तवलीन सिंह

औरंगजेबाविषयी भारतात कुणालाही आदर नाही, कारण तो मनमानी करणारा जुलमी राज्यकर्ता होता, याविषयी (माझ्यासह) कुणाच्याही मनात कसलीही शंका नाही. त्यामुळे, गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना चित्रवाणी- पत्रकारांच्या गराड्यात ‘औरंगजेबाची अवलाद’ वगैरे शब्द उच्चारताना पाहिले- ऐकले तेव्हा मला तरी धक्काच बसला. हे फडणवीस एक जबाबदार नेते म्हणवले जातात, त्यामुळे निमित्त कोल्हापुरातील तणावाचे असले तरी, हे शब्द उच्चारल्याबद्दल फडणवीस यांचा जाहीर निषेध करायला हवा.

समाजमाध्यमावर औरंगजेबाची तरफदारी करणारा मजकूर कुणा १४ वर्षे वयाच्या मुलाने लिहिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असा काही आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर असल्याची खबर मिळताच हिंदुत्ववाद्यांचे पायदळ जागे होऊन रस्त्यावर उतरले. धार्मिक भावना भडकावण्याची तजवीज करण्यात आली. यापूर्वी देशात अन्यत्र हिंदू-मुस्लीम तणावाच्या काळातही कोल्हापूर शांत राहिले होते. तथाकथित ‘लव्ह जिहाद’चा आरडाओरडा कोल्हापूरने विवेकीपणे दुर्लक्षित केला होता. समाजाची ही घट्ट वीण उसवून फडणवीसांना केवळ मतांच्या राजकारणात पुढे जायचे आहे का? महाराष्ट्रात पुढल्याच वर्षी विधानसभा निवडणूक आहे, त्यासाठीची ही तयारी होती का?

आणखी वाचा-‘कोविन’ॲपवरून गळती नसेलही झाली, पण ‘आधार’ कमकुवतच का?

फडणवीस म्हणे महाराष्ट्राच्या सत्तेबाहेर राहणार होते. पण केवळ पक्षातल्या शीर्षस्थ नेत्यांच्या इच्छेला मान देऊनच ते उपमुख्यमंत्री पदावर रुजू झाले. त्याहीआधी २०१५ मध्ये त्यांच्या नावाला पसंती खुद्द पंतप्रधानांनीच दिली होती. नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबद्दलची मते काय आहेत, याबद्दल अगदी सजग असतात. ते त्यांच्याजागी योग्यच, कारण ते स्वत:ला जग चालवणाऱ्या अत्यंत मोजक्या नेत्यांपैकी एक मानतात. म्हणून पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांत मोदींवर जराही टीका झाली, तर भाजपतर्फे समाजमाध्यमांवर ‘डिजिटल योद्धयां’ना मोकळे रान दिले जाते. विशेषत: न्यू यॉर्क टाइम्स किंवा बीबीसी यांनीच हा बदनामीचा कट रचला, असे आरोप हे योद्धे करू लागतात. त्यामुळे खरे तर पाश्चात्त्य माध्यमांत भारताची प्रतिमा अधिकच खराब होते, हा भाग निराळा. पण मुळात पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे मोदींकडे काहीशा संशयाने पाहातात हे खरे की नाही? तर होय, खरे… आणि असे होण्यामागे कारण एकच- ती माध्यमे मोदींना ‘बहुसंख्याकवादी नेता’ मानतात. दोष थेट मोदींचा नसतानाही त्यांच्यावर टीका होत राहणे हे चुकीचेच आहे. शिवाय काही वेळा पाश्चात्त्य माध्यमांचे आरोप अगदीच निराधार असतात. मात्र या देशातल्या उदारमतवादी (डावे अथवा समाजवादी नसलेल्या माझ्यासारख्या) अनेकांना मुस्लिमांशी बोलल्यावर एवढा विषाद तरी नक्कीच वाटतो की, आरोप सिद्ध होण्या/ न होण्यापूर्वीच काहींची घरे बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आली आहेत, झुंडबळी गेले आहेत किंवा दंगल भडकावण्याचा आरोप सिद्ध झाला नसूनही वर्षानुवर्षे विनाजामीन कोठडीतच राहावे लागते आहे. लक्षात घेण्याजोगी बाब अशी की, हे सारे हिंदूंबाबत होत नाही, अगदी दंगलीनंतरच्या अटकांबाबतही नाही.

आता मुस्लिमांबद्दलही बोलते. मोदींच्या ‘नव भारता’त मुस्लिमांना ज्या तिरस्काराचा किंवा भेदभावाचा सामना करावा लागतो त्यामागे एक मोठे कारण हेही असते की, मुस्लीम समाज पुढे जाताना दिसतच नाही. इतकेच कशाला, इस्लामी देशांची आज काय अवस्था आहे याकडेसुद्धा मुस्लीम नीट डोळे उघडून पाहात नाहीत आणि प्रतिगामीपणाच करतात, असेही लक्षात येते. इराणमध्ये गळेकापू मुल्लांच्या जाचा कंटाळलेल्या महिला आणि मुली आपापले हिजाब जाळून टाकण्यासाठी सिद्ध झालेल्या आपण पाहिल्या आहेत. सौदी अरेबियातही महिलांनी महत्प्रयासाने थोडे अधिक स्वातंत्र्य मिळवलेले दिसते. सौदी महिला अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ-स्थानकात यशस्वीपणे जाऊन परतली, याच देशात महिलांना मोटारगाडी चालवण्याचे परवाने मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागला होता.

आणखी वाचा-हाँगकाँगच्या लोकशाही आशा संपुष्टात

मात्र भारतातल्या मुस्लीम महिला मागे जाताना दिसतात. श्रीनगरमधील एका कन्याशाळेत मुलींनी अरबी प्रकारचे बुरखे घालून वावरू नये, असे सांगणाऱ्या मुख्याध्यापिकेविरुद्ध गेल्याच आठवड्यात गदारोळ उडवण्यात आला. तोही इतका की, अखेर ‘घाला बुरखे पण किमान शाळेचा गणवेश ज्या रंगाचा आहे तेच रंग तरी वापरा’ अशी मिनतवारी करण्याची वेळ शाळेवर आली. लक्षात घ्या, जम्मू-काश्मीर हे भारताचे असे राज्य आहे की, जिथे पूर्वापार कधीही, महिलांना मशिदीत जाऊन नमाज पढण्यास मज्जाव नव्हता किंवा बुरख्याने चेहरा झाकण्याची सक्तीसुद्धा नव्हती. बुरख्याचे प्रस्थ काश्मीर खोऱ्यात वाढले ते जिहादवाद पसरत गेल्यामुळेच.

माझ्या उदारमतवादी मित्रांशी मुस्लिमांबाबत माझे मतभेदही होतात, कारण ‘बिचाऱ्यांना किती त्रास होतो आहे गेल्या नऊ वर्षांत’ असा सूर कोणी लावला तर मी सरळ प्रतिवादच करते, ‘उदारमतवादी म्हणवता ना, मग सर्वच प्रकारच्या धर्मवादाचा निषेध करा की!’ मुस्लीम किंवा शीख जिथे त्यांचे धर्मवेड दाखवताना दिसत आहेत, तिथे फक्त हिंदुत्ववाल्यांच्याच धर्मवेडाकडे बोट का दाखवता? मी शीख आहे आणि मला माझ्या धर्माचा अभिमानही आहे, पण इंदिरा गांधी यांच्या खुनाचे उदात्तीकरण करणारी मिरवणूक कॅनडामध्ये गेल्याच आठवड्यात निघाल्याच्या बातमीने मला शरम वाटली… कॅनडात राहणारे शीख लोक, तिकडे राहूनच खलिस्ताची मनोराज्ये रंगवताहेत, तर करा म्हणावं खलिस्तान कॅनडाच्या जंगलात कुठेतरी जागा शोधून. भारतात खलिस्तान कधीही होणार नाही म्हणजे नाही.

आणखी वाचा-खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्याबद्दल संशय का?

सर्वच धर्मांमध्ये हे असले माथेफिरू लोक असतात, किंबहुना सर्वच धर्मांमध्ये अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तथाकथित धर्मवेत्ते, धर्मप्रचारक वगैरे लोक असतात आणि तसले लोक धर्माचा चुकीचा अर्थ इतरांना सांगून, विनाकारण कट्टरपणा वाढवतात. पण या अशा लोकांनी आपापल्या धर्माचा, आपापल्या श्रद्धांचा ताबा घेऊ नये, एवढी काळजी लोकांनी नाही घेतली तर इराण किंवा अफगाणिस्तानासारखी गत होते.

पण धर्मवेड्यांचा प्रभाव सर्वच धर्मांवर वाढू द्यायचा नाही, हे ध्येय हवे असेल तर फडणवीसांचा जोरदार निषेधच झाला पाहिजे… काय ते त्यांचे अशोभनीय शब्द! लाज वाटते असल्या राजकारण्यांची.

Story img Loader