नीट असो की नेट, राज्यपातळीवर पोलीस भरती असो की टीईटी, प्रवेशासाठी असो वा नोकऱ्यांसाठी परीक्षांची विश्वासार्हता टिकवण्याचा प्रश्न आहे…

भारतात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रवेश परीक्षा सुरू झाल्या; तेव्हा यापुढे घोकंपट्टी बंद होऊन खऱ्या गुणवत्तेचे चीज होईल, अशी आशा निर्माण झाली होती. पण नव्या शतकाची पंचविशी अजून होते ना होते, तोच या प्रवेश परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर नैराश्य झाकोळून आले आहे. यंदा तर त्याचा कहर झाला. वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ अर्थात ‘नीट’मधला गोंधळ संपलेला नसताना आता ‘यूजीसी-नेट’ ही आणखी एक परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात ‘एनटीए’कडून या दोन्ही परीक्षा होतात. तब्बल ६७ विद्यार्थ्यांना मिळालेल्या पैकीच्या पैकी गुणांमुळे निर्माण झालेल्या शंका, वेळ कमी पडला म्हणून काही विद्यार्थ्यांना दिलेले वाढीव गुण, तसेच पेपरफुटीच्या शक्यता आणि त्या अनुषंगाने सुरू झालेले तपासचक्र यामुळे यंदाची ‘नीट’ परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू आहे. त्यावर निकाल येईलच, पण तोवर ‘नीट’ ही परीक्षा दिलेल्या सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांना यंदा वैद्याकीय प्रवेशांचे नक्की काय होणार, आपल्याला ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार का, असे काही अवघड प्रश्न पडले आहेत. त्यातच आता यूजीसी-नेट ही परीक्षाही थेट रद्दच करण्याचा निर्णय आल्याने या परीक्षेला बसलेले नऊ लाख विद्यार्थीही कमी-अधिक प्रमाणात अशाच काही प्रश्नांना सामोरे जात आहेत. सहायक प्राध्यापक पदासाठीच्या पात्रतेसाठी, तसेच पीएचडी प्रवेशांसाठी आवश्यक असलेली ही परीक्षा १८ जूनला झाली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ जूनला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ती रद्द करण्याचे आदेश दिले. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे कागदावरच निवडण्याच्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपविण्यातही आला आहे. गैरप्रकाराचा संशय येताच त्याचा तपास होणे योग्य; पण ज्या विद्यार्थ्यांचा या कशाशीही संबंध नाही, त्यांच्यावर काय आभाळ कोसळले असेल? मुळात मुलांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या प्रवेश परीक्षा अजूनही पारदर्शक पद्धतीने घेता येत नाहीत, हे यंत्रणेचे अपयश आहे, हे मान्य करून त्यात सुधारणा घडणार की नाही, हा पहिला मुद्दा. पण दुसरा मुद्दा त्याहीपेक्षा चिंता वाढवणारा.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial the question of maintaining the credibility of exams whether for college admissions or jobs amy
First published on: 21-06-2024 at 05:20 IST