संयोगिता ढमढेरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंगणवाड्यांच्या मदतीने तसंच ‘आरंभ’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून राज्य सरकार पहिल्या एक हजार दिवसांमध्ये मुलांच्या वाढीत पूर्ण लक्ष पुरवतं आहे.

पुणे जिल्ह्यात राजगड किल्ल्याच्या पायथ्याचं गुंजवणी गाव असो की नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक, पेठ या तालुक्यांमधली दूर दूर पसरलेली चिखलवाडी, टाकेहर्ष, बोंडारमाळ, कुळवंडी ही गावं की शहरातल्या गरीब वस्त्या. यात एकच समान धागा आहे. इथल्या महिला आणि मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी वाहत आहेत, अंगणवाड्या आणि अंगणवाडीतील ताई!

या बहुतांश गावात जाण्यासाठी सार्वजनिक वाहन नाही. ना इतर सोयी सुविधा. मात्र अंगणवाडीत सहा वर्षांखालील मुलांना, गरोदर आणि स्तनदा मातांना आहार मिळतो. त्यांची तपासणी होते. त्यामुळे लहान बाळांचं कुपोषण लक्षात येताच ते दूर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या सगळ्यालाच आता तीन वर्षांखालील मुलांचं संवेदनशील पालकत्व करणाऱ्या ‘आरंभ’ची जोड मिळाल्याने अंगणवाड्या हा सुदृढ मुलं आणि सुजाण पालकत्वाचा दुवा बनत आहेत.

बालसंगोपनाच्या धोरणानुसार (nurturing care framework) जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि जागतिक बँक बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी, तसेच त्यांच्या आरोग्य आणि संभाव्य मानवी क्षमतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. इतर कोणत्याही कालावधीपेक्षा गर्भधारणेपासून ते सुरूवातीच्या तीन वर्षापर्यंत मेंदूची वाढ अगदी झपाट्याने होत असते आणि हे बालविकासाचे धोरण (nurturing care framework) सुरूवातीच्या वर्षाचे व मेंदूच्या वाढीचे महत्त्व अधोरेखित करते. महाराष्ट्र शासन ‘आरंभ’च्या माध्यमातून आणि अंगणवाड्यांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून पहिल्या एक हजार दिवसांमध्ये मुलांच्या वाढीसाठी पूर्ण लक्ष पुरवतं.

हेही वाचा : चिंतनधारा: देखावा नको, कर्तव्य करा!

लहान वयात मुलांशी संवाद हा ‘आरंभ’चा गाभा आहे. एखादं मूल का खेळत नाही, हसत नाही, जवळ येत नाही यांचं निरीक्षण करायला सांगितलं जातं. गुंजवणीतल्या तन्वीचं जन्माच्या वेळी वजन दोन किलो २०० ग्रॅम होतं. गरोदर असताना तिची आई कामासाठी पुण्याला गेल्याने उषाताई आल्हाट या अंगणवाडी ताईंना तिला सेवा पुरवता आल्या नव्हत्या. तन्वीचा मात्र त्या जन्मापासून पाठपुरावा घेत आहेत. तन्वीचं वजन आणि वाढ पाहण्यासाठी तन्वीची आई तिला अंगणवाडीत घेऊन आली की ताईना पाहून ती खूप रडायची. “आईशिवाय ती कुणाकडेच जात नव्हती. इतर कुणाला पाहिलं की ती रडायलाच लागते. थांबतच नाही. तिचं वजनही कमी होतं. मी तिच्या नियमित गृहभेटी घेत होते. १४ महिन्याची झाली तरी ती चालत नव्हती. तिला औंधच्या दवाखान्यात घेऊन गेलो, तिच्यासाठी चालायची गाडी आणली.” उषाताई म्हणाल्या. तन्वीचे वडील पुण्यात कामाला जातात. रविवारी घरी येतात. तन्वीकडे कुणीतरी पूर्णवेळ लक्ष दिलं पाहिजे म्हणून त्यांनी दुसऱ्या गावावरून एका मावशीला बोलावलं. त्या तन्वीकडे विशेष लक्ष देऊ लागल्या. तिच्या खाण्याची काळजी घेऊ लागल्या. तिला वजनवाढीसाठी लाडू द्यायला सांगितले. त्यामुळे तिच्या तब्येतीत सुधारणा झाली. ती आता आईकडून मावशीकडे जाऊ लागली. चालायला, बोलायला लागली. आता ती आत्या- आजीबरोबर राहते. पांगुळगाड्याच्या मदतीने तिने चालायला सुरुवात केली आणि आता ती स्वतंत्रपणे चालते.

हेही वाचा : उलटा चष्मा : सारे काही सहिष्णुतेसाठी..

“मुलं अनुकरण करतात. त्यांच्या हालचालींच बारीक निरीक्षण करावं लागतं. मला तीन वर्षांचा मुलगा आणि ११ महिन्याची मुलगी आहे. त्या दोघांसोबतही आरंभमध्ये दिलेल्या सर्व कृती करून बघते,” उषाताई म्हणाल्या.

आरंभ नसतं तर तन्वीची वाढ तिच्या वयानुसार होत नाही हे कुणाच्याही लवकर लक्षात आलंच नसतं. मूल खेळत नसेल, हसत नसेल, इतरांकडे जात नसेल तर तो केवळ त्या मुलाचा स्वभाव तसा आहे असं नसतं. वजन, पोषण, वाढ यांचा जवळचा संबंध आहे, हे उषाताईंनी सांगितल्यावर तन्वीच्या घरच्या व्यक्तींनीही त्यांना साथ दिली. त्यामुळे तन्वीचं स्वास्थ्य सुधारलं आणि तिच्यात सकारात्मक बदल दिसू लागले.

ग्रामीण भागांतल्या पालकांच्या मदतीसाठी

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यात चिखलवाडीतली खुशीही जन्मली तेव्हा कमी वजनाची होती. आज ती ११ महिन्याची आहे आणि तिचं वजन सात किलो म्हणजे नॉर्मल झालं आहे. सगुणा आणि राजू वारघडे यांची ही पहिली मुलगी. ते दोघेही स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या शेतावर कामाला जातात. खुशीची आजी हौसाबाई घरी राहून खुशी आणि मोठ्या मुलाच्या मुलाला सांभाळतात. अंगणवाडी ताईंनी हौसाबाईंनाच खुशीला काय आहार द्यायचा, तिच्याशी कसा संवाद साधायचा याची माहिती दिली. त्यांनीही ती मानली. त्याचे परिणाम पाहून हौसाबाई खूश आहेत. “आमच्या मुलांना आम्ही असंच सोडून द्यायचो. त्यांच्याकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नव्हता आणि घरातही कोणी नव्हतं. आता आम्ही सगळे बाळाशी खूप बोलतो. ती लगेच आमच्याकडे बघते. ही मम्मी, ते पप्पा असा सांगतो. बाहुली, कुत्र, मांजर असं दाखवतो. मुलगा आणि सून सकाळी साडेनऊला डबा घेऊन कामावर जातात. तिची आई दुपारच्या सुट्टीत येऊन तिचं दूध पाजते. मी तिला डाळ, भात, नागलीची भाकरी खाऊ घालते. खेळणी तिच्याजवळ आणून ठेवते. जरा दमायला होतं, पण तिचं वजन वाढलं, ती खेळते हे बघून सगळा थकवा दूर होतो.” हौसाबाई म्हणाल्या.

हेही वाचा : वाघनखांचे अभ्यास-दुवे..

“गरोदर महिलांना आम्ही प्रत्येक महिन्याला गृहभेटी देतो. बाळंत झाल्यावर मुलाला पहिल्या, तिसऱ्या, सातव्या दिवशी भेट देतो. त्यानंतर दर सात दिवसांनी भेटतो. गरोदरपणात चार वेळा जेवायाला सांगतो. त्यांचं वजन घेतो. तब्येत कशी आहे बघतो. तिसऱ्या महिन्यात नोंदणी करतो.” निर्मला गारे, चिखलवाडी अंगणवाडी सेविका सांगत होत्या. गेली १४ वर्ष त्या गावात काम करताहेत. “गरोदर बायकांना अंडं, मोड आलेली धान्यं, लिंबू खायला सांगतो. दुपारी डाव्या कुशीवर झोपायला, गरोदर असताना बाळाशी बोलायला सांगतो. दवाखान्यात बाळंतपण करतो. कांगारू मदर केअर म्हणजे जन्मल्यानंतर लगेच बाळाला अंघोळ घालायची नाही. त्याचं फक्त तोंड उघडं ठेवून गुंडाळून ठेवायचं. मुलाला आईच्या स्पर्शापासून दूर ठेवायचं नाही.” असं सांगतो. अशाच गृहभेटीत दूध पिताना खुशीच्या तोंडाचा आवाज येतोय असं त्यांना दिसलं. दूध पाजण्याची ही पद्धत चुकीची होती. निर्मलाताईंनी तिच्या आईला योग्य पद्धत समजावून सांगितली.

बाळाला हाक मारल्यावर ते लक्ष देतं का? लपवलेली वस्तू शोधतं का? घरातल्या सर्वांनी त्याच्याशी कसं आणि काय बोलायचं, फळ – भाज्या, गरम -गार स्पर्श याविषयी कसं सांगायचं, घराबाहेर पडताना बाळाला कसं सांगून जायचं, त्याला खेळू द्यायचं बाळाच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी हे कसं आवश्यक आहे हे समजावून सांगितलं जातं.

हेही वाचा : लोकमानस : टोल व रस्त्यांच्या दर्जाचे गणित जुळेना

त्र्यंबक तालुक्यातल्या टाके हर्ष गावात चैतन्य हा अडीच वर्षाचा मुलगा आणि त्याची ११ महिन्याची बहीण दिव्या यांना त्याचा किती फायदा झाला आहे ते प्रत्यक्ष पाहता येतं. दोन्ही मुलं जन्माला आली तेव्हाच सुदृढ होती. त्यांची आई सुनिता घुटे मुलाच्या वेळी गर्भवती होत्या तेव्हा करोना टाळेबंदी चालू होती. त्या काळातही त्यांचे पती गोरख यांनी त्यांच्या पोषणात कमतरता राहू दिली नाही. “त्यांनी मला सगळं पुरवलं. अंगणवाडीतूनही आहार मिळायचा. वेळेवर डोस आणि इंजेक्शन घेतले. मुलांना नाचणीची पेज, शेंगदाण्याचे लाडू, मुगाचं वरण, तांदळाची पेज खायला घालते. त्यांना ताई – दादा बोलायला शिकवलं. कोणी जात असेल त्याला बाय बाय करायला सांगतो. मुलाला दुकानातून काही गोष्टी आणायला सांगते.” सुनिताने सांगितलं. ते दोघे कामाला गेल्यावर सासूबाई मुलांना सांभाळतात. ही हसरी – खेळती मुलं गल्लीतल्या सगळ्या मुलांना आवडतात. ते त्यांच्या बरोबर खेळतात. त्यांना खेळणी बनवून देतात.

मुलांच्या शारिरीक, मानसिक वाढीसाठी प्रयत्न

पेठ तालुक्यातलं बोंडारमाळ छोटंसं गाव. या तालुक्यात गावं लांब लांब आहेत. लोक मुख्यत: शेती, शेत मजुरी करतात किंवा कंपनीत कामाला जातात. हा आदिवासी भाग आहे. मोसमी स्थलांतर होत असतं. सुशीलाबाई सहारे यांच्या घरी गेल्यावर त्यांची पावणे दोन वर्षाची नात केतकी ट्रेमध्ये दोन चहाचे कप (रिकामे) घेऊन आली. मुलं अनुकरणातून शिकतात. तिची आजी सुशीलाबाई तिला जे करावसं वाटतं ते करू देते. यामुळे केतकी स्मार्ट झाली आहे. अनोळखी माणसांना घाबरत तर तर नाहीच, त्यांच्याशी बोलायला त्यांना चहा-पाणी द्यायला पुढे येते. “आठव्या महिन्यात आम्ही तिला लापशी द्यायला लागलो. अंगणवाडीत नाश्ता मिळतो. आम्ही आमच्यासोबत तिला ताट देतो. ती आमच्याबरोबर डाळ – भात खाते. तिच्या वडिलांनी बाजारातून पक्ष्यांच्या चित्राचा तक्ता आणला आहे. त्या पक्षांची नावं सांगते. खेळणी खेळते. तिला सायकल, खुर्ची काय काय घेऊन येतात. आमची मुलं लहान असताना त्यांना सांभाळायला कोणी नव्हतं, तेवढ्या सोयी पण नव्हत्या. आताची मुलं हुशार आहेत. सगळं बोलतात. बाहेरच्या लोकांना घाबरत नाहीत.” सुशीलाताई सांगत होत्या.

आरंभचं प्रशिक्षण होण्याअगोदरच अंगणवाडी ताईंनी ‘आरंभ’ची पुस्तकं वाचून आई- वडील, पालकांना माहिती द्यायला सुरुवात केली होती. त्या गृहभेटी देतात, दर महिन्याला पालकसभा घेतात. भाज्या, फळं आदींचं वर्गीकरण, आकार, रंग शोधायला सांगतात. बाळाच्या भावना कशा समजून घ्यायच्या याची पालकांना कृती करून दाखवतात. तीन वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूची ९० टक्के वाढ होते. गावात महिला शेतात काम करतात, शहरात घरकामाला जातात, पुरुष रोजंदारीवर काम करतात. आई वडील किंवा त्यांच्या पश्चात मुलांची देखभाल करणाऱ्या व्यक्तींचा अंगणवाडी सेविका सतत पाठपुरावा करतात. त्याने फायदा होताना दिसत आहे.

हेही वाचा : अग्रलेख : आखाती अवलक्षण!

भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यामध्ये जमाणपूर गावात पायल दिनेश घरोटे यांचे संयुक्त कुटुंब आहे. पायलला दोन मुली असून पहिली मुलगी दिया कमी वजनाची होती. त्यातच पायल दुसऱ्यांदा गरोदर राहिली. तिचं स्वत:चं वजनही फारच कमी होतं. गरोदपणात पाच महिने पूर्ण झाल्यावरही केवळ दोन किलो वजन वाढलं होतं. म्हणजे ३५ किलोवरून ३७ किलो झालं होतं. हिमोग्लोबीनही खूपच कमी होतं. त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्ती कन्या साखरे, आशा – वैशाली साखरे आणि आशा गटप्रवर्तक – मनीषा नगरकर यांनी पायलच्या कुटुंबालाच आरंभ प्रशिक्षणा अंतर्गत माहिती देण्याचं ठरवलं. कुटुंबातील सर्व व्यक्तींना भेट देऊन, माहिती सांगितली. त्यांच्याकडूनही त्यांच्या आहाराविषयी सविस्तर जाणून घेतलं. पायलला नाश्ता दोन वेळा, तीन वेळा जेवण द्यावं, तसंच गूळ शेंगदाणे, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करण्याबाबत घरच्यांना समजावून सांगितले. त्याचा उत्तम परिणाम झाला आणि पायलचे वजन बाळंत व्हायच्या वेळी ४६ किलो झालं. बाळही ३.८ किलो वजनाचं होतं. पण दुसरीही मुलगी झाल्याने कुटुंबाला मुलगा हवा होता. पण तिसरं बाळंतपण पायलसाठी चांगलं नव्हतं. “आम्ही तिच्या कुटुंबियांना हे पटवून दिलं की मुलगी आणि मुलगा यात काहीही फरक नाही. आजच्या महागाईच्या जमान्यात तीन मुलांना वाढवणं, शिक्षण देणं कठीण आहे. उलट तुमच्या मुलीच तुमच्या कुटुंबाचं नाव मोठं करतील. पायलच्या सासूला ते पटलं. पायलला त्यांनी कुटुंबनियोजनाचं ऑपरेशन करण्याची परवानगी दिली,” वैशाली साखरे सांगतात.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarambh initiative of the government of maharashtra for the physical and mental growth of children css
Show comments