रोहित पवार – कर्जतजामखेड मतदारसंघाचे आमदार

जनतेला गृहीत धरू नका, असा इशारा लोकसभा निवडणुकीतून देण्यात आला आणि तो देण्यात महाराष्ट्रातील मतदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली…

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये यंदाची निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण होती. संविधान बदलाची भाषा भाजपच्या अनेक नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. तसं झालं तर लोकशाहीचा गळा घोटला जाणार या जाणिवेतून सजग मतदारांनी इंडिया आघाडीला बळ देत भाजपचा उधळलेला वारू २४० वरच थोपून धरला. इंडिया आघाडीला बहुमत मिळालं नसलं तरी या आघाडीने भाजपचा आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव केला हे वास्तव आहे.

जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणवणारा सत्ताधारी भाजप विरुद्ध जवळ फारशी साधनं नसलेला विरोधी पक्ष अशा विषम परिस्थितीतही भाजप पराभूत का झाला, हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. गेल्या दहा वर्षांत भाजपने केलेला उन्माद पाहता जनता भाजपपासून दूर गेली असं त्याचं एका वाक्यात उत्तर आहे. आपण सांगू तसं लोक वागतील हा भाजपच्या भ्रमाचा भोपळा लोकांनीच फोडला. बेकारी, महागाई, चीनची घुसखोरी, अशांतता हे मुद्दे बाजूला ठेवून भाजप केवळ द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या मुद्द्यांवर भर देत राहिला. पुणे ते नागपूर या ८५० कि.मीच्या पायी ‘युवा संघर्ष यात्रे’च्या माध्यमातून मी लोकांचे प्रश्न जवळून बघितले होते. शेतमालाला भाव मिळत नसल्याने तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी अडचणीत होता. बेकारी, सरकारी भरती परीक्षांमध्ये होणारे घोटाळे यामुळे तरुणवर्गात असंतोष होता. राज्यातील उद्याोग गुजरातला पळवणे, प्रादेशिक पक्ष फोडून त्यांचे अस्तित्व संपवण्याच्या प्रयत्नाबद्दल जनतेच्या मनात असंतोष खदखदत होता. हे सगळं युवासंघर्ष यात्रेत दिसून आलं होतं. पण भाजप त्यातल्या एकाही मुद्द्यावर ब्रदेखील काढत नव्हता. त्यामुळे जनता केवळ निवडणुकीची वाट पाहत होती. तिने निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला.

हेही वाचा >>> भारतीय रेल्वेवर टीका करताना या गोष्टीही लक्षात घ्या…

दिंडोरीमधील सभेत आमचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी ‘कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे’ या मुद्द्यावर भर दिला. त्याच दिवशी मोदींची पिंपळगाव बसवंतमध्ये सभा झाली. ते कांद्यावर एक शब्दही न बोलता हिंदू-मुस्लीम करत राहिले. कांदा निर्यातबंदीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला हे पटलं नाही. मराठवाड्यात प्रचारसभेत युवकांच्या हाताला काम कसं द्याल, आरक्षणाचे प्रश्न कसे सोडवाल यावर बोलण्याऐवजी पंतप्रधान नेहमीचेच ध्रुवीकरणाचे मुद्दे मांडत राहिले. दहा वर्षांपूर्वी ज्या दराने सोयाबीन विकलं त्याच दराने आज सोयाबीन विकावं लागत असेल तर या महागाईच्या आगडोंबात शेतकरी कसा जिवंत राहील? भाव नाही म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी दोन-दोन वर्षे कापूस घरात ठेवला तरीही चांगला भाव मिळाला नाही. यामुळे आर्थिक कंबरडं मोडलेला शेतकरी भाजपचा तिरस्कार करत होता. हाच प्रकार राज्यात सर्वत्र दिसून आला. याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागेल असंच भाजपचं वर्तन होतं. शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा आवाज आहेत आणि सत्तेचा गैरवापर करत हाच आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपने केला. महाराष्ट्राच्या अस्मितेचा गळा कुणी घोटला जात असेल तर बघत बसायचं का, हा प्रश्न मला राज्यात अनेकांनी विचारला. यावरूनच महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत असल्याचं दिसत होतं. भाजप आणि त्यांचे मित्र आपण निवडणूक सहज जिंकू या भ्रमात होते. पण जनतेने सत्तेच्या दडपशाहीला भीक घातली नाही. लोकांनीच निवडणूक हातात घेतली आणि भाजपविरोधात कौल दिला.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर आम्ही ‘साहेब संवाद’ हा कार्यक्रम घेऊन राज्यभर लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या रूपाने महाराष्ट्रावर येत असलेल्या या संकटाविरोधात लढायला आम्हाला तुमची साथ हवी आहे, या आमच्या आवाहनाला लोकांनीही सक्रिय प्रतिसाद दिला. भाजपचं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण पवार साहेबांनी रोखून धरलं असल्याने भाजपचा नेहमीच त्यांच्यावर राग होता, आहे. त्यांचा पराभव करायचा हे ध्येय ठेवून भाजपने आमच्यातल्या काही सदस्यांना पदाचं आमिष दाखवून अन् कारवाईची भीती दाखवून राष्ट्रवादीत फूट पाडली किंबहुना पक्षच त्यांच्या ताब्यात दिला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन-अडीच दशकांचं महाराष्ट्राच्या मनामनात कोरलं गेलेलं समीकरण पुसण्याचा भाजपने प्रयत्न केला. आमदार, खासदार आणि एक-दोन नेते पळवले म्हणजे शरद पवार साहेबांसारखे लोकनेते संपवता येतील असा भाजपचा अंदाज होता. पण तो चुकला. साहेबांची ताकद आमदार- खासदार नाहीत, तर सर्वसामान्य जनता आहे हे विसरून भाजपने पक्ष फोडण्याची घोडचूक केली. तिची जबर किंमत त्यांना लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. याबद्दल लोकांच्या डोळ्यात आग आणि मनात संताप असल्याचं मी राज्यभरात फिरत असताना अनेकदा अनुभवलं आहे. फोडाफोडी करणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही, अशी जणू प्रतिज्ञाच लोकांनी केली होती. महाराष्ट्रात असलं राजकारण चालणार नाही, याचाच जणू संदेश लोकांनी मतपेटीतून दिला आहे.

पक्ष चोरला जात असताना पवार साहेबांसोबत कुणीही राहू नये म्हणून चोहो बाजूंनी दबाव टाकण्यात आला. मी सीईओ असलेल्या बारामती अॅग्रोवर कारवाई केली गेली. आधी प्रदूषण महामंडळाकडून कारवाई केली गेली. त्यावरही आम्ही थांबणार नाही हे दिसताच ईडीकडून कारवाई केली गेली. मी पवार साहेबांसोबत राहू नये म्हणून दबाव आणण्यासाठी हे सर्व केलं गेलं. आमच्या घरात आजी शारदाबाई पवारांपासून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढण्याची वृत्ती आहे आणि तीच वृत्ती पवार साहेबांमध्ये ठासून भरली आहे. अजितदादांनी भाजपच्या नादी लागून आपली लढाऊ वृत्ती सोडली याचं मात्र नक्की दु:ख होतं.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांनी दाखवलेला करिश्मा भाजप विसरला नव्हता. त्यामुळेच बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष निर्माण करायचा आणि शरद पवार साहेबांना तिथेच अडकवून ठेवायचं हा भाजपचा डाव पूर्णत: फोल ठरला. पवार साहेबांनी संपूर्ण राज्यात ७० पेक्षा अधिक सभा घेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कितीही प्रयत्न केले तरी लोक आणि पवार ही नाळ तोडण्यात अपयश येत असल्याच्या नैराश्यातून भाजपने पवार साहेबांवर ‘भटकती आत्मा’ अशी टीका केली. त्याचा उलट परिणाम झाला आणि नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सभा घेतलेल्या १९ मतदारसंघांत १४ ठिकाणी भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली. पवार साहेबांच्या वयावरूनही अनेकांनी टीका केली, परंतु साहेबांच्या झंझावाती सभांमुळे टीकाकारांची तोंडं बंद झाली. उलट त्यांनाच एका मतदारसंघातच अडकवून ठेवण्याचं काम पवार साहेबांनी केलं.

बारामतीने नेहमीच पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या पवार साहेबांना साथ दिली आहे. अजितदादांनी आमची सर्व यंत्रणा पळवली होती, शिवाय भाजपची संपूर्ण निवडणूक यंत्रणा त्यांच्या दिमतीला होती. आमच्या बाजूने कुणी पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा तरुण पुढं येत असेल, भूमिका मांडत असेल तर त्यालाही दमदाटी केली जात होती. धमक्या दिल्या जात होत्या. कित्येकांना नोकरीवरूनही काढलं गेलं. व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या गेल्या. बाहेरच्या तालुक्यातील गुंडांना बारामतीत प्रचारासाठी आणून नाही नाही ते बोललं गेलं. शेतकऱ्यांना पीक कर्ज न देण्याची धमकी दिली गेली. पण आम्ही कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण केला आणि शेवटच्या १५-२० दिवसांत सामान्य कुटुंबांतून २२ हजार नवीन कार्यकर्ते उभे करून संपूर्ण मतदारसंघात निवडणूक यंत्रणा उभारली. या सर्वांनी बूथ पातळीवर अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक काम केलं. आम्हाला यात मराठी पत्रकार, समाजमाध्यमांतून लोकशिक्षण करणारे युवक आणि छोटी-मोठी पोर्टल, यू-ट्यूब चॅनल चालवणारे पत्रकार या सगळ्यांची साथ मिळाली. सर्वसामान्य लोकांचं साहेबांवरील प्रेम, ताईंची खासदार म्हणून असलेली यशस्वी कारकीर्द, स्वाभिमानी मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची आणि मित्रपक्षांची भक्कम साथ यामुळे २०१९ पेक्षाही मोठा विजय यावेळी मिळाला. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन केलेली मेहनत आणि लोकांनी दिलेली साथ याचं हे यश आहे.

या निवडणुकीने राजकीय पक्षांना एका गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून दिली ती म्हणजे जनतेला गृहीत धरून कुणी मनमानी कारभार करत असेल तर जनता त्याला त्याची जागा दाखवते. महाविकास आघाडीला राज्यात मिळालेला विजय हा खऱ्या अर्थाने पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे नेते, निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वाभिमानी नागरिक यांचा आहे. गेल्या दहा वर्षांत सर्व सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून, जनतेला धार्मिक, प्रतीकांच्या आणि भावनेच्या राजकारणात अडकवून भाजपची सुरू असलेली घोडदौड बघता यंदाची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक असेल का, इथपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली होती; परंतु यंदा जनतेने दिलेला कौल बघता भारतीय लोकशाहीमध्ये स्वत:ची एक इंटर्नल इम्युनिटी (प्रतिकारशक्ती) असून लोकशाहीविरोधी शक्ती वरचढ होतात तेव्हा ही प्रतिकारशक्ती सक्रिय होऊन लोकशाहीचं संरक्षण करते, असं मला वाटतं.