निशांत सरवणकर
कुख्यात गुंडमनोहर अर्जुन ऊर्फ मन्या सुर्वेची वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाजवळ जानेवारी १९८२ मध्ये पोलिसांबरोबर झालेली चकमक ही मुंबईतील पहिली चकमक म्हणून ओळखली जाते. खंडणीस नकार देणाऱ्यांवर अॅसिड हल्ला करण्यास मन्याने सुरुवात केली. त्यात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले. अखेरीस पोलिसांनी ‘ऑपरेशन मन्या सुर्वे’ हाती घेतले आणि तो पोलिसांबरोबरच्या चकमकीत मारला गेला. मन्या सुर्वेला मारणाऱ्या इसाक बागवान, राजा तांबड या अधिकाऱ्यांना शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतरच्या आठ वर्षांत (१९९० पर्यंत) पोलिसांकडून ३४ गुंड चकमकीत मारले गेले. कुणाही अधिकाऱ्याला चकमकफेम ही बिरुदावली मिळालेली नव्हती. १९९१ नंतर २०१० पर्यंत मात्र ७३० गुंड चकमकीत ठार करण्याचा उच्चांक झाला. त्यातूनच ‘चकमक’फेम अधिकाऱ्यांची जमात उदयास आली.

पण या चकमकींमुळे अनेक गुंड मुंबईतून पसार झाले. चकमकफेम अधिकाऱ्यांचा धसका घेऊन खंडण्यांचे दूरध्वनीही बंद होऊ लागले. २००१ सालापर्यंत संघटित गुन्हेगारी बऱ्यापैकी आटोक्यात आली. चकमकी होत होत्या. परंतु त्यांबाबत नीट काळजी घेतली जात होती. मात्र २०१० नंतर म्हणजे संजीव दयाळ हे मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर एकही चकमक नोंदली गेली नाही. २००६ मधील छोटा राजन टोळीतील राम नारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्या याची सातबंगला येथील नाना नानी पार्कजवळील चकमकही पोलिसांना चांगलीच भोवली. लखनभय्याच्या वकील भावाने शेवटपर्यंत पिच्छा सोडला नाही. दोन मातब्बर पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत स्पर्धेचा फटका या पोलिसांना बसला. काही प्रकरणे न्यायालयातही गेली. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

हेही वाचा >>>एकसंध भारत घडताना…

एक खरे आहे की, १९९० नंतर २००८ पर्यंत मुंबईत संघटित गुन्हेगारांनी खंडणीसाठी हैदोस घातला होता. अगदी लग्नसमारंभात वारेमाप खर्च करणाऱ्यांकडेही खंडणीसाठी तगादा सुरू झाला होता. डॉक्टर, सिने-अभिनेत्यांनाही खंडणीसाठी लक्ष्य केले जात होते. या काळातच पोलिसांकडून चकमकींचा उच्चांक गाठला गेला. ‘चकमक’फेम अधिकाऱ्यांचे वलय इतके भारी होते की, चकमकी खऱ्या की खोट्या या चर्चांना फारसा अर्थ उरला नाही. पुढे संघटित गुन्हेगारी टोळ्याच एकमेकांच्या वैरी झाल्यामुळे पोलिसांमार्फत आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढून घेण्याचा डाव त्यांच्याकडून खेळला जात होता. विशिष्ट पोलीस अधिकारी विशिष्ट टोळीतील गुंडाविरुद्धच कारवाई करीत होते. त्यामुळे ‘चकमक’फेम अधिकाऱ्यांमध्येही अंतर्गत वैमनस्य निर्माण झाले होते. चकमकींच्या नावाखाली चकमकफेम पोलीस अधिकाऱ्यांचे वेगळेच रूप समोर येऊ लागले होते. पण गुंडांचा खात्मा होत आहे आणि गुन्हेगारी आटोक्यात येत आहे हे पाहून वरिष्ठ अधिकारीही गप्प होते. परंतु याच चकमकींच्या नावाखाली पोलिसा़ंकडून जोरदार खंडणीवसुली सुरू झाली तेव्हा या चकमकी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तापदायक वाटू लागल्या. परंतु तोपर्यंत संघटित गुन्हेगारीचा कणा मोडण्यात मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग यशस्वी झाला होता.

अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील ‘ब्ल्यू स्टार ऑपरेशन’मध्ये सहभागी झालेल्या जनरल अरुणकुमार वैद्या यांची हत्या करून दहशत पसरवू पाहणाऱ्या खलिस्तानी अतिरेक्यांविरोधात कारवाई करून २० अतिरेक्यांना ठार करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मोहिमेचे मात्र कौतुक करावेच लागेल. त्यानंतर मुंबईकडे पाहण्याची खलिस्तानी अतिरेक्यांची हिंमत झाली नाही. नोव्हेंबर १९९१ मध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ए. ए. खान यांच्या पथकाने अंधेरीतील लोखंडवाला संकुलात दिवसाढवळ्या केलेले माया डोळस ऑपरेशनही जोरदार गाजले होते. कालांतराने चकमकीची पोलिसांना इतकी चटक लागली की, साध्या गुन्ह्यातील आरोपीही चकमकीचे बळी ठरू लागले.

हेही वाचा >>>International Right to Information Day : महाराष्ट्रातील माहिती अधिकाराची सद्य:स्थिती

गुन्हेगाराने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करणे आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्वसंरक्षणात्मक केलेल्या गोळीबारात संबंधित गुंड ठार होणे, असा सिद्धांत सर्वच चकमक प्रकरणात पोलिसांकडून मांडला जातो. पण पोलिसांनी प्रतिस्पर्ध्यावर कुठे गोळीबार करावा, याबाबत काही संकेत आहेत. ते या सर्व चकमकींमध्ये का पाळले गेले नाही, याचे उत्तर कोणाकडूनच मिळत नाही. चकमकीत ठार झालेल्यांचा पाठपुरावा करणारे कुणी नसल्यामुळे वा त्यांच्यावर खून, दरोड्यांचे आरोप असल्यामुळे असेल कदाचित, चकमकींची फारशी दखलही घेतली गेली नसेल. त्यामुळे या सर्व चकमकी पोलिसांना पचल्या. काही प्रकरणांत न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. त्यामुळेच कदाचित पोलीस आता चकमकींच्या भानगडीतही पडत नाहीत, असेच चित्र सध्या तरी आहे. जलदगती न्यायालयात आज गंभीर प्रकरणांचे निकाल सहा महिने ते वर्षभरात लागत आहेत. अशा वेळी कायदा हातात घ्यावा का, असा सवाल पोलिसांनी स्वत:लाच विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण कुठली चकमक अंगाशी येईल हे सांगणे कठीण आहे. ती चकमक बोगस असेल तर न्यायालयात बचाव करणे कठीण होऊन जाते, हे लखनभय्या प्रकरणात स्पष्ट झाले आहेच.

मन्या सुर्वेची चकमक…

मन्या सुर्वे हा लुटीचा गुन्हा करण्यासाठी चोरीच्या गाड्या वापरायचा. मन्याला चोरीच्या गाड्या पुरविणाऱ्याला पोलिसांनी विश्वासात घेतले आणि मग मन्या वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालयाजवळ येणार असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार मन्या टॅक्सीतून मैत्रिणीसोबत आला. सुरुवातीला मैत्रीण टॅक्सीबाहेर आली. सारे आलबेल आहे हे पाहून मन्या खाली उतरला. पोलिसांनी ती संधी वाया जाऊ दिली नाही. मन्याने अंदाधुंद गोळीबार करून प्रत्युत्तर दिले. गोळीबाराचा आवाज झाल्याने एक बसवाहक खाली उतरला. त्याच्या छातीला बंदुकीची गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला. परंतु पोलिसांच्या गोळीबारात मन्या ठार झाला.

रमा नाईकची चकमक…

कुख्यात गुंड रमा नाईक हा चेंबूर येथे पोलीस चकमकीत ठार झाला. तो चेंबूर येथे येणार असल्याची टीप पोलिसांना दाऊद टोळीकडूनच मिळाली होती. रमा हा चेंबूर येथील केशकर्तनालयात येत असे. तेथे जवळच असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये त्याची मैत्रीण काम करीत होती. तिला घेऊन तो खरेदीला जात असे. हिल्डा या मैत्रिणीला भेटायला गेलेल्या रमा नाईकला पोलीस अधिकारी राजन काटदरे यांनी चकमकीत ठार केले. दाऊद टोळीतील गुंड साधू शेट्टी हा चेंबूरमधील लॉजमघ्ये आठवडाभर राहिला होता. त्याची खबर पक्की ठरली आणि रमा नाईक चकमकीत मारला गेला. साधू शेट्टीने त्या वेळी दिलेल्या एका जबाबात ही माहिती आहे.

nishant.sarvankar@expressinda.com