अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग समारंभाने वेधून घेतलेले सगळ्यांचे लक्ष ही बाब भारतातील राजकीय अर्थव्यवस्था आणि संस्कृती या दोहोंमध्ये झालेल्या मोठ्या बदलांचे दृश्य स्वरुप आहे. या समारंभात आधीच चित्रित केलेले व्हिडिओ चित्रण प्रदर्शित करणे, या एकूणच कार्यक्रमाभोवती सातत्याने वलयाचे कोंदण असेल याची नीट व्यवस्था करणे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. मानवी दृष्टीकोनातून पाहिले तर या कार्यक्रमाची पटकथा कमालीची मोहक आहे. संपत्ती, बाहुबळ, वलयांकितता, कौटुंबिक मूल्ये, धार्मिकता आणि सूरज बडजात्यांनाही गुंफता येणार नाही अशा वैयक्तिक संघर्षाची किनार असे सगळ्याचेच या पटकथेत परिपूर्ण मिश्रण आहे. या सगळ्या कहाणीत आत्यंतिक संमोहक असेही काहीतरी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपत्तीचे असे प्रदर्शन करण्यामधून लोकांमध्ये मत्सर वा संताप निर्माण होतो, असे जे बुद्धीजीवी वर्गाला वाटते, ते फारसे खरे नाही. माणूस सहसा त्याच्या जवळच्या किंवा निकटतम लोकांशी जी स्पर्धा करतो, तेव्हा त्यातून ईर्ष्या निर्माण होते. ती सर्वसाधारणपणे श्रीमंतांबद्दल नसते. आपल्याकडे आत्यंतिक टोकाची असमानता आहे. तेव्हा अशा समाजात श्रीमंतीच्या अशा प्रदर्शनांबद्दल काहीतरी अजब, विकृत प्रतिक्रिया असू शकतात. पण एखाद्याकडे खूप संपत्ती असेल, त्याने प्रचंड यश मिळवले असेल, तर बाकीच्यांना ते पहावत नाही, असे म्हणत त्या नाराजी किंवा विकृतीवर यशस्वी माणसाच्या प्रशंसेचे पांघरूण घातले जाते. एकूण काय, तर संपत्तीचे प्रदर्शन करणे अनावश्यक असेल, तर त्या प्रदर्शनाबद्दल राग व्यक्त करणे त्याहूनही अनावश्यक आहे. श्रीमंतांबद्दल सामान्यांना ‘विचित्र सहानुभूती’ असते असे अर्थतज्ज्ञ ॲडम स्मिथ यांचे म्हणणे होते.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणाचा धडा..

श्रीमंतांनी केलेल्या श्रीमंतीच्या प्रदर्शनातून सामान्य लोकांच्या मनात एक प्रकारची प्रेरणा निर्माण होते आणि श्रीमंतीतून, पैशांमधून निर्माण होणारा आनंद कसा असू शकतो याची ठोस प्रतिमा तयार होते. म्हणूनच जगात सगळीकडेच सामान्य माणसांना एकुणातच श्रीमंताच्या यशाबद्दल नाराजी असण्यापेक्षाही त्यांच्याबद्दल एक उत्सुक आकर्षण असते, त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षांबद्दल सहानुभूती असते.

पण या प्रकरणी दिसणाऱ्या श्रीमंतीचे एक वैशिष्ट्य आहे. सहसा, श्रीमंतांकडून समाजाला वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. कुणाच्या श्रीमंतीमधून त्यांच्या वलयाचे दर्शन होते. कुणाच्या श्रीमंतीमधून उद्योग उभे राहतात तर कुणाच्या श्रीमंतीमधून बाहुबळाचे दर्शन होते. या विशिष्ठ प्रकरणात, या सगळ्याच घटकांचे एकत्रीकरण आहे आणि त्यामुळे ती आणखी रंजक आहे. स्वत:बद्दल फारसे न व्यक्त होण्याच्या भारतीय उद्योगाच्या पारंपरिक भूमिकेत तिच्यामुळे बदल होताना दिसतो आहे. जणू चित्रपटांच्या क्षेत्रातील सर्वात मोठ्या निर्मात्यांनी स्वत:वरच चित्रपट बनवला आहे. मनोरंजन उद्योगाचे सर्वात शक्तिशाली नियंत्रक स्वत:च मनोरंजनाचा भाग बनले आहेत आणि बातम्यांचे मालक बातमी बनले आहेत.

यापैकी काही गोष्टी संस्कृतीतील व्यापक बदलांमुळे घडलेल्या असू शकतात. आजकाल समाज माध्यमांवर तुम्ही तुमचे अस्तित्व अधोरेखित केलेले नसेल तर कदाचित प्रत्यक्षातही तुम्ही कदाचित अस्तित्वात नाही, असेच मानले जाते. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आत्यंतिक खासगी, वैयक्तिक पैलूचे देखील सार्वजनिक प्रकटीकरण करणे, त्याबद्दल इतरांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आजकाल आवश्यक होऊन बसले आहे. मित्र एकमेकांबद्दल काय विचार करतात, पालक आपल्या मुलांबद्दल काय विचार करतात, एखाद्या नववधूबद्दल तिची सासरची मंडळी काय विचार करतात, आपले कुणावर प्रेम आहे (किंवा कुणाबद्दल आपल्याला द्वेष वाटतो आहे) हे सगळे त्या त्या संबंधित व्यक्तीपर्यंत थेट पोहोचवण्यापेक्षाही समोर प्रत्यक्ष न दिसणाऱ्या, अमूर्त अशा प्रेक्षकांना उद्देशून सार्वजनिक पातळीवर सांगितले जाते. परोपकार, धार्मिकता, भक्ती, करुणा, प्रेम, मैत्री, कौटुंबिक बंध यासारखे सद्गुण आणि भावना सार्वजनिक पातळीवर व्यक्त करणे एके काळी अप्रासंगिक मानले जायचे. आता त्या सार्वजनिक पातळीवर व्यक्त करणे हेच सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. समाज माध्यमांवर लोक ज्या पद्धतीने स्वतला व्यक्त करतात, त्यामुळे अनेकदा तणाव निर्माण करणारेही मानले जाते. तिथे दोन्ही गोष्टी आहेत, एक म्हणजे स्वत:ला आदर्श मानणे, स्वत:चे आदर्शीकरण करणे, स्वत:ला सर्वात आदर्श पद्धतीने सादर करणे आणि दुसरे म्हणजे हा मी असा आहे, असे म्हणत स्वत:ला प्रामाणिकपणे सादर करणे. लोकमत या दोन्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याच्या परिणामी आपल्या काळातील एक परिपूर्ण श्रीमंती मूर्त स्वरूपात आपल्यासमोर उभी ठाकते. उदाहरणार्थ अंबानींच्या घरातील विवाहपूर्व समारंभ.

हेही वाचा : धृव राठीचा ‘हुकूमशाही’ व्हीडिओ इतका व्हायरल कसा काय झाला? 

पण याला एक सखोल राजकीय पैलूही आहे. ॲडम स्मिथसारख्या अर्थतज्ज्ञाला मत्सर या भावनेपेक्षाही श्रीमंतांचे राजकीय सामर्थ्य हे अधिक चिंताजनक वाटते. श्रीमंत, लोक त्यांना हव्या त्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत असतानाही, इतरांना त्याचा पत्ताही लागत नाही. श्रीमंतांना कोणत्याही प्रकारच्या सत्तेला थारा देण्याची गरज नसते, असेच दाखवले जाते. भारतात कुठेही श्रीमंतीचे विकृत प्रदर्शन घडवले जात असते. पण आता मात्र श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात काहीच गैर नाही, हे जे उघडपणे स्वीकारले जात आहे, ते लक्षणीय आणि नोंद घेण्याजोगे आहे.

असे काय बदलले आहे की त्यांना आपल्या ताकदीचे असे प्रदर्शन घडवले असेल? त्यासाठी तीन गोष्टी दिसतात. जे भांडवल किंवा पैसा देतात, तेच सत्ताही देतात अशी एक जुनी म्हण आहे. पण आता फक्त भांडवली व्यवस्थाच बदललेली नाही तर, तर मोठे भांडवल उभे करण्याची क्षमता असणाऱ्यांच्या भोवतीची मिथक निर्मितीही बदलली आहे. अंबानी (किंवा अगदी अदानीदेखील) जे करू शकतात आणि देऊ शकतात ते इतर कोणतीही यंत्रणा वा संस्था देऊ वा करू शकत नाही, अशी समजून रचण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला मोठ्या रिफायनरीज हव्या आहेत, वेगाने बंदरे बांधून हवी आहेत, स्वस्त दरात टेलिकॉम सुविधा हव्या आहेत, जागतिक पातळीवरचे विजेते हेवे आहेत तर त्यासाठी तुमच्याकडे एकच गोष्ट हवी, ती म्हणजे मोठे भांडवल. नियामकांतील फेरफारामुळेच हे शक्य होणार आहे. असे थेट न म्हणता थोडे सौम्यपणे म्हणायला हवे आहे का? ठीक आहे मग आपण असे म्हणूया की कोणत्याही गोष्टीच्या परिणामाची भव्यता पहा. वेगळ्या पद्धतीने म्हणायचे तर असे प्रसंग तुमच्या क्षमता ठळकपणे दाखवून देतात. दुसरे, अंबानींच्या बाबतीत सांगायचे तर त्यांना कतारच्या अमीरापासून रिहानापर्यंत सगळ्यांचेच जगापुढे प्रदर्शन मांडायचे आहे. भारत जगातला श्रीमंत देश नसला म्हणून काय झाले, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तर भारतात आहे… या ना त्या मार्गाने जग भारतापुढे झुकते आहे ना…

तो (देश) कशात तरी नंबर वन गणला जातो आहे ना. त्यातून आपल्या देशाची ताकदच दिसते आहे ना. तिसरा मुद्दा म्हणजे हिंदू राष्ट्रवाद आणि भारतीय भांडवल यांच्यातील परिपूर्ण वैचारिक जुळणी. त्यासाठी तुमच्याकडे भांडवल असावे लागते, ते दिसावे लागते; त्याला आपल्या कार्याबद्दल असलेली निष्ठा जाहीरपणे दाखवावी लागते. या बदल्यात, भांडवलाची एक राष्ट्रवादी प्रकल्प म्हणून पुनर्रचना केली जाऊ शकते, आणि त्यासाठी उत्तम संस्कारी भांडवलदार कुटुंबापेक्षा चांगले साधन असूच सकत नाही. या तिन्ही गोष्टी एकत्र येऊन एका परिपूर्ण राष्ट्रवादाची निर्मिती होते.

हेही वाचा : मेकॉलेचा बदला घेऊनही, नव्या फौजदारी कायद्यांनी संधी गमावली!

ही अंबानी मंडळी ही मोठी गोड, छान, विचारी मंडळी आहेत, तिथे जमलेल्या सगळ्या लोकांच्या मनात अंबानी मंडळींबद्दल निस्सीम वैयक्तिक प्रेम होते, यातही काहीच शंका नाही. पण सार्वजनिक पातळीवर कोणीही कोणालाही आणू शकतो, आणि त्यांनी ज्याला आणले आहे तो कितीही ताकदवान असला तरी, त्याचे प्रदर्शन मांडून ते त्याला नाचायला लावू शकतात, हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन घडवण्यासारखेच आहे. आपल्या एकट्याकडेच सगळी ताकद एकवटलेली असायला पाहिजे, असे एखाद्याला का वाटते, ते यातूनच स्पष्ट होते. ज्याच्याकडे असे बाहुबळ असते तो बाकी सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ शकतो. भलेही तुम्ही जगातले महान तारेतारका असाल किंवा देशातली प्रमुख व्यक्ती असाल, पण तरीही अंबानींनी बोलावले तर तुम्हाला तिथे जावेच लागते आणि आपण गेलो होतो याचे प्रदर्शनही करावे लागते.

किंवा आपण राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहोत असे तुम्हाला वाटू शकते. पण तुमचे हे स्थान काही सेकंदात जमिनीवर आणले जाऊ शकते. आपल्याकडे एकच असा नेता आहे, जो प्रत्येकाला या पद्धतीने जमिनीवर आणू शकतो. आणि तो सगळ्यांच्याही वरच्या स्थानावर आहे. बाकी सगळ्यांनी, अगदी आपल्याला बाहुबली मानणाऱ्या प्रत्येक शक्तिशाली माणसानेही या एकाच नेत्याचे प्रभुत्व मान्य करायचे आहे. आपल्या हातात आर्थिक सत्ता असो वा राजकीय, आपण सगळेजण सत्ताधारी आहोत, या कल्पनेमध्ये काहीतरी विकृत लोकशाहीवाद आहे. आपण स्वतःपासूनदेखील लपवलेले हे सत्य असे कार्यक्रम आपल्याला दाखवून देतात.

लेखक ‘द इंडियन एक्सप्रेस’चे सहयोगी संपादक आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambani family and anant ambani radhika merchant s pre wedding festivities css
First published on: 06-03-2024 at 08:23 IST