अरविंद किवळेकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना कोकणातील लोणेरे येथे १९८९ मध्ये ‘एकल’ विद्यापीठ म्हणून झाली. महाराष्ट्र शासनाने माजी मंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने कोकण विभागाच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी कोकणात एक तंत्रज्ञान विद्यापीठ असावे अशी शिफारस केली होती. या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी ‘सेन्चुरी रेयॉन’ या कंपनीचे तत्कालीन उपाध्यक्ष दुर्गेशचंद्र यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने या विद्यापीठाकरिता सविस्तर कृती अहवाल सादर केला.

महाराष्ट्रातील रासायनिक औद्योगिक-क्षेत्र हे प्रामुख्याने कोकणात आहे. या औद्योगिक क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी विद्यापीठाने सुरुवातीला केमिकल व पेट्रोकेमिकल-अभियांत्रिकी हे प्रोग्रॅम सुरू केले. १९९५-२००० दरम्यान कोकणात येऊ घातलेल्या एनरॉन प्रकल्पास व विस्तारित होत असलेल्या माहिती-तंत्रज्ञान आधारित औद्योगिक क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने इतर अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केले. या कालावधीतच, विद्यापीठ आयआयटी सारख्या संस्थेतून पदवीधारक असलेल्या आध्यपकांना आकर्षित करण्यास यशस्वी झाले. तसेच याच कालावधीत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता प्राप्त करून घेण्यात व एनबीएचे मूल्याकंन करून घेण्यातसुद्धा विद्यापीठ यशस्वी झाले. या उपलब्धीच्या आधारे विद्यापीठाची जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात आलेल्या टेकयूप (TEQIP) या प्रकल्पात निवड झाली.

तदनंतर, महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये विद्यापीठाचा ‘एकल’ दर्जा काढून विद्यापीठाला तंत्रशास्त्र महाविद्यालये संलग्नित करण्याचा अधिकार प्रदान केला. महाराष्ट्रातील तंत्रशास्त्र महाविद्यालयांत शिकविले जाणारे अभ्यासक्रम हे उद्योगाभिमुख असावेत व त्यात एकवाक्यता असावी हा मुख्य उद्देश यामागे होता. मार्च-२०१६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे राज्यस्तरीय संलग्नित-दर्जा असलेले विद्यापीठ ठरले. याच कालावधीत शासनाने पुण्याच्या ‘सीओईपी’ व नागपूरच्या ‘एलआयटी’ या संस्थेस एकल विद्यापीठाचा दर्जा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हा एक ‘फसलेला प्रयोग’ आहे काय हे तपासण्याकरिता विद्यापीठाने ‘एकल’ दर्जा असताना प्राप्त केलेले यश व ‘संलग्नित दर्जा’ प्राप्त होऊन फक्त एक दशकही झालेले नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. याआधारेच कामगिरीचे योग्य मूल्यमापन होऊ शकेल. विद्यापीठाला ‘फसलेला प्रयोग’ ठरविताना वापरलेले निकष आणि वास्तव परिस्थिती यातील तफावत स्पष्ट करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, तंत्रशास्त्र विद्यापीठ हे परीक्षाविषयक अनेक समस्यांचा सामना करीत आहे व त्यावर यशस्वीपणे मातही करत आहे, हे प्रामाणिकपणे नमूद करणे आवश्यक आहे. या पैकी बहुतेक समस्या या निकालांच्या विलंबाशी निगडित असून, त्या समस्या या विद्यपीठास ‘ई-पोर्टल’ची सेवा देणाऱ्या पुरवठादाराची सेवा खंडित केल्यामुळे निर्माण झाल्या. पुरवठादाराची सेवा ऐन परीक्षाकाळात तात्काळ खंडित करणे हा विद्यापीठ प्रशासनाचा धाडसी निर्णय होता. त्यामागे पुरवठादाराकडून होत असलेली विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवणे व पुरवठादाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हे त्यामागचे मुख्य उद्देश होते. यावर मात करून विद्यापीठाने नवीन ‘ई-पोर्टल’ कार्यान्वित केले. ते महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाच्या ‘डॅशबोर्ड’शी जोडले.

लेखकाचा दुसरा आक्षेप हा विद्यापीठाने अवलंबविलेल्या ‘रेमेडीयल परीक्षा पद्धती’विषयी आहे. ‘रेमेडीयल परीक्षा’ बहुपर्यायी स्वरूपाची होती व त्यात विद्यार्थ्यांना फक्त ‘ढकल पास’ ही श्रेणी दिली जात असे. अभियांत्रिकी महाविद्यलयात प्रवेश हा ‘जेईई’ व ‘सीईटी’ या सारख्या बहुपर्यायी परीक्षेद्वारे होत असतो. केंद्रातील आयआयटी व राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा परीक्षेत जास्त गुण मिळालेले असतात. असे विद्यार्थी वगळता, ग्रामीण भागांतील खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेतलेले विद्यार्थी तुलनेने कमी गुण मिळालेले असतात. अशा विद्यर्थ्यांना या प्रवेश परीक्षेची तयारी करताना बहुपर्यायी परीक्षेची सवय झालेली असते व तुलनात्मकदृष्ट्या निबांधात्मक उत्तरे लिहण्याची क्षमता कमी असते. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाता यावे व चार वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षांतच पूर्ण करता यावा या उद्देशाने विद्यापीठाने ‘रेमेडीयल परीक्षा’ सुरू केली होती. या परीक्षा पद्धतीवर संलग्नित महाविद्यालयांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाने तिचे ‘बहुपर्यायी’ स्वरूप बदलून ‘निबंधात्मक’ केले. अनेक विद्यार्थी संघटनांकडून या विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाने ‘बहुपर्यायी’ रेमेडीयल परीक्षा पुन्हा फक्त ‘सध्या-प्रवेशित’ असलेल्या विद्यार्थ्यांकरीता सुरू केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या उद्देशाने विद्यापीठास हिवाळी सत्र २०२४ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे आवश्यक होते. आदेशा नुसार ‘नीट’ सारखी राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा तीनदा घ्यावी लागली हा इतिहास फार जुना नाही. फक्त तंत्रज्ञान विद्यापीठासच परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबद्दल जबाबदार धरले जाते, याचे आश्चर्य वाटते.

विद्यापीठाने परीक्षा-नियंत्रक म्हणून ‘कोणीतरी’ आणून बसविले व विद्यापीठात परीक्षामंडळ आस्तित्वात नाही, असे प्रस्तुत लेखकास वाटते. विद्यापीठाने परीक्षा-नियंत्रक म्हणून पात्र उमेदवाराची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यापीठाचे परीक्षा मंडळ हे सर्वांत सक्रिय प्राधिकरण आहे.

प्रस्तुत लेखकाचा तिसरा आक्षेप हा अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमाशी निगडित आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेपासून अभ्यासमंडळावर औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रभाव आहे. उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाची निर्मिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश. विद्यापीठाची स्थापनाच औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीच्या शिफारशीद्वारे झाली. संलग्नित महाविद्यालयांतील आध्यापक आपली नियुक्ती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर होणे हे प्रतिष्ठेचे समजतात. तसे होत नसल्याकारणाने ते असमाधानी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अभ्यासनिर्मितीत आपला सहभाग नाही असा त्यांचा समज होत असतो. हा समज दूर करण्यासाठी हे विद्यापीठ त्यांच्या करिता नियमितपणे कार्यशाळा आयोजित करते. औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांत विद्यापीठ सतत बदल करत असते. विद्यपीठाला भेटी देणाऱ्या अनेक मूल्याकंन समित्यांनी या उपक्रमाची दखल घेऊन ती एक ‘बेस्ट प्रॅक्टिस’ आहे, असा अभिप्राय वेळोवेळी दिला आहे.

लेखकाचा चौथा आक्षेप हा विद्यापीठाने अतिरिक्त संख्येने संलग्नित करून घेतलेल्या महाविद्यालयांबाबत आहे. गेल्या नऊ वर्षांत विद्यापीठास ४१५ महाविद्यालये संलग्न झाली आहेत. त्यात तीनशेपेक्षा जास्त फार्मसी या विद्याशाखेतील आहेत. फार्मसी क्षेत्रात येत्या दशकात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. तसेच या क्षेत्रात चीनशी तुल्यबळ स्पर्धा करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. ही गरज भरून काढण्याकरिता नवीन महाविद्यालये स्थापन करणे व त्यांना संलग्नता देणे क्रमप्राप्त ठरते. तंत्रज्ञान विद्यापीठ हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहे. त्यामुळे ग्रामीण भागांत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. या बाबतीत नियामक प्राधिकरणाने, शासनाने व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे विद्यापीठास बंधनकारक असते.

लेखक तंत्रज्ञान विद्यापीठाची तुलना इतर विद्यापीठांशी करतात. अशी तुलना करताना फक्त परीक्षेतील निकालास झालेला विलंब व संलग्नीकरणातील अडचणींचा आधार घेतात. महाराष्ट्रातील सर्वच विद्यपीठे परीक्षांबाबतच्या समस्यांचा थोड्या-फार फरकाने असाच सामना करताना आढळतात. पण या निकषावर जर इतर विद्यापीठे कार्यक्षम वाटत असतील तर त्या मागचे एक कारण हे आहे की हि अतिरिक्त नवीन होऊ घातलेली महाविद्यालये डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे कायद्याद्वारे वळविण्यात आली. जर असे करण्यात आले नसते तर, सर्व संसाधनाने, सोयींनी संपन्न असलेल्याला व महानगरांत स्थापित असलेला या विद्यापीठांकडून तीच कार्यक्षमता राखता आली असती काय हा एक संशोधनाचा विषय आहे. तंत्रशास्त्र विद्यापीठास संलग्नीकरणाचा दर्जा देण्यापूर्वी, येऊ घातलेली ही नवीन महाविद्यालये बहुतांश विद्यापीठ प्रशासकांना गळ्यांतील लोढणे वाटत. तसेच नवीन महाविद्यलयांच्या परीक्षेच्या समस्या या विद्यापीठांतील आध्यपकांना संशोधनातील अडसर वाटत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे ‘एकल’ विदयापीठ म्हणून वर्तक समितीने आखून दिलेले उद्दिष्टे प्राप्त केली आहेत. कोकण विभागातील रासायनिक औद्योगिक-क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या मध्ये व आखाती देशातील कंपन्या मध्ये काम करणारे अभियंते हे प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे पदवीधर आढळतात. आजही रसायन अभियांत्रिकी पदवी प्रवेश इच्छुकांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ पहिल्या पाच अग्रक्रमात असते. त्यामुळे, मागील तीस दशकापासून तंत्रज्ञान विद्यापीठ हे कोकणाच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तसेच लोणेरे येथील कॅम्पसमधून बाहेर पडणारे अन्य शाखेतील पदवीधर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. अश्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तंत्रज्ञान विदयापीठ पुढे जात आहे.

शहरात राहणाऱ्या विचारवंतांना हे तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे सारख्या ‘दुर्गम’ भागात आहे असे वाटते. तर असे नसून, विद्यापीठ हे मुंबई-रायगड-पुणे-ठाणे या ‘औद्योगिक’ पट्ट्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्श्याने पुनीत झालेल्या रायगड किल्ल्याच्या पायथाशी लोणेरे येथे ४६० एकर विस्तीर्ण अश्या क्षेत्रावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विस्तीर्ण अशी क्रीडामैदाने उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ आहे. तीन हेलिपॅड असणारे हे विद्यापीठ भारतातील कदाचित एकमेव असेल. जेथे विद्यर्थ्यांना ‘ड्रोन’ उडविण्याचे धडे देतानाच ‘स्काय इज लिमिट’चा हि धडा शिकण्यास मिळतो. नवी मुंबई येथे होऊ घातलेल्या आंतर-राष्ट्रीय विमानतळ, पूर्णत्वास येणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणा मुळे तसेच कोकण रेल्वे मुळे हे विद्यापीठ राष्ट्रीय व आंतर-राष्ट्रीय नकाश्यावर येत आहे. म्हणून शहरात राहणाऱ्या विचारवंतांना वाटणारी लोणेरेची दुर्गमता हि त्यांची मानसिक दुर्बलता दर्शविते.

‘संलग्नित दर्जा’ प्राप्त झालेले डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे फार्मसी क्षेत्रात वाढत जाणारे महाविद्यालयाना आपले बलस्थान मानते. ग्रामीण भागात स्थित असलेल्या बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘रेमेडीअल परीक्षा’ पद्धत अवलंबविणे हा एक असाच उपाय होता. भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे या विद्यपीठाला नवीन दिशा व बळ प्राप्त झाले आहे. येणाऱ्या पदवीदान समारंभानंतर, विद्यार्थ्यांना दुहेरी पदवी मिळवून देणारे हे विदयापीठ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरेल. त्याच वेळी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिकत असताना ‘बाटु’ बरोबरच आता विद्यर्थ्यांना अमेरिकन विद्यापीठाची पदवी मिळवण्याची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विद्यापीठ हा एक फसलेला प्रयोग नसून सतत विकसित होत जाणारा प्रकल्प (Evolving Project) आहे.

समाजातील कोणताही घटक हा शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासूनपासून वंचित राहणार नाही हे डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी संघर्ष करणारे हे विद्यापीठ आहे. आपल्याकडे असलेल्या सीमित साधनांचा, मनुष्यबळाचा वापर करून नव्याने स्थापन होत असलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक सर्वोत्कृष्टतेचे उद्दिष्ट गाठण्यास आवश्यक ते नेतृत्त्व विद्यापीठ देत आहे. तसेच ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे आर्थिक उत्कर्षाच्या नव-नव्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता तंत्रशास्त्र विद्यापीठ कटिबद्ध आहे.

लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव आहेत.

registrar@dbatu.ac.in

Story img Loader