सुहास पळशीकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने संघ आणि त्याची कामगिरी यांचे विश्लेषण अनेकपरींनी होईल. गेल्या दशकातील संघाच्या अधिक जोमदार वाढीचा विचार करता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विरोधक आणि समर्थक अशा दोघांनाही संघाबाबत ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असा भास होऊ शकतो. त्यामुळे, आगामी दशकांमध्ये भारताच्या सार्वजनिक जीवनावर परिणाम करणाऱ्या त्याच्या दोन महत्त्वाच्या कामगिरींची नोंद घेणे अर्थपूर्ण ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इथे मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शंभर वर्षांच्या वाटचालीचे कितपत गोडवे गाईल, याबद्दल शंकाच आाहे. कारण गेली शंभर वर्षे, आपली उद्दिष्टे आणि कामगिरी याबाबत संघाने कधीच मोकळेपणाने फारसे भाष्य केलेले नाही. अर्थात असे असले तरी, संघाने गेल्या १०० वर्षांत काय मिळवले याची गोळाबेरीज येत्या काळात नक्कीच मांडली जाईल. त्यामुळे संघाच्या अभ्यासकांनी आणि निरीक्षकांनी संघाच्या कामगिरींची नोंद घेणे आणि त्यांच्या परिणामांवर चर्चा करणे आवश्यक आहे. म्हणून इथे संघाच्या दोन कळीच्या म्हणता येतील अशा कामांची चर्चा केली आहे.

हेही वाचा : आगामी जनगणनेमध्ये भारतातील सर्व बौद्धांनी मातृभाषेखालोखालचे स्थान पाली भाषेला द्यावे…

संघाची पहिली कामगिरी म्हणजे हिंदू धर्माचा अर्थ, हिंदू धर्माची कल्पना आणि हिंदूंच्या प्रथा यांचा अर्थ पालटणे किंवा त्या अर्थांना स्वत:ला हवे तसे वळण देणे. संघाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून नेहमीच, एकेश्वरवादी धर्मांशी या संघटनेचे जणू ‘विरोधभक्ती’चे नाते दिसून आलेले आहे. त्यामुळे हिंदू संवेदनांना आकार देण्यासाठी या धर्माची नक्कल करण्याचे प्रयत्न नेहमीच आकर्षक ठरले आहेत. अर्थात, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील ‘एकजिनसी समाज’ या राष्ट्रवादाच्या युरोपीय संकल्पनेनेदेखील हिंदुत्व विचारांना प्रभावित केले होते. संघाने या दोन्ही गोष्टींचे एकत्रीकरण करून, स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या समूहांच्या प्रथा परंपरांच्या विविधतेमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. या काहीशा अस्ताव्यस्त असलेल्या विविधतेत एकसंधता आणण्यासाठी संघाने दोन मार्ग वापरले आहेत. एक म्हणजे हिंदू अस्मितेवर आधारित राष्ट्रवाद. प्रत्यक्षात, ही ओळख अनेकदा कुणालातरी ‘इतर’ समूह समजण्यावर आणि या दुसऱ्याबद्दलच्या गहन संशयावर आधारित असते. ‘इतर’ हे बहुतेकदा ख्रिाश्चन आणि इस्लाम या धर्मांचे अनुयायी असतात. यातून, ‘आपण’ (‘वुइ’) या संकल्पनेला इतरांना सामावून घेण्याऐवजी त्यांना बाजूला करण्यातून सामर्थ्य मिळते.

सोबतच, धर्माधारित राष्ट्रवादाबरोबरच संघप्रणीत ‘हिंदुत्वा’ने हिंदू असण्याचीही पुनर्व्याख्या करून, नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट प्रतीके ‘अखिल हिंदू’ म्हणून लोकप्रिय केली गेली आहेत. रामजन्मभूमी आंदोलनापासून, हिंदू असणे म्हणजे राम हा देव माहीत असणे, त्याला मानणे असेही ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि समाजातील वेगवेगळ्या थरांमध्ये राम या संकल्पनेचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. पण या देवतेची विशिष्ट प्रतिमा सामान्य धार्मिकतेचे प्रतीक म्हणून लोकप्रिय झाली. अशा प्रकारे, हा प्रतीकवाद मान्य असण्या/नसण्यातून हिंदू कोण ते ओळखले वा ठरवले जाऊ लागले.

सध्या या ‘हिंदुत्व’ प्रकल्पाची गुंतागुंत आणखी वाढली आहे. याचा अर्थ आणखीही स्थानिक देवता आणि परंपरांचे आता ‘राष्ट्रीयीकरण’ केले जाऊ शकते. वेगवेगळ्या प्रथा आणि देवतांचे स्थानिक महत्त्व आणि स्वायत्तता मान्य करण्याऐवजी, त्यांचे सुलभीकरण, एकसाचीकरण करणारे कथानक रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून प्रथापरंपरांचे अभूतपूर्व एकजिनसीकरण केले जात आहे. ते त्या परंपरांना त्यांच्या स्थानिक अर्थांपासून आणि संदर्भांपासून विलग करते, त्यांचे हिंदू धर्माच्या प्रादेशिक ‘उपशाखां’मध्ये रूपांतर करते आणि हिंदूंच्या नवीन, अखिल भारतीय कल्पनेची उभारणी आणखी सोपी करते.

हेही वाचा : न्याय की देवाचा कौल?

या सगळ्याला यश मिळाल्यास हिंदू म्हणजे कोणतीही स्थानिक वैशिष्ट्ये नसलेला, कोणतेही वैविध्य नसलेला एकजिनसी असा एक समाज, ही कल्पना घट्ट रुजू शकते. हा समज एकदा का सार्वत्रिक झाला की, तो मान्य नसणाऱ्यांना वेगळे काढणे सोपे ठरेल. अर्थात इतपत यश हीदेखील साधीसुधी गोष्ट नाही. निवडणुकीसाठी हिंदूंचा एक गट तयार करण्यापेक्षा, हिंदू म्हणजे काय ही कल्पनाच बदलण्यातून प्रादेशिक हिंदुत्वाला अखिल हिंदू संकल्पनेशी जोडणे, असे या गुंतागुंतीच्या प्रकल्पाचे वर्णन करता येईल.

संपूर्ण सामाजिक अवकाश चपळपणे काबीज करण्याची कामगिरी, हे संघाचे दुसरे यश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच केवळ धार्मिक, सांस्कृतिक किंवा राजकीय क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता. खरेतर तो सगळीकडेच होता. सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संघाने स्वत:च्या समांतर संघटना स्थापन केल्या. त्याचबरोबर, सगळीकडे आपले सहानुभूतीदार आणि समर्थक निर्माण होतील याचीही काळजी घेतली. आधीच्या नेत्यांनी संघाचा विचार सामाजिक विश्वात विकसित होईल यासाठी प्रयत्न केले. संधी मिळेल तेव्हा हा विचार आधीच्या सामाजिक संघटनांना बाजूला सारून त्यांची जागा घेईल, अशी धारणा त्यामागे असावी. सर्व क्षेत्रांमध्ये संघविचारांचे समर्थक असण्याचा अर्थ असा होतो की त्यांच्यामार्फत संघविचार मुख्य प्रवाहात प्रवेश करत राहील आणि त्याला हळूहळू वैधता प्राप्त होईल.

अशा प्रकारे एकीकडे काँग्रेसी राजकारणी, न्यायमूर्ती, नोकरशहा आणि माध्यमे, या सर्वांमध्ये संघाबद्दल सहानुभूती बाळगणारे लोक वावरत राहिलेच पण शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वत:ची माध्यमे, थिंक टँक, शैक्षणिक संस्था, बँका, प्रशिक्षण केंद्रे यांद्वारे पर्यायी सामाजिक क्षेत्र कसे तयार होईल हेही पाहिले. संघाच्या ‘मदत आणि सेवा’ कार्याचा बोलबाला नेहमीच केला जातो, पण त्याचबरोबर फारसा गाजावाजा न करता बौद्धिक क्षेत्रातील उभारणी करून आणि वेगवेगळ्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचण्यातून संघविचाराने किती व्यापक प्रमाणात सामाजिक-सांस्कृतिक आक्रमण केले आहे, ते दिसून येते.

आज, संघविचारांना एवढे महत्त्व आले आहे की चित्रपट तारे आणि खेळाडू, वैज्ञानिक वा निवृत्त लष्करी अधिकारी अशांची रीघच विविध हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आज लागलेली दिसते. यात काही नवल नाही; परंतु त्याहून अधिक लक्षणीय बाब म्हणजे, पूर्वीही संघाच्या सेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये, अनेक सामाजिक पातळीवरील महत्त्वाची माणसे या उपक्रमांना एक गोंडस चेहरा देत सामील झाली होतीच. सामाजिक अवकाश व्यापण्याच्या आणि आपले स्थान बळकट करत जाण्याच्या या प्रक्रियेत संघाने कधीकधी विरोधकांनाही आपलेसे करून टाकले.

हेही वाचा : स्पर्धा परीक्षा देणं उत्तमच, पण किती काळ? पुढे काय?

म्हणूनच ‘गांधींवर संघाचा प्रभाव होता’ किंवा ‘आंबेडकर हे हिंदुत्वविचाराला अनुकूलच होते’ अशा भरपूर कथाकहाण्या असतात, जयप्रकाश नारायण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशभक्तीची तरफदारी केल्याचे सांगितले जाते… यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात भाषण देण्यासाठी संघाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना बोलावले जाते. आजन्म काँग्रेसी असलेले एक माजी राष्ट्रपतीदेखील या सगळ्याला कसे भुलले होते, ते सगळ्यांना माहीत आहे. राष्ट्रीय कीर्तीची कोणतीही व्यक्ती – मग ती कधी संघाशी जोडलेली असो की नसो, ती जिवंत असो वा मृत – ती ताबडतोब ‘संघाची’ म्हणून स्वीकारली जाते; कारण अशा स्वीकारामुळे संघाला सामाजिक मान्यता मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधकांनी आजवर या प्रथांची खिल्ली उडवली आहे, परंतु यातूनच संघाला सामाजिक भांडवल मिळाले आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

सामाजिक अवकाश ताब्यात घेण्याचा प्रकल्प आता दुसऱ्या स्तरावर गेलेला आहे. संघाच्या विरोधात असलेल्यांना सामाजिक क्षेत्रातून बाजूला केले जात आहे आणि ती जागा संघ ताब्यात घेत आहे. आजघडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नरेंद्र मोदींशी फारसे चांगले संबंध नसले तरीसुद्धा संघाला सामाजिक क्षेत्रात हातपाय पसरून बस्तान बसवता येण्यासाठी मोदींची कारकीर्द ही संघासाठी सुवर्णसंधीच ठरली आहे. याचे कारण असे की, आता राज्ययंत्रणेच्या आधिपत्याखाली संघप्रणीत हिंदू धर्म हाच अस्सल हिंदू धर्म असल्याची द्वाही संघ फिरवू शकतो आणि सामाजिक अवकाशात अन्य विचारधारा असल्या तरीही त्या साऱ्यांना दुर्लक्षणीय करून आणि प्रसंगी जबरीने बाजूला ढकलून स्वत: समाजाचा चालक आणि धुरीण म्हणून स्थानापन्न होऊ शकतो. शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या संघासाठी धर्म आणि समाज दोहोंचे व्यापक नियंत्रण करणे हे आता अशक्य राहिलेले नाही.

लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत.

suhaspalshikar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashtriya swayamsevak sangh movement after completing 100 years mark css
Show comments