‘उठा उठा दिवाळी आली…’ ही एका साबणाची जाहिरात अलीकडची; पण दिवाळी म्हणजे सुट्टी असूनही पहाटेपासून जागे असणे हे अगदी आमच्या लहानपणीपासूनचे. रोषणाई, फराळ, भेटीगाठी हे दिवाळीचे वर्णन जसेच्या तसे राहिले असले तरी या सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप पालटले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आताच्या दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारंपरिक दिवाळीमध्ये कुटुंब, समाज आणि धार्मिक विधी यांना विशेष महत्त्व होते. घरातील स्वच्छता, लिपी पूजन, लक्ष्मी पूजन, रांगोळ्या काढणे, दिवे लावणे आणि फटाके उडवणे यांचा एकत्रित आनंद साजरा होत असे. लोक आपल्या कुटुंबीयांसोबत उत्सव साजरा करत असत. या सणात धार्मिक आणि आध्यात्मिक आयामाला जास्त महत्त्व दिले जात असे.

हेही वाचा – हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होणार ?

आधुनिक काळात, दिवाळी उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलत गेले. या बदलांमध्ये मुख्यतः तंत्रज्ञान, जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विचार यांचा समावेश आहे. त्यामुळे घडलेली फार चांगली गोष्ट अशी की, पूर्वीपेक्षा आता फटाके फोडण्याबाबत लोक जास्त जागरूक झाले आहेत. पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करून अनेक ठिकाणी फटाक्यांचा वापर कमी झाला आहे. फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची नवीन पद्धत लोकप्रिय होत आहे.

आजच्या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूकता वाढली आहे. त्यामुळे लोक प्लास्टिकच्या ऐवजी मातीचे दिवे, नैसर्गिक रंगांनी रांगोळ्या आणि पर्यावरणपूरक सजावट वापरतात. एकंदरच ‘इको फ्रेंडली’ दिवाळी साजरी करण्याकडे कल दिसतो.

काही बदल नेमके कुठे नेणार आहेत, असा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ, आधी बाजारात जाऊन खरेदी करणे ही दिवाळीची एक मोठी परंपरा होती, पण आता ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. त्यामुळे खरेदी सोपी आणि सुलभ झाली आहे. पूर्वी दुकानात जाऊन कपडे खरेदी करणे एक सोहळा होता कपडे घेऊन शिंप्याकडे शिवायला टाकणे व त्याची वाट पाहण्यात आनंद होता. आता ॲमेझॉनसारखी अनेक खरेदी-उपयोजने घरपोच काहीही पाठवतात. ही उपयोजने त्यांच्या ‘सेल’साठी विक्रेत्यांनाही कमी किमतीत माल विकण्याची गळ घालतात. कमी नफाक्षमतेत माल विकला जातो, त्यातून कामगारापर्यंत किती लाभ पोहोचतो याची मोजदाद करण्यासाठी कोणतेही सर्वेक्षण सार्वजनिकरीत्या उपलब्ध नाही; पण यात कामगारांनाही फटका सोसावा लागत असावा. ‘ब्रँडेड’ कपड्यांची मागणी वाढत गेल्याने गार्मेंट उद्योग फोफावला, त्यानंतर ‘ऑनलाइन सेल’मुळे झालेल्या या बदलाकडे पाहाता येईल. एक मात्र खरे की, दिवाळी आता एक मोठा व्यावसायिक सण झाला आहे. मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर मिळतात, त्यामुळे हा सण आर्थिकदृष्ट्या व्यापारी क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे.

सोशल मीडियाच्या उदयामुळे, लोक ‘व्हर्च्युअल दिवाळी’ साजरी करतात. परदेशात राहणाऱ्या व्यक्तींनीही व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणे शक्य झाले आहे. शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यातून बऱ्याचदा, मेसेजेस नुसते फॉरवर्ड केले जातात… भावना नाही.

ऋण काढून क्षण व सण साजरे करणे हे वैशिष्ट्य टिकवण्यात मात्र दिवाळीने आघाडी कायम ठेवलेली आहे. सामान्यांच्या आवाक्यात नसलेली एखादी वस्तू या निमित्ताने धाडस करून घेतली जाते. सामान्यांच्या जीवनात हे चार दिवस खूप महत्त्वाचे असतात गरिबी दुःख दारिद्र्य दूर ठेवून माणसे चार दिवस आनंदाला आमंत्रण देतात व स्वतःला विसरून आनंदी राहतात. नात्यांची उजळणी करणारा हा सण आहे. पाडवा, भाऊबीज यामुळे नात्यांना उजाळा मिळतो. प्रेम असतंच पण येणाऱ्या पिढीला आनंदाचा वारसा कसा टिकवायचा व वृद्धिंगत करायचा याचा वस्तूपाठच दिवाळी देते. दुःखं, चिंता, कष्ट चार दिवस विसरायला लावणारा हा आनंदाचा परमोच्च क्षण आहे.

पूर्वी दिवाळीचे वेध दिवाळीच्या आधी महिना पंधरा दिवस लागायचे. सगळ्यांची आकाश कंदील तयार करण्याची जय्यत तयारी चालू व्हायची, त्यासाठी बांबू आणून त्याच्या कामट्या करणे मग त्या एकमेकांना दोऱ्याने बांधून सुंदर आकाशकंदील तयार व्हायचा. श्रमातून साकारलेला आकाश दिवा एक वेगळंच समाधान देऊन जात असे. त्यात लाईट नाही तर मधोमध पणती ठेवायला एक चौकोन तयार केला जात असे. अशा घरी केलेल्या आकाशकंदील यामुळे मुलांची कलात्मकता, निवड व निर्णय क्षमता याच कस लागत असे. दिवाळी आणखी जवळ येऊ लागली की घरात बायकामुलींची धांदल उडायची. संपूर्ण वातावरण दिवाळी येणार या कल्पनेने भारावून जात असे. बहिणी, मुली रांगोळ्यांची पुस्तके शोधून कोणत्या दिवशी कोणती रांगोळी काढायची हे ठरवून ठेवीत. त्यावेळी आजसारखे रांगोळीचे छापे नव्हते त्यामुळे मुलींच्या कलेचे कसब पणाला लागे. रांगोळीचे ठिपके सरळ रेषेत यावे म्हणून एका चौकोनी कागदाला सरळ उभे आडवे ठिपके उदबत्तीने छिद्रे पाडून एक ठिपक्यांचा कागद घरीच तयार केला जायचा, बहीण भाऊ मित्र अगदी खेळीमेळीने दिवाळीच्या तयारीला लागत. सर्व मिळून किल्ले बनवत. धाकात ठेवणारी माणसे पूर्वी होती. दिवाळीत सूर्योदयापूर्वी अंघोळ केलीच पाहिजे नाहीतर नरकात जाणार या समजुतीवर ठाम विश्वास होता. मग पहाटेच्या त्या कडाक्याच्या थंडीत गरम पाण्याने अंघोळी व्हायच्या. आजूबाजूचे प्रत्येक घर पूर्वी दिवाळीच्या फराळाला बोलवत असे व त्यानिमित्ताने हसणे, खेळणे व गप्पा होत असतात आता घराघरात बाहेरून विकतचे पदार्थ आणल्यामुळे ही प्रथा कमी होत चालली आहे. न फुटलेले फटाके वेचून दारू काढणे अन् टिकल्या फोडण्यात दिवस भरकन निघून जायचा!

हेही वाचा – बिल्डरांच्या फायद्यासाठी पुनर्विकास?

आता जाणवते किती अल्पसंतुष्ट आणि समाधानी होती तेव्हाची पिढी! आज आम्हाला भरपूर मिळाले तरी समाधान होतच नाही. नातवांच्या हरवलेल्या बालपणाची खंत वाटते. आज आपण प्रत्येक सणातला आनंद, उत्सुकता, मजा घालवून बसलो आहोत. छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा किती आनंद भरलेला असतो हे आपण शोधतच नाही. खाण्यामध्ये ज्यांच्या रोजच दिवाळीचे पदार्थ असतात, ऑनलाइन कधीही कपडे मागवणारे यांना दिवाळी अशी वेगळी वाटतच नाही.

दिवाळी साजरी व्हायला पाहिजे ती माणसांनी एकत्र येऊन नातेसंबंधांची, भेटीची दिवाळी व्हायला हवी. दिवाळीत अनेक घरांमध्ये भौतिकता आहे पण नात्यांची नैतिकता कुठे आहे? कोणीच कोणाला जुमानात नाही. आनंद वाटायला माणसे हवी असतात. वृद्धाश्रमात नाती फुलत नाहीत. माणसांचं एकत्र येणं, हसत खेळत राहणं, विनोदामध्ये चिंब भिजणं हीच दिवाळी असते. चार क्षण विसाव्याचे, समाधानाचं जगणं म्हणजे दिवाळी. यशामागे धावणं म्हणजे दिवाळी नव्हे. समाधानाच्या थांब्यावर दिवाळी असते आणि ती अनुभवायची असते. माणसा माणसांमधील संवाद म्हणजेच दिवाळी पण माणसेच एकमेकापासून दुरावली आहेत. माणसांमधील नातेसंबंध दुरावले आहेत. अर्थात, माणसांमध्ये जोपर्यंत आनंदी असण्याचा, आनंद वाटून घेण्याचा हुरूप आहे तोपर्यंत दिवाळी साजरी होणारच. फक्त तिचे स्वरूप बदलत राहील!

anilkulkarni666@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impact of social economic and technological changes is clearly visible in the current diwali ssb