राजा देसाई
आपलं जगावरचं प्रेम बुद्धीतून कसंबसं ओठापर्यंतच उतरतं, हृदय शुष्क; आणि हृदयात त्या प्रेमाशिवाय कशालाच जागा नसलेल्यांचं कर्म त्यांना संत-महात्मे बनवतं ! गांधी हे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं नाव. त्यांच्या भावुक स्मरणरंजनात न गुंतता अर्थकारण/समता असो की धर्म/राष्ट्रकारण, आज जग/भारताच्या वास्तवाकडे पाहताना पडलेले हे केवळ काही प्रश्न.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत धर्म हाच मानवी कल्याणाचा एकमेव विचार होता. उपदेश आणि नित्य/नैमित्तिक आचार यातून मानवी मन हळूहळू ‘आत्मौपम्येन सर्वत्र…’ ( सर्वांभूति परमेश्वर : आपल्याला सुखदु:ख तसंच प्रत्येक प्राणिमात्राला ) अनुभवणारं असं संवेदनशील होईल व मग मानवी दु:खाचं मूळच नष्ट होईल अशी आशा त्यामागे होती. त्याचं फलित काय हा प्रश्न उरतोच. तसंच विसाव्या शतकात ‘धर्म-अफू’ऐवजी समतावादी राज्यवादाचा जगड्व्याळ प्रयोग झाला; त्याचंही फलित काय? त्याचे लाभधारक व पुढच्या पिढ्या आज ग्राहक म्हणून नव-भांडवलशाही जागतिक बाजाराचे एक प्रमुख आधारस्तंभच नाहियेत का ? चीनचा ‘रशिया’ झाला नाही तरी माणूस बदलला का? मग राजकीय पोलादी चौकट कायम का? भौतिकवादात अत्यंत महत्त्वपूर्ण सत्यांश जरूर आहे पण मानवी मनाचं स्वरूप, त्याची खोली व दु:खाची व्याप्ती बाह्य भौतिक समतेच्या कवेत न येणारी आकाशाएवढी आहे.

हेही वाचा >>>International Right to Information Day : महाराष्ट्रातील माहिती अधिकाराची सद्य:स्थिती

वरील दोन्ही टोकांना एक प्रकारे जोडण्याचा प्रयत्न करणारा, हृदय परिवर्तनाचा, सामूहिक अहिंसा/सत्याग्रहाचा सुवर्णमध्याचा मार्ग गांधींनी सप्रयोग दाखवला; पण त्यासाठीही जीवन कसं हवं? परिसरातील वस्तू-सेवाधारित संयमित गरजा व शरीरश्रमाधारित चरितार्थ चालवणारं निसर्गानुकूल जीवन हे माणसाच्या आत्मिक विकासाला पोषक : अशी दिशा गांधींनी आपल्यासमोर ठेवली व त्यासाठी ग्रामराज्यही ज्यात माणसाला खरंखुरं ‘स्व-राज्य’ मिळू शकतं. पण हे आम्हाला पेललं का? समाज तर सोडाच, अगदी जन्मापासूनच गांधी वा तत्सम समतावादी विचार-संस्कारात वाढलेल्यांच्या तसेच ते विचार आजही प्रामाणिकपणं स्वीकारणाऱ्या/समाजापुढे मांडणाऱ्यांच्याही पुढच्या पिढ्या, विशेषत: त्यातील आजचे तरुण, कोणतं जीवन कुठे कुठे जगत आहेत, त्यांची जीवन-स्वप्नं/आशाआकांक्षा काय आहेत ( चार महिन्यांनंतरच्या मुंबईच्या ब्रिटिश रॉक कन्सर्टच्या ऑनलाइन तिकिटासाठी पहिल्या क्षणी सव्वा कोटी लोक लॉग-इन करतात: ही झलक! ), सुसाट धावणाऱ्या तंत्रज्ञानाधारित बाजारात रोज येणारी नवनवीन कोणतीही साधनं/सेवा/वस्तू ते ( वा अगदी आपण जुन्या पिढ्याही ) कितीशी नाकारित आहोत? ‘चंगळवाद’ हाकाटीनं हे चित्र बदलेल? ‘खेड्याकडे चला’ सोडाच, आजच जगाचं एकिकडे ५०-६० टक्के शहरीकरण झालं आहे/वाढत आहे व चरितार्थासाठी खेड्यात/शेतीत आनंदानं कोणाला राहायचंय हा प्रश्न आहे, या साऱ्या चित्रातून जग कोणत्या दिशेनं धापा टाकीत धावत आहे असं दिसतं? आज चैन व गरज यांची व्याख्या तर जणू रोज बदलत आहे !

महात्मा सत्यच पण तसा कोटीत एक ! एरवी मनुष्य म्हणून जवळपास आपणा सर्वांचंच हे खरं रूप आहे : ‘अंतरीचे धावे बाहेरी स्वभावे!’ तुकोबांच्या या त्रिवार सत्यातील हे ‘अंतरी’चे रसायन बदलणार कसं हा खरा अंतिम पेच आहे; खरं तर धर्म आणि भौतिकवाद ही एकाच गाडीची दोन चाके असावीत. थोडक्यात सुंदर जीवनाच्या केवळ मेंदूतील गणिती तत्त्वज्ञानी मांडणीचा माणसातील निसर्गच पराभव करतो असाच या साऱ्या इतिहासाचा अर्थ नव्हे का?

असो. गांधींच्या ‘धर्मा’चं काय ?

आज इथं धार्मिकच नव्हे तर राजकीय द्वेष/वैराचीही भावना अगदी टोकाला गेलेली आहे ( केवळ राष्ट्रीय ऐक्यासाठीही ही अत्यंत चिंतेची बाब आहे). कोणत्याही समाजात अनेक संकुचित वृत्ती नेहमीच अस्तित्वात असतात; जेव्हा समाजाचं उच्च नेतृत्व उदार प्रगल्भ दृष्टीचं असतं तेव्हा अशा वृत्ती दबलेल्या राहातात, तर असं नेतृत्वच जेव्हा अनुदार संकुचित दृष्टीचं असतं तेव्हा त्या वृत्ती अगदी तळागाळापर्यंत उफाळून येतात. पाहा ओबामांची अमेरिकाही आज ‘ट्रम्पी’ होत असताना!

हेही वाचा >>>पर्यटन म्हणजे निव्वळ उपभोग नव्हे, समृ

समूह-अस्मितेच्या वास्तवाला आदर्शवादी रागलोभ/संताप/शिव्याशापांशी काहीही देणंघेणं नसतं व त्यामुळे ना तो बदलत ना तो ते विचार स्वीकारत हे लक्षात ठेवूनच समाज-जीवन परिवर्तनाचा विचार/आचार करणं भाग असतं. समाज आदर्शवादाच्या मागे नेहमीच थोडाच काळ जातो व तेव्हाही त्याची अनेक कारणं असतात; त्याने ते विचार स्वीकारलेले, विशेषत: पचवलेले असतात असं बिलकूल नसतं. कोणत्याही आदर्शवादाची तात्पुरती टिकणारी लाट ओसरली की ते लक्षात येतं.

गांधींना जणू जीवनार्थ ज्यात सापडला ती अहिंसा हा तर जणू एक फक्त शब्दच उरलाय. व्यक्तिगत, कौटुंबिक, सामूहिक व राज्यवादी या सर्व स्तरावर सर्वत्र हिंसेचे तर थैमान दिसून येतं. एकिकडे अण्वस्त्रांच्या धमकीसहित युक्रेन-युद्ध चालू आहे तर दुसरीकडे शंभरएक वर्षं राष्ट्रविहीन गुलामीसदृश अवस्थेत ठेवण्यात आलेल्या एका लहानशा गाझा-पॅलेस्टाईन समूहाला (आता लेबेनॉनही ) गेले वर्षभर अण्वस्त्रधारी असलेलं अत्यंत प्रबळ राष्ट्र ( इतर प्रबळांच्या पाठिंब्यानं ) बेचिराख करून टाकीत आहे (मनुष्यहानीच ६० हजारांच्या घरात ) आणि जग स्वस्थ आहे. हा आहे समृद्धीनं केलेला जगाच्या संवेदनशीलतेचा विकास! थोडक्यात धर्म, वंश, राष्ट्र यांच्या अभिमानाखाली दडलेले सारे राग, लोभ, सूड व त्याआधारित सत्ताकारण भारतासहित जगभरच कमीजास्त प्रमाणात सतत उफाळून येताना दिसत आहेत. आपापल्या धर्म/परंपरांतील कालमहिम्यानं दडपलेल्या सत्त्वशील जीवनदायी गोष्टी प्रकाशात आणणं आणि उलट त्याऐवजी केवळ अहितकारी अस्मितांना हवा देणं या दोन पूर्णत: वेगळ्या गोष्टी आहेत.

असो. वर उल्लेखिल्याप्रमाणे अर्थरचनेसहित समाजाचं भौतिक अंग मानवी मनाची भूक ठरवीत जाते. ‘चरखा/पंचा’धारे गांधी विचाराला कोणा ‘ईझम्’मध्ये न कोंडता त्याचा गाभा शोधावा लागेल: ‘Words killeth; spirit liveth ’-गांधी

‘जमाना गांधी/मार्क्स से बहुत आगे गया है ( हे ५० वर्षांपूर्वी ); अब वो दोनो जैसे के वैसे नही चलेंगे.’-विनोबा.

म्हणून जीवनाचं मौलिक बदलत नसलं तरी वायुवेगानं बदलत्या परिस्थितीचा त्या आधारे वेळोवेळी नवा विचार करावाच लागतो; वास्तव आणि आदर्श यांच्या मेळाचा प्रयत्न हवा: नवभारताच्या उभारणीसाठी गांधींनी पूर्ण वेगळ्या विचारांच्या नेहरूंची निवड केली व त्याचीच फळं आपण चाखीत आहोत.

अन्यायाविरुद्ध लढाईकडे भारत कसं पाहातो ? ‘प्रत्येक अंधार-समयी सदैव प्रकाश देणारी’ गांधींची भगवद्गीता दुर्योधनाचं पारिपत्य करतानाही ‘…युध्यस्व विगतजर:…’ ( संताप/द्वेषाचा ज्वर नको ) बजावते : द्वेष करणाऱ्यांचाही द्वेष नाही! हृदय परिवर्तनाच्या गांधी-विचारातही प्रति-द्वेषाला तरी स्थान आहे का? कोण म्हणालं ‘माझी स्वातंत्र्याची लढाई ही आपल्याला ( इंग्रज ) साम्राज्यवादी मनोवृत्तींतून मुक्त करून आपल्या हृदयाचं उन्नयन करण्यासाठीही आहे!’ धर्म-संतप्त समाज-मनाला असं काही सांगण्याचा नैतिक अधिकार आपण कमावला आहे का? तर तो आज ना उद्या तुमचं ऐकेल; साधना हवी, धीर हवा. ‘विचारानं समाज लवकर बदलत नाही म्हणून तो अविचारानं बदलायच्या मागे लागायचं का ?’ विनोबा. सत्ताकारण केवळ वर्तमानाच्या रागलोभ/सूडांचंच असतं आणि तसं ते अधिकाधिक बनवलंही जातं; त्याविषयी उदासीन नसणं आणि अत्यंत प्रामाणिकपणे आदर्शवादी संतप्त दृष्टीनं ते सुधारण्यावर नकळत लक्ष केंद्रित होत जाणं यात बरंच अंतर आहे. कोणताही, केवळ वर्तमानाकडे पाहणारा विचार हा शाश्वत असूं शकत नाही : ना धर्मी द्वेष टिकेल, ना निधर्मी प्रति-द्वेष!

व्यवहार्य वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही अखेर मौलिक जीवनदृष्टींत दडलेली असतात आणि जीवन-श्रेयसाच्या निश्चितीशिवाय ती दृष्टी पक्केपणानं लाभणं शक्य नसतं.

धर्माधिष्ठित राजकारण नको म्हणताना ‘धर्मविहीन राजकारण हा मृत्यूचा सापळा’ या एक प्रकारे कोड्यात टाकणाऱ्या दुर्लक्षित गांधी-शब्दांतील धर्म म्हणजे काय, ‘ईशावास्यमिदं सर्वं…’मध्ये सारा हिंदू-धर्म येतो, ‘माझं सारं राजकारण हे मी अधीर असलेल्या मोक्षासाठी’, ‘जडवादी विचार मनुष्याला चिरशांती देऊ शकत नाही’ इत्यादी त्यांच्या मौलिकांचा आपण किती सखोल विचार केला आहे? ( की त्या साऱ्या ‘प्रकरणा’कडे समाज-क्रांतीविचारात फारसं लक्ष देण्याची गरजेचं नाही असं अबोध पातळीवर तरी वाटत आलं आहे? ) बरं ते अगदी स्पष्ट नाहीये असं तरी आहे का ? ‘…परमेश्वर का साक्षात्कार करनाही जीवन का एकमात्र योग्य ध्येय्य है. जीवन के दूसरे सारे कार्य इस ध्येय्य को सिद्ध करने के लियेही किये जाने चाहिये…’ हे गांधींचं जीवनश्रेयस समजल्या/स्वीकारल्याशिवाय, जग कोणत्याही दिशेनं जात असलं तरी, ‘एकला चलो रे’च्या आपल्या कर्माला भक्कम कालातीत (गांधी) आधार/शक्ती सापडेल का?

rajadesai13@yahoo.com