स्थूलतेच्या समस्येची व्याप्ती पाहता ‘खात्या पित्या घरचे’ असणे हे भूषण नाही, तर हा अनेक व्याधींना निमंत्रण देणारा आजार आहे, हे आता तरी आपल्याला स्वीकारावे लागेल.

एक बरे झाले, भारतीय ‘खात्या पित्या घरचे’ आहेत, यावर आता ‘लॅन्सेट’च्या अहवालानेच शिक्कामोर्तब केले. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, पण सध्या तरी आपण जगातले दुसऱ्या क्रमांकाचे (१८ कोटी) स्थूलराष्ट्र ठरलो आहोत. त्यात आपण महासत्ता अमेरिकेलाही (१७ कोटी २० लाख) मागे टाकले आहे. आता आपल्यापुढे केवळ चीन आहे (४० कोटी). किमान या क्षेत्रात आपण आपल्या शेजाऱ्याला यातल्या काही निकषांवर तरी लवकरच धूळ चारू, अशी शक्यताही या अहवालाने वर्तवली आहे. २०५० पर्यंत भारतातील एकतृतीयांश लोकसंख्या स्थूलतेचा सामना करत असेल, असा इशाराही हा अहवाल देतो. त्यामुळेच स्थूलता ही आपल्याला समस्या वाटत नसली तरीही ती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

स्थूलता ही शारीरिक समस्या असली, तरी भारतात तिचे मूळ मानसिकतेत दडलेले आहे. आपण पिढ्यानपिढ्या स्थूलतेला समृद्धीचे लक्षण मानत आलो, मात्र ही समस्या केवळ पोषणातिरेकातून उद्भवलेली नाही. चुकीचा आहार आणि बेजबाबदार जीवनशैली ही त्यामागची मूळ कारणे आहेत. शिवाय ही तथाकथित समृद्धीही सर्वत्र समप्रमाणात विभागलेली नाही. तसे नसते, तर आज देशात सरकार अन्नधान्य मोफत वाटत असूनही ३५.५ टक्के बालकांची वाढ खुंटली नसती आणि ३२.१ टक्के बालकांचे वजन मानकांपेक्षा कमी भरले नसते. केवळ कर्बोदके म्हणजे संपूर्ण आहार नाही आणि जनतेचे पोट भरले म्हणजे इतिकर्तव्य पार पडले, असेही नाही हे आता सरकारला स्वीकारावे लागेल.

भारतात पीक-पाणी आणि ऋतुमानात एवढे वैविध्य आहे की काय, किती, कधी खावे याचे विशिष्ट सूत्र असणे शक्य नाही. पण खाद्यासंस्कृतीत विविधता असली, तरी आरोग्याचे तीन तेरा वाजवण्याच्या इच्छेत मात्र देशभर एकात्मकता दिसते. घरकाम, शेतावरचे काम, धावपळ हे सारे काही व्यायाम या शीर्षकाखाली मोजून समाधानी राहण्याची वृत्ती सार्वत्रिक आहे. शरीरातील प्रत्येक सांध्याला, स्नायूला, हृदयाला, मेंदूला योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात आणि पुरेसा काळ चालना मिळाली, योग्य आहार आणि विश्रांती मिळाली, तरच व्यायामाचा खरा लाभ मिळतो. आठ तास संगणकासमोर आणि उरलेला वेळ मोबाइलसमोर अशी बैठी जीवनशैली आजच्या स्थूलतेच्या उद्रेकामागचे महत्त्वाचे कारण आहे. मात्र जिथे शाळेपासूनच शारीरिक शिक्षणाचा तास हा इतर विषयांचा अभ्यास संपवण्यासाठी आहे, असे बिंबविले जाते, त्या देशातील नागरिकांकडून एवढी अपेक्षा कुठे करणार? व्यायामाला प्रोत्साहन देण्याचे आपले सरकारी प्रयत्न नाक्यानाक्यांवर उभारलेल्या आणि बहुतेकदा सहा महिन्यांत निरुपयोगी ठरणाऱ्या तकलादू खुल्या व्यायामशाळांपलीकडे जात नाहीत. खेळाचे मैदान या शीर्षकाखाली राखीव ठेवलेल्या जागांवर सहज अतिक्रमणे होतात. सायकल किंवा जॉगिंग ट्रॅक हे केवळ पालिकेच्या निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिसतात. गल्ल्याही पार्किंगने गिळंकृत केलेल्या असतात आणि पदपथ तर फेरीवाल्यांसाठीच बांधले जातात. जिम वा स्पोर्ट्स क्लबचे सदस्यत्व ज्याला परवडते, त्यालाच व्यायामाचा हक्क, असेच एकंदर धोरण दिसते. अर्थात इच्छाशक्ती असणारे अशा प्रतिकूलतेवर मात करण्याचे मार्ग शोधून काढतात. मात्र, त्यांचे प्रमाण अत्यल्पच!

मानसिकतेतली आणखी एक त्रुटी म्हणजे जे जे परदेशी ते उत्तम, हा समज. विविध देशांची खाद्यासंस्कृती जाणून घेणे चांगलेच. पण तो आहार तेथील स्थानिक परिस्थितीतून पुढे आलेला असतो. केवळ चविष्ट आणि स्वस्त आहे, म्हणून ते रोजच्या आहारात आणणार असू, तर त्याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. पोहे, उपमा, इडली, पराठ्यांऐवजी रोज सकाळी सीरियलची पाकिटं दुधाच्या वाडग्यात रिती केली तर गडबड होणार, हे निश्चित.

बहुराष्ट्रीय कंपन्या बाकी भारताविषयी काहीही म्हणोत, पण आपल्या जाहिरातविषयक धोरणांवर त्या बेहद्द खूश असणार. कारण अमुक एक पावडर दुधातून दिली की मुले ताडमाड वाढतील, शीतपेय प्राशनाने मरगळलेला माणूस धावत सुटेल, तमुक बाबाचे मिश्रण चमचाभर खाल्ले की स्मरणशक्ती वाढेल, या छापाच्या जाहिराती इथे सहज खपून जातात. गुटख्यापासून मद्यापर्यंत साऱ्याला अन्य उत्पादनांआडून सहज प्रसिद्धी देता येते. पाकीटबंद पदार्थांतील घटक लिहिताना लबाडी केली, तरी आकाश कोसळत नाही. माध्यमक्रांतीपूर्वी या पाकीटबंद पदार्थांचा उच्छाद शहरांपुरताच सीमित होता. आता मात्र गावांतल्या दुकानांतही चिप्सच्या पाकिटांच्या माळा झरझर संपतात आणि शीतपेयांच्या बाटल्या रित्या होतात. वडे, समोसे, चायनीजचे लोण खेडेगावांतही पोहोचले आहे. परिणामी गावांतही स्थूलता वाढल्याचे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल स्पष्ट करतो.

यातून दुहेरी तोटा होतो. या पाकीटबंद पदार्थांतून मोठ्या प्रमाणात तेल, मीठ, साखर, अन्नरक्षक रसायनं शरीरात जातात आणि लठ्ठपणाबरोबरच मधुमेहापासून हृदयविकारापर्यंतच्या विविध आजारांना आमंत्रण देतात. दुसरे म्हणजे खऱ्या पोषक तत्त्वांवर खर्च होऊ शकणारी आणि स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या प्रगतीला हातभार लावू शकणारी रक्कम, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पोतडीत जाते. कंपन्या पोसल्या जाताना ग्राहक बिचारा लठ्ठ, कुपोषित आणि कंगालही होत राहतो.

स्थूलतेमागचे अतिमहत्त्वाचे मूलभूत कारण म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था. ही व्यवस्था पुरुषांवर अन्याय करणारी आणि आरोग्याचा बट्ट्याबोळ करणारी आहे. ती निम्म्या लोकसंख्येला खाद्यासंस्कृतीचा निम्माच आनंद देते. कारण पुरुषांना केवळ खाण्याची संधी मिळते. स्वयंपाकघरात रोज घड्याळाच्या काट्यावर रंगणाऱ्या थरारक सामन्यांत खेळाडू म्हणून उतरण्याची संधीच त्यांना नाकारली गेली आहे. पोट आणि हातही असलेल्या, कल्पकतेला तोटा नसलेल्या एवढ्या प्रचंड वर्गाला परावलंबी ठेवणारी ही व्यवस्था मोडून काढणे ही समाज म्हणून सर्वांचीच जबाबदारी आहे. असे झाल्यास निखळणाऱ्या अनेक कड्या सांधल्या जातील. स्वयंपाकघरातील मनुष्यबळ दुप्पट होईल आणि काम निम्मे. पाकीटबंद पदार्थ कमी, पोषण अधिक. मोकळा वेळ वाढेल, तो व्यायामासाठी सत्कारणी लागेल. स्थूलतेपासून काही पावले मागे सरकण्यास हातभार लागेल.

स्थूलता हे भूषण नाही, हा अनेक व्याधींना निमंत्रण देणारा आजार आहे, हे आता तरी स्वीकारावे लागेल. त्याच वेळी केवळ सडपातळ बांधा म्हणजे निरोगी व्यक्ती या गैरसमजालाही दूर ठेवावे लागेल. कारण अलीकडे फॅड डाएटच्या नादी लागणे जिवावर बेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचे दुसरे टोक म्हणजे जिममध्ये जाऊन आणि प्रोटीन पावडरच्या बरण्या रित्या करून कमावलेले पीळदार शरीर. त्याचे महत्त्वाच्या अवयवांवर किती गंभीर परिणाम होतात, हेही सिद्ध होऊ लागले आहे. समस्त मानवजातीला प्रथिनेच तारू शकतात, या भ्रामक कल्पनेला मागे टाकावे लागेल. अगदी लहान लहान जीवनसत्त्वे आणि खनिजांचा अभाव शरीरात मोठा घोळ घालू शकतो, हे स्वीकारावे लागेल.

वाढता लठ्ठपणा हे आपल्या अर्थव्यवस्थेसमोरीलही एक मोठे आव्हान आहे. आधीच तोळामासा आर्थिक तरतूद असलेल्या आपल्या आरोग्य यंत्रणेला त्याचा भार झेपणार नाही. मनुष्यबळ निरोगी राहिले नाही, तर त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणारच.

आरोग्य म्हणजे ताटासमोर बसून कॅलरी मोजणे किंवा काट्यावर उभे राहून वा मोजपट्टी घेऊन ग्रॅम, इंच मोजत बसणे नव्हे. अन्न अतिशय मौल्यवान आहे. कित्येक पिढ्यांनी खूप कष्टाने, विचारांती आणि कल्पकतेने विकसित केलेले संचित त्यात सामावलेले आहे. त्याचे ग्रहण करताना अपराधीपणाची वा भीतीची भावना बाळगणे हा करंटेपणाच. स्थूलतेचे आव्हान अन्नामुळे नव्हे सर्वच स्तरांतील अज्ञान आणि बेजबदारपणामुळे उभे ठाकले आहे. त्यामुळे किमान यापुढे तरी ‘उदरभरण नोहे…’ हे लक्षात ठेवूनच वाटचाल करावी लागेल.