कमलाकर फडके
लोकसभा निवडणुका पार पडल्या. तसे पाहता निवडणुकांचा कालावधी फारच प्रदीर्घ होता. तो का व कशासाठी याचे उत्तर फक्त निवडणूक आयोगच देऊ शकतो. निवडणुका कडेकोट बंदोबस्तात व शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या जातील आणि कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, असे आश्वासन आयोगाने दिले होते. तरीसुद्धा काही राज्यांमध्ये विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तेथील परिस्थितीची पूर्ण कल्पना असूनही तिथे कोणताही बंदोबस्त ठेवला गेला नाही. निवडणुकीचा लांबलचक कार्यक्रम आखला गेला. त्यातच कडक उन्हामुळे मतदानाला बाहेर पडणाऱ्यांची संख्याही बऱ्याच प्रमाणात घटली. वास्तविक गुजरात, केरळ, तमिळनाडू वगैरे अनेक राज्यांमध्ये एकाच दिवशी संपूर्ण मतदान घेतले तसे इतर राज्यांमध्ये फारतर दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये घेणे अशक्य होते, असे वाटत नाही. प्रचारसभांमध्ये विरोधकांनी जो अपप्रचार केला, संविधानात बदल केला जाईल, आरक्षण रद्द केले जाईल त्याला कारण भाजपाची ‘अब की बार चारसो पार’ ही घोषणाच कारणीभूत ठरली. त्यातून बाहेर पडणे भाजपाला कठीण होऊन बसले व विरोधकांचा अपप्रचार मोडून काढण्यातही म्हणावे तसे यश आले नाही. सामान्य मतदाराला पूर्ण गृहीत धरून, जणू आपण आपल्या घोषणेनुसार जिंकूच हा दुरभिमान भाजपला नडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकंदरच प्रचाराचा धुरळा दोन्ही बाजूंनी एवढा उडवला गेला की त्यामध्ये भाजपला फारसे सावरता आले नाही. किंवा ते फारच भ्रामक कल्पनेत रमले, असे दिसते. सामान्य माणसालादेखील निकाल आल्यानंतर चांगलाच धक्का बसला. तरीसुद्धा भाजपाला फार अपयश आले असे म्हणता येणार नाही. कारण सर्व विरोधक एकत्र लढूनही जेवढ्या जागा जिंकता आल्या तितक्या किंबहुना जास्तच जागा एकट्या भाजपने जिंकल्या आणि सहयोगी पक्षांच्या मदतीने बहुमत मिळविले. त्यामुळे एकहाती सत्ता राबवणे अशक्य झाले व आता इतर मित्रपक्षांना महत्व प्राप्त झाले. याचे परिणाम काय होतात ते काळाच्या ओघात दिसेलच.

हेही वाचा : उद्दिष्टच विसरलेली अधिवेशने…

भाजपच्या पराभवाला अनेक कारणे आहेत. एक महत्वाचे कारण म्हणजे बऱ्याच जागी एकास एक उमेदवार उभे ठाकले व त्यामध्ये महत्वाचा घटक मुस्लीम मतांचा दिसतो. मुस्लिमांची एकगठ्ठा मते विरोधकांना गेली. त्यामध्ये विभागणी झाली नाही. याचा विचार करता हिंदूंची मते अशा रीतीने मिळाली का याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. अर्थात यातही अनेक कारणे आहेत. यामध्ये एक अहंकार हा मुद्दा नंतर उपस्थित केला गेला. तो काही अंशी खराही असेल. कारण प्रचारादरम्यान खुद्द जे. पी. नड्डांच्या काही वक्तव्यांमुळे भाजपाला जणू संघाची गरजच नाही आणि भाजप सक्षम झालेला आहे अशा असे चित्र निर्माण झाले. त्यामुळेही अशी एक धारणा झाली की खुद्द संघही थोडासा अलिप्त राहिला व ज्या प्रमाणात संघ स्वयंसेवक मतदाराला बाहेर काढण्याचे काम नेहमी करतात, तेवढ्या प्रमाणात ते यावेळी केले गेले नाही. अर्थात ही धारणा काही प्रमाणात खरी असू शकते.

दिवंगत वाजपेयी पंतप्रधान असताना २००४ च्या निवडणुकीत भाजपच पुन्हा बहुमतात येईल, अशी सर्वांचीच एकंदरीत ठाम खात्री होती. माध्यमांनीही तसेच कल दर्शविले होते. त्यांच्या सर्वेक्षणांमध्ये वाजपेयी हरणार, असे कुठेही म्हटलेले नव्हते. एकंदर वातावरणही अनुकूलच वाटत होते. निकाल आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. वृत्तमाध्यमांचीही हेटाळणी झाली. याहीवेळी बहुतांश म्हणजे विरोधी माध्यमेही उघडी पडली. त्या काळात मी भारतीय मजदूर संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यामुळे माझ्या संपर्कात असलेल्या संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी खूप वेळा चर्चा होत असत. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी संघ व विश्वहिंदू परिषदेच्या उदासीनतेमुळे असे झाले हे मान्य केले होते.

यावेळीही असे झाले असेल असे मानण्यास काहीच हरकत असण्याचे कारण नाही. वास्तविक भाजपाला अहंकार नडला किंवा भाजपाला अहंकाराची बाधा झाल्याची कानटोचणी खुद्द सरसंघचालकांनीच जाहीर भाषणात केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था असल्यामुळे आपण निर्माण केलेल्या, उदयास आणलेल्या संस्थांना योग्य वेळी सल्ला देणे, वेळप्रसंगी ताकीद देणे, कान टोचणे हे त्यांचे कामच आहे, नव्हे तो त्यांचा अधिकारच आहे. याबाबत कोणाचे दुमत असल्याचे कारण नाही. पण अशा प्रसंगी भाजप किंवा कोणत्याही संस्थेकडून काही अहंकाराची वा चुकीची भूमिका घेतली गेली असेल तर सरसंघचालकांनी जाहीर वक्तव्य करून विरोधकांना आयते कोलीत द्यायचे कारण नव्हते असे माझे मत आहे. भाजप तुमचे ऐकत नसेल, खरोखर अहंकारी झालाही असेल तर त्यांना योग्य समज खासगीतही देता आली असती. परिणाम काय होतील याचीही कठोर समज देता आली असती. कोणतीही संघटना चुकीच्या मार्गाने जात असेल तर मातृसंस्थेकडून तंबी मिळाल्यावर ते ऐकणार नाहीत व सुधारणा करणार नाहीत असे नाही. पण चालू कामांमध्ये पुरेपूर सहकार्य केले पाहिजे.

हेही वाचा : शेतकऱ्यांना कुबड्या नको, स्वातंत्र्य द्या!

प्रत्यक्ष मातृसंस्थेकडून स्वयंसेवकांना आदेश दिले गेले असतील असे मुळीच नाही. पण थोडीशी उदासीनताही स्वयंसेवकाला कळू शकते व “मौनं संमती दर्शनम्” हे समजण्यास स्वयंसेवकही जाणता झालेला आहे. विरोधकांना आज देशाचे फार प्रेम आहे असे दिसत नाही. कारणे काही असली तरी परिणाम तोच होतो. आज कधी नव्हे ते देशाची मानप्रतिष्ठा वाढत आहे. हिंदुत्वाची भावनाही लोकांमध्ये वाढीस लागली आहे. परदेशातही देशाची वाहवा होत आहे. यात स्वयंसेवकांचेही खूप मोठे योगदान आहे. अशा वेळी थोडासा अहंकार झाला असेल तर तो योग्य पद्धतींनी दूर करायचा की त्याचे जाहीर वस्त्रहरण करायचे? हे करताना आपलाही थोडासा अहंकार डोकावतोच हेही लक्षात घ्यायला हवे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपची प्रचाराची पातळीही एकसुरीच राहिली. विरोधकांनी चुकीचे, दिशाभूल करणारे मुद्दे जरी घेतले असले तरी त्यामध्ये लोकांना भ्रमित करता येईल असे तथ्य होते. सामान्य माणसाला काय मिळते आहे याची फारशी किंमत नसते. पुढे काय मिळणार आहे, या कल्पनेनेसुद्धा अशा गोष्टींकडे लोक धावत असतात. त्यामुळे राहुल गांधींच्या खटाखट खटाखट पैसे खात्यात जमा करण्याच्या मुद्द्याला लोक फसले. भाजपने आजवर ‘सबका साथ’नुसार ज्यांना जे जे दिले अशा लाभार्थींनादेखील अधिक काही मिळणार आहे याची भुरळ पडली. भाजपने चांगले काम केल्याचे कौतुक लोकांना आहे पण तेही फार काळ टिकत नाही. सुरुवातीला त्याचे जेवढे कौतुक लोकांना वाटते, ते मिळणारच आहे, जणू आपला तो जन्मसिद्ध हक्कच आहे अशीच जनमानसाची भावना होते. अर्थात कर भरणाऱ्या लोकांच्या जीवावर असे फुकटपोशे किती दिवस पोसणार? कारण अशा कामातून लोकांची काम करण्याची वृत्तीच नष्ट होईल याचाही विचार करण्याची वेळ आहे. प्रचारामध्ये विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे खोडून काढून लोकांना त्यापासून सावध करण्यास भाजप कमी पडला असे वाटते. किंबहुना खटाखट सारखे मुद्दे आपणच अधिक प्रचार करून जास्तीजास्त लोकांपर्यंत नेऊन विरोधकांच्या मुद्द्यांचा प्रचार केला असेच चित्र दिसले. प्रचारादरम्यान सभेला गर्दी किती जमते याच्याशी मते मिळण्याचा फारसा संबंध नाही. तशी राज ठाकरे यांच्या सभेलाही प्रचंड गर्दी होते, पण मतदानाचे काय? त्यामुळे विरोधकांवर अती टीका करण्यात जास्त वेळ खर्च झाला. आपण आजपर्यंत जे चांगले काम केले त्यापेक्षा पुढे अजून काय देऊ असा भ्रामक मुद्दासुद्धा लोकांपुढे नेता आला नाही. तीच तीच रटाळ भाषणे यामुळे गर्दी जमूनही मतांमध्ये रूपांतर झाले नाही.

हेही वाचा : ‘आणीबाणी’बद्दल संघ- भाजप तुम्हाला हे सांगणार नाहीत…

सर्वांत धक्कादायक म्हणजे उत्तर प्रदेशचे विशेषतः अयोध्या, किंबहुना वाराणसीचा निकाल. गेल्या निवडणुकीत वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदी ५ लाख मताधिक्याने निवडून आले होते. या वेळी मात्र फक्त १.५ लाख मताधिक्याने निवडून आले. हा एक प्रकारचा पराभवच आहे असे म्हणावे लागेल. पक्ष याचा विचार करेलच. प्रभू रामचंद्रांना देखील असे वाटले असेल की ही मंडळी काम चांगले करतात, पण यांच्यामध्ये कुठेतरी अहंकार डोकावू पाहात आहे. त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे म्हणून फार कठोर नाही, पण काम करण्याची पुन्हा संधी देऊनही मर्यादेत राहण्याची शिक्षा त्यांना दिली असावी. खरेतर सरसंघचालकांचे हे काम खुद्द प्रभू रामचंद्रांनीच केले ही गोष्ट सरसंघचालक भागवतांच्याही लक्षात आलेली नसावी.

एकंदर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून सामान्य जनमानसाची काय अवस्था आहे, तो भ्रमित झाला आहे का हाच माझ्या मनात निर्माण झालेला विचार. यामध्ये कोणाला सल्ला देणे किंवा काही सुचवणे हा उद्देश नाही. कोणी दाखल घ्यावी असेही नाही. सुज्ञास इतकेच पुरेसे.

kamalakarphadke3009@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhu ramchandra himself did the work of rss chief mohan bhagwat to stop bjp s arrogance css