विराटच्या शतकी प्रवासापेक्षाही अद्भुत आणि सुंदर आहे, त्याने केलेला व्यक्तिमत्त्वातील बदल. तो करताना कुठेही त्याचे क्रिकेटप्रेम किंवा तंदुरुस्तीविषयीची उत्कटता पातळ झालेली नाही..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटच्या आद्य नायकांसमोर विराट कोहलीने एकदिवसीय शतकांचे विक्रमी अर्धशतकी शिखर सर केले. असा योग फार थोडय़ांच्या नशिबी येतो. विराटचे विक्रमी पन्नासावे शतक विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात झळकणे हे तर अधिकच अभूतपूर्व. वैयक्तिक विक्रम आणि सांघिक कामगिरी यांचा मेळ सहसा साधला जात नाही. विराट कोहलीच्या बाबतीत तोही योग जुळून आला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंतच्या दहा सामन्यांमध्ये दोन अपवाद वगळता उर्वरित सामन्यांत विराटने पन्नास धावांच्या पलीकडे मजल मारलेली आहे. यात दोन शतकांचाही समावेश आहे. आणखी किमान दोन सामन्यांत तो शतकाच्या आसपास येऊन बाद झाला. शतकासमीप आल्यावर विक्रमासाठी सावधपणे खेळू लागतो, असा आरोप विराटवर समाजमाध्यमांवर झाला. तो करणाऱ्या बहुतेकांना भावनिक लाटेवर आरूढ होणे अंगवळणी पडलेले असते आणि बुद्धी नामे आदिम मानवी गुणाचा विसर पडलेला असतो. विराटची ५० पैकी २७ शतके लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना नोंदली गेली आहेत, हे यांच्या गावीही नसते. हा हिशोब केवळ लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करतानाच्या शतकांचा आहे. शतकाच्या आधारावर यशस्वी लक्ष्य उभारणीची उदाहरणेही विराटच्या बाबतीत डझनावरी सापडतील. तो स्वार्थी आहे, असे अलीकडेच एका ज्येष्ठ निवृत्त क्रिकेटपटूने सांगितले. सांघिक खेळात स्वार्थ साधूनच संघाची कामगिरी उंचावता येते. गोलंदाजाने बळी मिळवणे आणि फलंदाजाने धावा काढणे यात मुळातच स्वार्थी हेतू गृहीत धरलेला असतो. धावा न काढणारा फलंदाज किंवा बळी न घेणारा गोलंदाज राष्ट्रीय संघात सोडा, पण क्लब किंवा गल्ली संघातही टिकून राहणे अशक्यच. विराट कोहली किंवा त्याच्या आधी सचिन तेंडुलकर यांच्या शतकांच्या राशींचे अवलोकन करताना, या शतकांच्या अनुपस्थितीत भारताची यशोगाथा कशी काय साधली गेली असती याचा विचार व्हायलाच हवा. एखाद्यावर सरसकट ‘स्वार्थी’ असा शिक्का मारताना, त्याच्या त्या टप्प्यापर्यंतच्या खडतर प्रवासाचे विस्मरण होते. सचिनही स्वार्थासाठी खेळतो, असा आरोप झालाच. सचिनचे शतक म्हणजे भारत हरणार, असे एक बिनडोकी विधान प्रसृत करण्यात मराठी जनच पुढे असायचे. पण सचिनच्या शतकांनी भारतीय क्रिकेट संघाला स्थैर्य आणि आत्मविश्वास दिला. आणि तरीही सचिनच्या १०० शतकांपैकी (४९ एकदिवसीय अधिक ५१ कसोटी) कित्येक खेळींमुळे भारताला विजय साकारता आला किंवा पराभव टाळता आला. सचिनला गुरुस्थानी मानणाऱ्या देशातील असंख्य क्रिकेटपटूंमध्ये विराटही आहे. परंतु सचिनकडून प्रेरणा घेताना ‘सचिनसारखाच’ बनण्याचा प्रयत्न त्याने कधीही केला नाही, हे त्याचे नि:संशय यश. एरवी दैवताच्या भक्तिरसामध्ये आकंठ बुडणाऱ्यांचा हा देश. कित्येकांना अशा डुबक्यांतून बौद्धिक मांद्य येते आणि त्यांची स्वत:ची अशी ओळख कधीही निर्माण होऊ शकत नाही. विराटने हे कटाक्षाने टाळले. सचिनरूपी आदर्शाचा आदर करताना, विराटने स्वत:चा स्वतंत्र असा मार्ग चोखाळला. त्यातून जे रसायन घडले, त्याचा खुद्द सचिनलाही हेवा वाटतो, हेही विराटचे यशच.

हेही वाचा >>> अग्रलेख: बायडेन बहु बडबडले..!

वानखेडेवर विराटच्या परवाच्या अर्धशतकी खेळीचे साक्षीदार दस्तुरखुद्द व्हिव्हियन रिचर्डसही होते. ते तर आद्य एकदिवसीय फलंदाज. सचिन आणि रिचर्डस हे दोघेही विराटच्या विक्रमाचे साक्षीदार असणे हाही विलक्षण योगायोग. कारण विराटच्या फलंदाजीत सचिनची निर्दोष तंत्रशुद्धता आणि रिचर्डस यांचा गुर्मीसदृश आत्मविश्वास यांचा अभूतपूर्व मिलाफ दिसून येतो. ज्यांच्या निव्वळ मैदानावरील आगमनाने जगभरातील क्रिकेट मैदानांमध्ये प्रेक्षक आदराने उठून उभे राहतात असे हे तीन फलंदाज. हा मान इतिहासात बहुधा केवळ सर डॉन ब्रॅडमन यांनाच लाभला असावा. एकदिवसीय क्रिकेटमध्ये निर्णायकता असल्यामुळेच कसोटी क्रिकेटपेक्षाही ते अधिक लोकप्रिय झाले. बराच काळ क्रिकेटमधील जगज्जेता ठरवण्याचे ते एकमेव परिमाण मानले गेले. अशा या क्रिकेटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणे ही सर्वाधिक आव्हानात्मक बाब असते. विराट कोहली या कलेत निपुणोत्तम. हे केवळ फलंदाजीतील तंत्रशुद्धतेने साधत नाही. त्यासाठी एकाग्रता, हिंमत आणि चतुराईदेखील लागते. त्यापेक्षाही मोठी महत्त्वाकांक्षा लागते. रिचर्डस आणि सचिन यांच्यासाठी क्रिकेट हा निव्वळ खेळ होता. सचिनसाठी त्याच्या जोडीला कोटय़वधी क्रिकेटरसिकांच्या आशा असायच्या. तरीही त्याला परिस्थितीनुरूप खेळ करावा लागला. विराटने परिस्थिती निवडली आणि तिला वाटेल तेव्हा आणि तशी बदलण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. नव्वदच्या दशकातला सचिन, नवीन शतकातला सचिन यांच्यात बदल होत गेले. पण बदलांचा कालखंड मोठा होता. विराटच्या बाबतीत हे बदल चटकन होत गेले, एखाद्या मोटारीने झटपट गियर बदलावे तसे. सचिन कोणत्याही परिस्थितीला स्थिरचित्त एकाग्रतेने आणि शालीनतेने सामोरा गेला. विराटला सुरुवातीला तशी गरज वाटली नाही.

याचे कारण सचिनचा उदय झाला त्या काळात भारतीय संघ संक्रमणावस्थेत होता. सुनील गावस्कर निवृत्त झाले होते नि कपिलदेव यांच्या कारकीर्दीचा उत्तरार्ध सुरू झाला होता. त्या तुलनेत विराटचे पदार्पण स्थिर आणि विजयी संघात झाले. परंतु सचिन आणि तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या व्यक्तिमत्त्वांचा त्याच्यावर हळूहळू प्रभाव पडत गेला. हे बदल स्वीकारण्याचा परिपक्वपणा विराटने दाखवला, हे उल्लेखनीय.

सचिन महान क्रिकेटपटू ठरतो. तेच धोनीच्या बाबतीत म्हणता येईल. विराट कोहलीच्या बाबतीत सुरुवातीस तसे काहीच आढळून आले नाही. अफाट गुणवत्तेच्या जोडीला असीम चंचलता त्याच्या ठायीठायी भरली होती. यातूनच मैदानावर प्रेक्षकांच्या दिशेने शिवीगाळ करणे, आक्षेपार्ह अंगविक्षेप करणे, प्रतिस्पर्धी खेळाडूंवर धावून जाणे असले प्रकार दिसून यायचे. काहींना त्या आक्रमकपणात नवीन भारताचा हुंकार वगैरे आढळून यायचा. पण यशस्वी खेळाडूची खरी ओळख मैदानावर सभ्यपणा दाखवूनच अधोरेखित होते हा ‘सचिनगुण’ विराटने विलंबाने का होईना अंगी बाणवला. तसा बदल स्वत:मध्ये घडवून आणण्यासाठी आवश्यक असा रसरशीत उमदेपणा विराटने दाखवला, त्यामुळेच इथवर मजल मारल्यानंतर विराटमधील क्रिकेटपटूइतकेच- किंबहुना अधिक त्याच्यातील माणूसपणाचे गुणगान होत आहे. मैदानाप्रमाणेच मैदानाबाहेरही महत्त्वाच्या विषयांवर भूमिका घेण्याबाबत तो सचिनलाही मागे टाकतो.

हेही वाचा >>> अग्रलेख: ‘सहाराश्रीं’ची श्रीशिल्लक!

आक्रमक विराटमध्ये ‘तारणहार’ मानसिकता ठासून भरली होती. आसमंतात सारे काही सुरू आहे, ते आपल्यामुळेच, आपल्यासाठीच असे वाटणाऱ्यांची या देशात कमतरता नाही. परंतु यशस्वी क्रिकेटपटू आणि उत्तम कर्णधार असूनही कपाटामध्ये एकही चषक येईना. संपूर्ण स्पर्धेत सम्राटाच्या टेचात वावरताना, मोक्याच्या क्षणी सातत्याने अपयश आल्याने सेवकाचे भाव तोंडावर आणून अदबीने िवगेत उभे राहण्याची वेळ विराटवर वारंवार आली. कदाचित अपयशांच्या त्या मालिकेने तथाकथित जेत्यांच्या मानसिकतेचा फोलपणा विराटच्या लक्षात येऊ लागला असावा. त्यातूनच नेतृत्व त्यागण्याचा अशक्यप्राय निर्णय तो घेता झाला. सचिन, धोनीच्या मार्गदर्शनाने आणि विवाहोत्तर आयुष्यात अनुष्का शर्मासारख्या विचारी अभिनेत्रीच्या प्रवेशाने विराटमध्ये बदल होत गेला. हा बदल त्याला स्वत:ला आवडू लागला. त्यामुळेच ज्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंसमोर आणि ऑस्ट्रेलियन मैदानांवर त्याने बेलगाम आक्रमकपणा दाखवला, त्याच क्रिकेटपटूंमध्ये आणि मैदानांवर विराटचे निस्सीम चाहते निर्माण झाले आहेत. विराटच्या शतकी प्रवासापेक्षाही अद्भुत आणि सुंदर आहे, त्याने स्वत:हून स्वीकारलेला व्यक्तिमत्त्वामधील बदल. तो स्वीकारताना कुठेही क्रिकेटप्रेम किंवा तंदुरुस्तीविषयीची उत्कटता पातळ झालेली नाही. क्रिकेटच्या परिघाबाहेर सर्वात परिचित खेळाडू अशी त्याची ओळख नि बेकहॅम, जोकोविचसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये त्याच्याप्रति असलेला आदरभाव विराटच्या वैश्विकत्वाची साक्ष पटवणारा आहे. या वैश्विकत्वामागील शहाणीव अस्सल देशी आहे, ही बाब भारतीयांसाठी सुखावणारी ठरते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on virat kohli for breaking sachin tendulkar centuries record in odi zws
Show comments