प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र शासनाच्या सांख्यिकी मंत्रालयाचा सर्वसमावेशक वार्षिक अहवाल प्रकाशित झाला आहे. यात शिक्षण, आरोग्य, आर्थिक सर्व समावेशकता, रोजगार, मोबाईल इंटरनेट, संगणक कौशल्यासह अन्य विषयांचा आढावा घेण्यात आला असून देशातील सुमारे २५.६ टक्के तरुण शिक्षण, रोजगार तसेच कौशल्य विकासापासून दूर आहे. तर महाराष्ट्रातील प्रमाण १७.२० टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पाच टक्के तरुणाईला वाचन व लेखन करता येत नसल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. हे भयावह आहे, पण ते वास्तव असल्यामुळे स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. खरे तर आपला भारत देश ‘जगातील सर्वांत तरुण देश’ म्हणून ओळखला जातो. तसा उल्लेख आपले नेते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही अनेकदा करतात. भारतात सुमारे ५८.३ टक्के लोकांचे वय २९ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ३०-४० वर्षे या वयोगटातील लोकांची टक्केवारी ४१ टक्के आहे. तरीदेखील आपला देश इतर देशांच्या तुलनेत एवढा मागे का? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास एक भयाण वास्तव समोर येते, ते म्हणजे समाजमाध्यमे व इंटरनेट यांच्या अजगरी विळख्यात अडकलेली आणि भान नसलेली तरुण पिढी. हे वास्तव चिंताजनक लावणारे आहे.

आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करून काही मूलभूत आव्हाने पेलणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली आहेत त्यामध्ये २५ वर्षांवरील शहरी भागातील ४३.६ टक्के तर ग्रामीण भागातील ६९.६ टक्के तरुणाईने माध्यमिक व त्यापुढील शिक्षण घेतलेले नाही. आजही १५ ते २४ वयोगटातील २१.६ टक्के तरुणांना ईमेल, मेसेजच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ व अन्य मजकूर पाठवता येत नाही. त्यांनी ती कौशल्ये आत्मसात केलेली नाहीत. एवढेच नाही तर व्यवहारीक दृष्टीने ‘ढ’ ठरविण्यात आले आहेत.

ह्ही वाचा…लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा

देशाच्या आशा आणि अपेक्षा या तरुणांवरच केंद्रीत झालेल्या असतात. आजची तरुण पिढी ही पुढारलेली, हुशार आणि प्रगत आहे. काहीतरी करून दाखविण्याची धमक या तरुणांच्या नसांनसांमध्ये भिनली आहे. परंतु अशी काही उदाहरणे पाहिली की खरोखरच ही मुले प्रत्यक्ष व्यवहारात ‘ढ’ च आहेत, हे मान्य करण्याशिवाय पर्याय राहत नाही. अलीकडे इंटरनेट, फोन बॅकिंग, ऑनलाइन पेमेंट अशा विविध पर्यायांमुळे तरुण पिढीचा संबंध प्रत्यक्ष चलनाशी कमीच येतो. पैसे हाताळण्याची, बँकेत प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करण्याची, अर्ज लिहिण्याची सयच त्यांना नसते. त्यामुळे बाजारातील वस्तू, तिची किंमत, स्थिती याची माहिती या मुलांना असणे कठीणच असते. लहान लहान व्यवहारातही ते गोंधळून जातात. त्यांची सहज फसवणूक केली जाते. अनेकांना पैसा कसा वाचवावा? कुठे गुंतवणूक करावी? व्यवहार सावधपणे कसे करावेत? कोणत्या मोहांमुळे मोठे नुकसान होऊ शकते हेच माहिती नसते.

तरुणांच्या या अज्ञानात भर घातली ती कोविडकाळात आणि त्यानंतर बदलेल्या स्थितीमुळे. सारे काही ऑनलाइन झाल्यामुळे अनेक तरुण मुलांना बॅँकेत विथड्रॉअल स्लिप ओळखता व भरता येत नाही. साधा अर्ज करता येत नाही. चेक ओळखता येत नाही आणि भरताही येत नाही. डीडी विषयी न बोलणेच बरे. देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी मोठमोठ्या गप्पा मारतील पण अर्थसंकल्प समजत नाही. अमुक एक टक्के व्याज म्हणजे किती रक्कम हे सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिशेब लिहिता येत नाहीत. दहा, वीस, पन्नास, शंभर रूपायाची ‘किंमत’च राहिलेली नाही. छानछोकी आणि मोबाइलमधील जगातच तरुण मुले गुरफटलेली आहेत.

हेही वाचा…विधानसभेची नवी दिशा

भांडवलशाहीच्या प्रसारमुळे तरुणांचा जीवनविषयक दृष्टिकोन आमूलाग्र बदलला आहे. अधिकाधिक पैसे मिळवणे हेच प्रत्येकाचे एकमेव ध्येय आहे आणि तो मनाला वाटेल तसा उडविणे, हे स्वप्न. सामजिकभान तर दूरच पण साध्या संवेदनशीलतेचाही अभाव अनेक ठिकाणी जाणवू लागला आहे. कारण सध्याचे शिक्षण हे फक्त माहिती देते. आयुष्याचा, अस्तित्त्वाचा हेतू वगैरे विचार करण्याची सवडच देत नाही. तरुण हे केवळ आर्थिक शर्यतीत धावणारे घोडे झाले आहेत. निव्वळ परीक्षार्थी शिक्षणामुळे तरुणांचा करिअर आणि पैशांच्या चक्रव्युहात अडकलेला अभिमन्यू झाला आहे. याहून अधिक समृद्ध, समाधानी व काहीतरी निश्चित उद्दीष्ट असलेल्या जीवनापासून ते वंचित राहिले आहेत. प्रदूषणापासून दहशतवादापर्यंच्या प्रश्नांत आजचा तरुण होरपळत आहे. समाजाशी असलेले नाते या धावपळीच्या जीवनात तो पूर्णपणे विसरत चालला आहे. तरुणांना त्यांच्या सवयीच्या माध्यमातून, त्यांना समजेल अशा भाषेत परिसराविषयी, समाजाविषयी जागरुक करणे, अपरिहार्य आहे. तसे झाले, तर तरुण बिनकामाचे आणि ढ न राहता देशाच्या भविष्यातील मोलाची गुंतवणूक ठरतील. (लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ministry of statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills sud 02