आर्थिक क्षेत्रातील सर्व उच्च पदे भूषवूनही कमालीची नम्रता हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता. त्यांनी त्यांच्या काळाला आकार दिला. त्यामुळे धाडसी आर्थिक सुधारणांचा शिल्पकार म्हणून ते देशवासीयांच्या स्मरणात राहतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आठवड्यात आपण ज्यांनी आपले जीवन अतिशय वेगळ्या अर्थाने समृद्ध केले, अशा भारतातील दोन अत्यंत उल्लेखनीय व्यक्तींची शंभरावी जयंती साजरी केली. त्यातली एक व्यक्ती मनाने कवी होती, तर दुसरी उत्तम गायक. कवी अटलबिहारी वाजपेयी यांनी जवळजवळ अर्धे शतक संसदेची सेवा केली. अनेकांच्या मते ते भारतातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान होते. तर मोहम्मद रफी वाजपेयींच्या एक दिवस आधी जन्माला आले आणि १९८० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आपल्या हृदयात आजही त्यांना स्थान आहे आणि आपल्या मधुर आवाजातून ते आजही लाखो लोकांना श्रवणानंद देत आहेत. या दोन दिग्गजांच्या स्मृतींना या आठवड्यात आपण उजाळा देत असताना, याच आठवड्यात, भारताचा आणखी एक विद्वान, विनम्र सुपुत्र आपल्यातून निघून गेला आहे. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने एका युगाचा अंत झाला आहे.

दोन वेळा पंतप्रधानपदी काम केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी धाडसी आर्थिक सुधारणांचा वारसा मागे ठेवला आहे. त्यांनी नेतृत्वातील शालीनता आणि ग्रेस म्हणजे काय यांचे दर्शन घडवले. डॉ. मनमोहन सिंग हे अनेक गोष्टींसाठी लोकांच्या स्मरणात राहतील, पण अंतिमत महत्त्वाचे आहेत ते त्यांच्यामधले सामान्य माणसात असलेले मानवी गुण आहेत जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतात. त्यासंदर्भात त्यांचे दोन किस्से आवर्जून सांगण्यासारखे आहेत. अर्थमंत्री या नात्याने त्यांना चलनाचे झपाट्याने अवमूल्यन करावे लागले, हा मोठाच धक्का होता, पण त्यातून निर्यातदारांना मोठा फायदाही झाला. साऊथ कमिशनचे प्रमुख म्हणून काम करून ते नुकतेच जिनिव्हाहून परतले होते. रुपयाच्या अवमूल्यनाच्या कठोर निर्णयामुळे त्यांना झालेला नफा त्यांनी मोजला आणि तो पंतप्रधान मदत निधीला दान केला. दुसरा किस्सा आहे तो दक्षिण दिल्लीतून ते लोकसभेसाठी उभे राहिले आणि हरले त्यासंदर्भातला आहे. त्यांनी आपल्या या निवडणूक मोहिमेच्या खर्चासाठी खुशवंत सिंग यांच्याकडून घेतलेले कर्ज त्यांनी परत केले. खुशवंत सिंग यांच्यासाठी मनमोहन सिंग यांचे हे वागणे आश्चर्यचकित करणारे आणि मनोरंजक होते. एखादा नेता आपल्याकडून उधारीवर पैसे घेतो आणि ते परत करतो हे खुशवंत सिंग यांना अपेक्षितच नव्हते. मनमोहन सिंग हे साधेपणा आणि साधेपणाचे प्रतीक होते.

हेही वाचा >>> आर्थिक वाढीला सामाजिक समतोलाची सम्यक दृष्टी

डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन म्हणजे खरोखरच एका युगाचा अंत आहे. अगदी साधी पार्श्वभूमी असलेला, फाळणीतील निर्वासित हे प्राक्तन वाट्याला आलेला हा माणूस कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या माध्यमातून सर्वोच्च पदी पोहोचला. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या गरीब आणि अशिक्षित देशापासून आज जगातील चौथी सर्वात मोठी आणि गतिमान अर्थव्यवस्था बनलेल्या भारताच्या उदयाशी त्यांचे जीवन समांतर होते. शैक्षणिक क्षेत्रातील उच्च यशामुळे त्यांनी केंब्रिज आणि ऑक्सफर्डमध्ये शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण घेतले आणि पंजाब विद्यापीठात आणि नंतर प्रतिष्ठित दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवण्यासाठी ते परत आले. केंब्रिजमध्ये इकॉनॉमिक्स ट्रायपोस या पदवी परीक्षेतमध्ये ते अव्वल होते. तिथे त्यांनी अॅडम स्मिथ पारितोषिक मिळवले होते, आजवर ते फक्त चार भारतीयांनी मिळवले आहे आणि डॉ. मनमोहन सिंग त्यांच्यापैकी एक होते. त्यांचा ऑक्सफर्ड विद्यापीठातील पीएच.डी. प्रबंध आणि नंतर १९६४ मधील त्यांचे पुस्तक ‘‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ-सस्टेन्ड ग्रोथ’’ हे तत्कालीन प्रचलित निर्यात निराशावादाच्या विरोधात होते. भारताला पूर्णपणे खुले धोरण स्वीकारायला आणि निर्यातीलाही आर्थिक वाढीचा चालक म्हणून स्वीकारायला आणखी तीन दशके लागली. १९९१ मध्ये त्यांनी आर्थिक सुधारणांची सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून परवाना राज संपुष्टात आणले, बँकिंग नियंत्रणमुक्त केले आणि व्यापार तसेच परदेशी गुंतवणुकीसाठी अर्थव्यवस्था खुली केली. ही अर्थमंत्री म्हणून त्यांनी उचललेली काही अत्यंत महत्त्वाची पावले होती. २४ जुलै १९९१ रोजी त्यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणात व्हिक्टर ह्यूगो यांचे एक वाक्य उद्धृत केले होते. ह्यह्णजिची वेळ आली आहे अशा कल्पनेला पृथ्वीवरील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाहीह्णह्ण. ती कल्पना म्हणजे भारताकडे असेलली तरुण लोकसंख्या आणि उद्याोजकीय गतिशीलता यांच्यामुळे, धाडसी सुधारणांच्या माध्यमातून आर्थिक शक्ती म्हणून सुरू झालेला भारताचा उदय. डॉ. मनमोहन सिंग यांच्या संवादी शैलीने आणि वैविध्यपूर्ण विचारांच्या सहकार्याने या धाडसी सुधारणांना बळ मिळाले.

इतिहासच न्याय करेल!

सिंग यांच्यावर अनेकांनी, अनेकपरींची टीका (ते पदावर असताना) केली, हे भारतीय लोकशाहीचे सामर्थ्य होते. या टीकाकारांचे ऐकून घेण्याची, टीका स्वीकारून त्याआधारे पुढल्या सुधारणा करण्याची क्षमता डॉ. सिंग यांच्याकडे होती. उदाहरणार्थ १९९१ च्या उदारीकरण आणि वित्तीय सुधारणांनंतर, विशेषत: समाजवादाकडे कल असलेले अनेक सहकारीदेखील नाराज झाले, त्यांना विश्वासघात झाल्यासारखे वाटले. परंतु वेळोवेळी त्यांचाही सल्ला मागण्याचा, किंवा सल्लागार समित्यांवर अशा टीकाकारांनाही महत्त्वाचे स्थान देण्याचा खुलेपणा डॉ. सिंग यांच्याकडे होता. खुद्द डॉ. सिंग यांची आर्थिक मतेदेखील कालौघात बदलत गेल्याचे दिसते. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील निबंधांतून त्यांनी वस्तुमालावर कमीतकमी करांचा आणि मुक्तव्यापारावर आधारित विकासाचा पुरस्कार हिरिरीने केलेला आहे. सन १९९१ मधील बाजार-केंद्री सुधारणांच्या बाजूने बौद्धिक, सैद्धान्तिक बळ त्यांच्याकडे आधीपासूनच होते. पण पंतप्रधान म्हणून त्यांच्या सरकारचा कल कल्याणकारी आणि ‘हक्क’-आधारित योजनांकडे गेलेला दिसून येतो. या स्थित्यंतरातूनही त्यांची सत्यशोधाची आस, त्यासाठीचा वैचारिक खुलेपणा आणि त्यातून येणारी नव्याच्या नवलाईने दिपायचे नाही किंवा जुन्याला कुरवाळतही राहायचे नाही अशी वृत्ती दिसून येते. ही अशी शोधकवृत्ती ज्यांच्याकडे असेल, त्यांची कोणत्याही टप्प्यावर मूलगामी फेरविचार करण्याची तयारीही नेहमीच असते. जगभरातील वाढत्या आर्थिक विषमतेमुळे आज आपल्यापुढे निव्वळ मुक्तव्यापार-केंद्री तत्त्वांवर इतका विश्वास ठेवावा काय हा प्रश्न उभा ठाकला आहे आणि कल्याणकारी योजनांवरील खर्चात वाढ करण्याची गरज पटू लागली आहे. डॉ. सिंग यांच्यात झालेले परिवर्तन हे विख्यात अर्थशार्स्त्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या ‘‘जेव्हा तथ्येच बदलतात, तेव्हा मीही माझी मते बदलतो- तुम्ही काय करता हो?’’ (व्हेन द फॅक्ट्स चेंज, आय चेंज माय माइंड, व्हॉट डू यू डू, सर?) या प्रसिद्ध उद्गारांशी सुसंगत आहे.

बँकिंग, विमा, करप्रणाली या क्षेत्रातील सुधारणांच्या आखणीसाठी डॉ. सिंग यांनी योग्य, त्या- त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींच्या नेतृत्वाखाली समित्या स्थापन केल्या. सिंग यांनी अर्थशास्त्राचे अभ्यासक, प्रशासक, नियामक आणि राजकारणी या सर्व भूमिका निभावताना कौशल्यांचे असामान्य संयोजन दिसून आले. पंतप्रधान पदावर असताना त्यांनी सल्ला मागण्या-ऐकण्याच्या कार्यशैलीने स्वपक्षातील आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या(यूपीए) अन्य घटक पक्षांतील सदस्यांमध्ये तीव्र मतभेद असूनही निर्णायक तोडगे शोधले. माहितीचा अधिकार, अन्न आणि रोजगार तसेच सार्वत्रिक ओळखपत्र अर्थात ‘आधार’च्या संदर्भातील ऐतिहासिक कायद्यांच्या बाबतीत सहमतीने बरेच काही साध्य केले गेले. ऐतिहासिक भारत-अमेरिका नागरी अणु सहकार्य करार मंजूर होण्यासाठी त्यांनी विलक्षण धैर्य दाखवले आणि स्वत:च्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाला ते या एका कारणासाठी सामोरे गेले.

१९७० च्या दशकात अर्थशास्त्राचे प्राध्यापक, पुढे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि १९८० च्या दशकात नियोजन आयोगाचे प्रमुख, १९९० च्या दशकात अर्थमंत्री आणि एक दशकभर पंतप्रधान म्हणून त्यांच्या कारकीर्दीचा आलेख उंचावत गेला. सरकारचे प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळात, भारताने आतापर्यंतचा सर्वोच्च विकास दर नोंदवला आणि दोन ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेची मजल आपण त्या वेळीच गाठली. इतर कोणताही अर्थशास्त्रज्ञ या नेत्रदीपक कामगिरीच्या जवळपासही येत नाही, किंवा प्रत्येक दशकागणिक उंचावणारी कुणाचीही कारकीर्द नजरेसमोर येत नाही.

आपल्या टीकाकारांचे ऐकून घेणे, त्यांच्याशी संवाद करत राहाणे, प्रसंगी वादविवाद करणे किंवा त्यांच्याशी बौद्धिक सामना करणे यांत त्यांनी कधीही संकोच केला नाही. मुख्य म्हणजे ते सार्वजनिक जीवनातील सभ्यतेचे उदाहरण होते. समर्पण, प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, विद्वत्ता, शालीनता आणि स्वच्छ व्यवहाराबद्दल त्यांच्या टोकाच्या टीकाकारांनीही त्यांचे कौतुक केले आहे. ‘‘हजारो आरोपात्मक प्रश्नांपेक्षा माझे मौन बरे, कारण मी माझ्या विरोधकांची प्रतिष्ठा राखली आहे!’’- हे डॉ. सिंग यांचे विधान तर विरोधासाठी विरोध का करू नये, याचा धडाच आजही शिकवणारे आहे.

देशाने एक सज्जन नेता, अभ्यासू आणि सभ्य माणूस गमावला आहे. त्यांनी स्वत:बद्दल जो विश्वास व्यक्त केला होता त्याप्रमाणे, त्यांच्या समकालीनांपेक्षा इतिहासच त्यांना अधिक समंजसपणे न्याय देईल!

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit ranade article architect of economic reforms dr manmohan singh zws