात करण्याचे, आपली आधुनिकता पाश्चिमात्यांपेक्षा वेगळी कशी असावी यावर विचार करण्याचे, हिंदू धर्माशी (आणि इतर धर्माशी) असलेल्या आपल्या नातेसंबंधांवर पुनर्विचार करण्याचे तसेच श्रद्धावान आणि  धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे काय हे अनुभवण्याचे आपल्याला आवाहन करतात. म्हणजेच संघ परिवाराशी दोन हात करण्यासाठी विवेकानंद एक शक्तिशाली वैचारिक शस्त्र आहे यात शंका नाही. पण, आपण जर त्यांचा निवडकपणे शस्त्र म्हणून वापर करत राहिलो आणि त्यांच्याकडून काहीच शिकलो नाही, मशाल म्हणून, त्यांच्या वारशाचा वापर केला नाही, तर ती खेदाची गोष्ट ठरेल.

आपल्याला आपल्या प्रजासत्ताकाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थाची पुनर्कल्पना करण्याची इच्छा असेल तरच विवेकानंद आपल्याला आपल्या प्रजासत्ताकावर पुन्हा हक्क सांगण्यास मदत करू शकतात. भारताच्या नवीन प्रजासत्ताकाच्या उभारणीचा हा वेदान्तिक दृष्टिकोन नाही का? लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत. 

yyopinion@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav article describe hinduism of the rss and swami vivekananda zws
Show comments