साधारण सत्तरच्या दशकात मुंबईत संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी देशभरात दरारा निर्माण केला होता. पण त्याआधी स्थानिक पातळीवर गावगुंडांची दहशत होती. अशा वातावरणात २६ जानेवारी १९६६ रोजी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे किसन सावजी या गावगुंडाला फौजदार व. शि. ढुमणे यांनी टिपल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पोलीस आणि गुंडांमधील ही राज्यातील पहिली चकमक मानली जाते. त्यानंतर ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत मुंबई पोलिसांनी चकमकींचा गुन्हेगारी टोळ्यांविरोधात अस्त्रासारखा वापर केला आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले. पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांना ‘चकमक फेम’ अशी ओळख मिळाली. अशा अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत जनतेच्या मनात कमालीचे औत्सुक्य होते. पण नंतर त्यातील अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले.

मुंबईत १९९८ मध्ये गुंडांनी तब्बल १०१ जणांचा खून केला होता. त्यानंतर १९९९ मध्ये गुंडांच्या रक्तरंजीत कारवायांत ४७ जण ठार झाले. मग तत्कालीन पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी कडक धोरण स्वीकारले. अंडरवर्ल्डशी दोन हात करण्यासाठी १९८३ च्या तुकडीतील अनेक अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, प्रदीप शर्मा त्यातीलच होते. चकमकींद्वारे १९८३ च्या तुकडीने अंडरवर्ल्डमध्ये पोलिसांची दहशत प्रस्थापित केली. परिणामी १९९९ मध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ८३ गुंड मारले गेले. त्यामुळे गुन्हेगारांनीही पोलिसांचा धसका घेतला. त्यानंतर २००० मध्ये पोलीस चकमकीत ७३ गुंड मारले. तर गुंडांनी शिवसेना नगरसेविका नीता नाईक, शाखाप्रमुख शिवाजी चव्हाण, बबन सुर्वे, रमाकांत हडकर, रिपाइंचे रागो मकवाना यांच्यासह २४ जणांच्या हत्या केल्या. २००१ मध्ये पोलीस चकमकीत ९४ गुंड मारले गेले होते. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील हा उच्चांक होता. त्यानंतर २००२ मध्ये ४७ गुंडांचा चकमकीत बीमोड झाला. याच काळात चकमकफेम किंवा एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांच्या जीवनावर सिनेमे येऊ लागले. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण झाले. पण त्यातून अधिकाऱ्यांमध्ये आपापसातील स्पर्धा निर्माण झाली. कोणाच्या नावावर सर्वाधिक चकमकी याचे विक्रम रचण्याची अहमहमिका लागली. त्यातून एकमेकांना वादात अडकवण्याचे प्रकारही झाले.

हेही वाचा >>>चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?

त्यावेळी चकमक फेम म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची एक फळी मुंबई पोलीस दलात होती. त्यांनी २७२ गुंडांना यमसदनी धाडले. त्यात छोटा राजन टोळीच्या ९७ गुंडांचा, तर दाऊद टोळीच्या ४६ गुंडांचा समावेश होता. यांतील काहींच्या नावावर शंभराहून अधिक गुन्हेगारांना ठार केल्याच्या नोंदी आहेत. दरम्यानच्या काळात अनेक चकमकींबाबत आक्षेप निर्माण झाले. त्या आरोपांमुळे मुंबईतील चकमकी बंद झाल्या.

मुंबई पोलिसांची शेवटची चकमक १ नोव्हेंबर २०१० च्या पहाटे चेंबूरमध्ये झाली. त्यात नाईक टोळीचा गुंड मंगेश नारकर मारला गेला. नारकरला खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला आणि त्याच्या साथीदाराला ६ ऑक्टोबर २०१० मध्ये नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून नाशिक येथे नेले जात असताना त्या दोघांनी पोलीस पथकावर मिरची पावडर फेकून पोलीस कोठडीतून पळ काढला. नारकरचा साथीदार नंतर पकडला गेला, मात्र फरार नारकरने बांधकाम व्यावसायिकांना धमकीसाठी दूरध्वनी करणाऱ्यास सुरुवात केली. खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी १ नोव्हेंबर २०१० रोजी चेंबूर येथे आलेला असताना गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला. वडाळ्यातील सहकार नगरमधील रहिवासी नारकरवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये १८ हून अधिक गुन्ह्यांची नोंद होती. तो कारागृहात असतानाही गुन्हे करत होता. त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही मुंबईतील गुन्हेगारी आणि टोळ्या पूर्णपणे संपल्या असे म्हणता येणार नाही.

हेही वाचा >>>चकमक आणि चकमक फेम

चकमकीसाठी नावारूपाला आलेले बहुतांश अधिकारी १९८३ च्या तुकडीचे होते. एकूण २७२ पैकी ९० टक्के एन्काउंटर विजय साळसकर, प्रदीप शर्मा व प्रफुल्ल भोसले या तीन अधिकाऱ्यांनी मिळून केले होते. पोलीस अधिकारीच वेगवेगळ्या टोळ्यांकडून सुपारी घेऊन प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांना चकमकीत ठार मारत असल्याचे आरोप चकमक फेम अधिकाऱ्यांवर झाले. प्रदीप शर्मा यांच्यावरही असे आरोप झाले. अब्दुल करीम तेलगी प्रकरणानंतर पोलीस दलाचा पडता काळ सुरू झाला. अनेक अधिकाऱ्यांवर खटले झाले, काहींना अटकही झाली. ३१२ चकमक कारवायात सहभागी असलेले तसेच चकमकीत ११३ गुंडांना ठार करणारे शर्माही त्याला अपवाद ठरले नाही. काही प्रसिद्धी माध्यमांनी तेलगी प्रकरणातही शर्मा यांच्यावर संशय व्यक्त केला. मात्र त्या आरोपांत तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अमरावती येथे तैनात असताना राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भैय्या याची बनावट चकमक आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोपातून शर्मा यांना सन २००८ मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. लख्खन भैय्याच्या बनावट चकमक प्रकरणी शर्मा यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आले. पुढे ३१ ऑगस्ट २००८ ला गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली शर्मा यांना बडतर्फ करण्यात आले. याविरोधात शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने शर्मा यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे सांगून त्यांची बडतर्फी ७ मे २००९ मध्ये रद्द ठरवली व शर्मा यांना पुन्हा खात्यात घेण्याचे आदेश दिले. २०१३ मध्ये लखनभैय्या बनावट चकमकीप्रकरणी मुंबई न्यायालयाने शर्मा यांची आरोपातून मुक्तता केली. ते १६ ऑगस्ट,२०१७ रोजी म्हणजे नऊ वर्षांनंतर पुन्हा महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. त्यांना ठाण्यात नियुक्ती मिळाली. तेथील खंडणी विरोधी पथकात कामाला असताना त्यांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यांत अटक केली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी निवृत्ती घेऊन ते राजकारणात सहभागी झाले. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा येथून निवडणूकही लढवली होती. त्यानंतर अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँन्टेलियाच्या बाहेर स्फोटके ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांना अटक झाली. याशिवाय लखन भैय्या प्रकरणातही उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

विजय साळसकर हे दुसरे चकमक फेम अधिकारी १९९३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले होते. अमर नाईक आणि अरुण गवळी टोळीतील अनेक गुंडांना साळसकर यांनी चकमकीत मारले. त्यात अमर नाईक, सदाशिव पावले ऊर्फ सदामामा व विजय तांडेल यांच्याविरोधातील चकमकी खूप गाजल्या होत्या. त्यांनी चकमकीत ७० हून अधिक गुंडांना मारले होते. गुन्हे शाखेत कार्यरत असताना मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत त्यांचा मृत्यू झाला.

तर दगडी चाळीत शिरून अरुण गवळीला अटक करणारे प्रफुल्ल भोसले ८५ चकमकींमध्ये सहभागी होते. १९९२ मध्ये खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड व एके ४७ बंदुकीने बेछूट गोळीबार केला होता. प्रफुल्ल भोसले, राजू जाधव, सुरेश वाव्हळ व इतर सहकाऱ्यांनी दर्शनसिंह आणि प्रीतमसिंह या दोघांना चकमकीत ठार केले. एका महिलेसह तीन दहशतवादी तेथून पळून गेले. त्यावेळी झालेल्या चकमकीत उपनिरीक्षक राजू जाधव यांचा मृत्यू झाला होता. भोसले यांच्यावर ख्वाजा युनूस प्रकरणात आरोप झाले होते. भोसले पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत.

सचिन वाझे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन, मुन्ना नेपाली अशा अनेक गँगस्टर्सच्या गँगमधल्या जवळपास ६३ सदस्यांना चकमकींमध्ये मारल्याचा दावा केला जातो. घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ख्वाजा युनूस याचा २००३ मध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी सचिन वाझेंना २००४ मध्ये निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी पोलीस दलातील सेवेचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. २०२० मध्ये त्यांना पुन्हा पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता पथकाच्या (सीआययू) प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अँटालिया बाहेर स्फोटक ठेण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांना अटक झाली.

अनेक अधिकारी, कमर्चारी चकमकींमुळे वादग्रस्त ठरले, कारवाईला सामोरे गेले. त्यांच्या नैतिकतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. मात्र, या सगळ्या पलीकडे सामान्य माणसाच्या मनात चकमकींचे किस्से, चकमक फेम अधिकाऱ्यांबद्दलचे कुतूहल कायम आहे.

anish.patil@expressinda.com