केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक आराखड्यातील तरतुदींचा आधार घेत महाराष्ट्राने पहिलीपासून हिंदी या भाषेची सक्ती करण्याचे ठरवले आहे. केवळ भाषेमुळे या देशाच्या दक्षिणेकडील राज्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना, अशा प्रकारे सर्वाधिक भारतीय एखादी भाषा बोलतात, म्हणून ती शिकण्याची सक्ती करणे केवळ गैरच नाही, तर अन्याय्यही आहे. गेल्या काही दशकांत महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेतून मराठी ही भाषा हद्दपार होत चालली असताना, तिचा अखेरचा लचका तोडून तिला पूरेपूर घायाळ करण्याचा हा प्रयत्न स्वीकारला जाता कामा नये. मुलाच्या वाढीच्या वयात जे भाषिक संस्कार होत असतात, ते त्याला आयुष्यभरासाठी उपयोगाचे आणि महत्त्वाचे असतात. त्या संस्कारांच्या शिदोरीवर तो नव्या भाषक समूहांना सामोरे जात असतो. नवी भाषा शिकणे आणि मातृभाषेतून विचार करणे या दोन पूर्ण वेगळ्या पातळीवरील बाबी असतात, हे निदान शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना तरी माहीत असेलच. परंतु ही बाब लक्षात असूनही जेव्हा एखाद्या भाषेची एका विशाल बहुभाषक व्यक्तींच्या समूहावर सक्ती केली जाते, तेव्हा पहिली प्रतिक्रिया विरोधाचीच असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा