‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला आज १० वर्षे पूर्ण झाली !

या उपक्रमाला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या तुमच्यापैकी प्रत्येकाला सलाम करण्याचा हा प्रसंग आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण एक अग्रणी, दूरदर्शी आणि नवोन्मेषी आहे, ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘मेक इन इंडिया’च्या यशाला बळ मिळाले आहे आणि परिणामी आपला देश जगाचे लक्ष वेधून घेत आहे आणि कुतूहलाचे केंद्र बनला आहे. हे  अथक परिश्रमाचे  सामूहिक अभियान  आहे, ज्याने एका स्वप्नाचे एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर केले आहे.

‘मेक इन इंडिया’चा प्रभाव हेच सिद्ध करतो की, भारताला कुणीही थांबवू शकत नाही. आपल्यासारखा प्रतिभावान देश हा  केवळ आयातदार नाही तर निर्यातदार म्हणूनही आघाडीवर असावा, यासाठी उत्पादन क्षेत्रात भारताच्या प्रगतीला चालना देण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्देशाने दहा वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रयत्न होता.

या दशकाभराच्या वाटचालीबद्दल बोलताना , माझा ऊर अभिमानाने भरून येतो. १४० कोटी भारतीयांच्या सामर्थ्य आणि कौशल्याने  आपल्याला किती दूरचा पल्ला गाठून दिला  आहे! ‘मेक इन इंडिया’चा ठसा सर्व क्षेत्रांमध्ये दिसू लागला आहे, त्यात अशीही क्षेत्रे आहेत ज्यात आपण प्रभाव पाडण्याचे स्वप्न देखील पाहिले नव्हते.

मी एक-दोन उदाहरणे देतो.

मोबाइल निर्मिती… मोबाइल फोन्स आता किती महत्त्वाचे झाले आहेत हे आपल्याला माहीत आहे, परंतु  धक्कादायक बाब म्हणजे २०१४ मध्ये संपूर्ण देशात मोबाइल निर्मिती करणारे केवळ दोन कारखाने होते. आज हा आकडा २०० हून अधिक झाला आहे. आपली  मोबाईल निर्यात अवघ्या  १५५६ कोटींवरून तब्बल १.२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे –ही वाढ  ७५०० टक्के इतकी अवाढव्य आहे ! आज भारतात वापरले जाणारे ९९ टक्के मोबाइल फोन्स  ‘मेड इन इंडिया’ आहेत. जागतिक स्तरावर आपण दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाइल उत्पादक बनलो आहोत.

आपल्या पोलाद उद्योगाकडेच पाहा –  आता आपण पूर्णतः प्रक्रिया केलेल्या पोलादाचे निर्यातदार बनलो आहोत, सोबतच २०१४ पासून उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढ झाली आहे.

आपल्या सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्राने  दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली असून, दररोज एकत्रितपणे सात कोटी चिप्सचे उत्पादन घेण्याची क्षमता असलेल्या पाच प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>लेख: ‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?

नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत आपण जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादक ठरलो आहोत, त्याचवेळी केवळ एका दशकात आपली क्षमता ४०० टक्क्यांनी वाढली आहे. आपले इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्र, जे खरे तर २०१४ मध्ये अस्तित्वातच नव्हते, ते आता तीन अब्ज डॉलर्स मूल्याचे झाले आहे.

संरक्षण उत्पादनांची निर्यातही १००० कोटी रुपयांवरून वाढून २१००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, आणि आपण ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करू लागलो आहोत.

‘मन की बात’ च्या या कार्यक्रमाच्या एका भागात मी जोमदार खेळणी उद्योग क्षेत्राची गरज असल्याबद्दल बोललो होतो, आणि त्यावर आपल्या नागरिकांनी ही बाब प्रत्यक्षात कशी साकारावी हेच दाखवून दिले! गेल्या काही वर्षांत आपली निर्यात २३९ टक्क्यांनी वाढली असल्याचे, आणि त्याचवेळी आयातीत निम्म्याने घट झाली असल्याचे आपण अनुभवले आहे, यामुळे विशेषत: आपल्या स्थानिक उत्पादकांना आणि विक्रेत्यांना लाभ झाला आहे, लहान मुलांना तर निश्चितच झाला आहे!

हेही वाचा >>>‘आयुष्मान भारत’ केवळ शाब्दिक बुडबुडे!

आपल्या देशाची ओळख बनलेल्या अनेक बाबींपैकी असलेल्या मुख्य बाबी म्हणजे आपली वंदे भारत रेल्वे गाडी, ब्राम्होस क्षेपणास्त्रे आणि आपल्या हातात असलेले मोबाइल फोन. या सगळ्यांवर आता अभिमानाचा मेक इन इंडियाचा शिक्का लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंतचे हे यश भारतीय कल्पकता आणि गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करत आहे.

मेक इन इंडिया हा उपक्रम विशेष आहे याचे कारण म्हणजे यामुळे गरिबांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आकांक्षा बाळगण्याचे बळ मिळाले आहे, या उपक्रमाने त्यांना ते  साधन संपत्तीचे निर्माते बनू शकतात हा आत्मविश्वास दिला आहे. या उपक्रमाचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रावर पडलेला प्रभावही तितकाच दखल घेण्याजोगा आहे.

सरकार म्हणून आम्ही हे चैतन्य अधिक बळकट करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमची दशकभरातील कामगिरी पुरेशी बोलकी आहे. उत्पादनसंलग्न प्रोत्साहन – पीएलआय योजना परिवर्तनक्षम ठरल्या आहेत, त्यांनी हजारो कोटींची गुंतवणूक शक्य केली असून लाखो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. व्यवसाय करण्यात सुलभता आणण्यात आम्ही लक्षणीय पावले टाकली आहेत.

भारताला अनुकूल बरेच काही आज घडते आहे – लोकशाही, लोकसंख्या आणि मागणीचे आम्ही परिपूर्ण मिश्रण आहोत. जागतिक पुरवठा साखळीमध्ये कळीची भूमिका बजावण्यासाठी आवश्यक ते आमच्याकडे आहे, व्यवसायातील विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहिले जात आहे. अभूतपूर्व युवा शक्ती आमच्याकडे आहे, तिचे यश स्टार्टअप जगतात प्रत्येकाला पाहता येत आहे. एकूणच, गती भारताला अनुकूल आहे. जागतिक महासाथीसारखी अनपेक्षित आव्हाने येऊनही भारताच्या वाढीची वाटचाल सातत्यपूर्ण राहिली आहे. आज, आमच्याकडे जागतिक वाढीचा प्रेरक म्हणून पाहिले जात आहे. मी माझ्या युवा मित्रांना पुढे येण्याचे, मेक इन इंडियात सहभागी होऊन नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन करतो. सर्वोत्कृष्टतेसाठी आपण सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. दर्जेदार पुरवठ्यासाठी आपण वचनबद्ध राहिले पाहिजे. शून्य त्रुटी हा आपला मंत्र असला पाहिजे.

एकत्रित होऊन आपण केवळ स्वतःच्या गरजांची पूर्तता करणारा भारतच नव्हे तर जागतिक उत्पादन आणि नवोन्मेषाचे ऊर्जाघर असलेला भारत घडवू शकतो.