गणेश विसपुतेपानभर किंवा त्याहूनही कमी जागेत लिहिलेले हे २१३ किस्से एका नाटय़प्रेमी शहराचा अंत:स्थ इतिहास मांडतात.. सघन लोकसंख्येने व्यापून राहिलेल्या महानगरांमध्ये स्मृतींचीही घनदाट वस्ती असते. अतीत हे शहरांमध्ये जगतही असतं आणि नाहीसंही होत असतं. एका शहरात एकाच वेळी अनेक शहरं जगत असतात. काही तिथंच जमिनीलगत रुजलेली असतात. तिथल्या माती-पाणी आणि हवेवर तगलेली, तर काही जमिनीपासून उंच तरंगणारी. त्यांचा तिथल्या माती-पाण्याशी फारसा सेंद्रिय संबंध नसतो. ती तरंगती शहरं असतात. त्यातल्या नागरिकांसाठी जगभरात कुठेही अगदी तस्संच जगणं उपलब्ध असतं. सतराव्या शतकाच्या मध्यानंतर हळूहळू वाढत-विस्तारत गेलेलं मुंबई हे असं एक महानगर आहे की त्याच्यासोबत साडेतीनशेहून जास्त वर्षांच्या स्मृतींचं समृद्ध संचित साठलेलं आहे. शहराचा अवकाश हेच अखेरीला सामाजिक- राजकीय- आर्थिक- सांस्कृतिक इतिहासाच्या सगळय़ा घटितांचं मैदान असतं. अशा इतिहासाला आपापल्या पद्धतीनं नोंदवत ठेवणारे, त्याचं मोल जाणणारे बखरकार असतात आणि त्यांच्यामुळेच आपल्याला काळाच्या सातत्याचं सम्यक भान प्राप्त होतं. मुंबईच्या बाबतीत असे लोक सहजपणे आपल्याला आठवतात, त्यात ‘मुंबईचे वर्णन’ लिहिणारे माडगावकर, न. र. फाटक, महिकावतीची बखर संपादित करणारे वि. का. राजवाडे, ‘स्थलकाल’ लिहिणारे अरूण टिकेकर, गिरणगावची कथा लिहिणाऱ्या नीरा आडारकर, बा. वा. गोखले आणि अशी अनेक नावं समोर येतात. नरेश फर्नाडिस यांची बॉम्बे अड्रिफ्ट, बॉम्बे मेरी जान, (जेरी पिंटो यांच्यासोबत), ताजमहाल : फॉक्सट्रॉट ही नावंही आहेत आणि जिम मेसेलॉ याच्यासारखे परदेशी समाजशास्त्रज्ञही या महानगराच्या इतिहास-वर्तमानाचा चिकित्सक आढावा घेताना दिसतात. मुंबई शहराचा सांस्कृतिक इतिहास सांगताना त्या शहराचं मिथक, जादू, कोडं उलगडण्याचा उत्तम प्रयत्न अलीकडे प्रकाशित झालेल्या ‘शहर जो खो गया’ या हिंदी कवी आणि लेखक विजय कुमार यांच्या पुस्तकातही दिसतो. लिहित्या संवेदनशील लेखकांना शहरांचं चेटूक आणि मायालाघव आकर्षित करून घेत असतं. म्हणूनच कवाफीला ‘इथाका’ ही कविता लिहावीशी वाटते आणि ओरहान पामुक ‘इस्तन्बूल : मेमरीज ऑफ अ सिटी’ लिहितो. जोसेफ ब्रॉड्स्की ‘वॉटरमार्क’ आणि झेडी स्मिथ लंडनवरचं ‘एनडब्ल्यू’ लिहिते. ‘मुंबई मर्मिरग्ज : २१३ टायनी टेल्स’ हे रामू रामनाथन यांचं पुस्तक मुंबई महानगरातल्या वेगळय़ा जगाचं दर्शन घडवतं. रामू हे लेखक, नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक, पत्रकार, भाषांतरकर्ते असे बहुमुखी लेखक आहेत. नाटक हा त्यांच्या जिव्हाळय़ाचा भाग आहे. त्यामुळे या पुस्तकात नाटक या सूत्राभोवती गोवलेले किस्से आहेत. या किश्शांचं स्वरूप पान-अर्ध पान.. फार तर दोन पानं इतकंच आहे, पण या बारक्या कानगोष्टींतून विविध विषयांच्या किरकोळ तपशिलांसह त्या त्या विषयाचं मर्म सांगितलेलं आहे. शिवाय प्रत्येक किश्शाला शेवटी ‘ग्रीन रूम गपशप’ म्हणून तळटीपेतल्या गप्पा जोडलेल्या आहेत. त्यात चार-पाच ओळींचं वेगळं विवेचन येतं. या लेखनाचं स्वरूप बरंचसं एडुआडरे गलियानोच्या ‘मिर्स’ किंवा ‘कॅलेन्डर ऑफ ह्यूमन हिस्ट्री’मधील नोंदींसारखं आहे. पण रामू यांच्या या नोंदी अधिक आत्मीय संदर्भानी युक्त आहेत. मुंबईत मराठी, हिंदी, गुजराती आणि हिंदी या चार मुख्य भाषांमध्ये शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेली नाटय़संस्कृती रुजलेली आहे. नाटकाच्या दुनियेतल्या व्यक्ती, घटना, जुनी नाटय़गृहं, नाटकाची नवी ठिकाणं, थिएटरवाल्यांच्या आठवणी, गप्पांचे अड्डे, कोपरे, खाणावळी, रस्त्यांवरचे खाद्यपदार्थ विक्रेते, नाटकाची बीजं, नाटय़ कार्यशाळेतले संवाद, अशा अनेक गोष्टी या किश्शांत येतात. प्रत्येक ठिकाणांमध्ये, व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या स्मृतींतही घडणारं नाटय़ या नोंदींमध्ये अधोरेखित होत जातं. भाषा हासुद्धा रामू रामनाथन यांचा आस्थेचा विषय आहे. त्यांचं मराठीतही सादर झालेलं ‘शब्दांची रोजनिशी’ हे नाटकही त्याच आस्थेतून आणि अस्वस्थतेतून आलेलं आहे. त्यामुळे या पुस्तकाची प्रेरणाच ‘रंगभूमी ही भाषा वाचवण्याची जागा असू शकते’ असं ते सुरुवातीलाच सांगतात. पुस्तकाची मांडणी इंग्रजी अकारविल्हे (ए ते झेडपर्यंत) केली आहे आणि प्रत्येक वर्णाप्रमाणे नावं, ठिकाणं, रंगभूमीचे पडद्यामागचे किस्से, आठवणी, गोष्टी येतात. पारशी थिएटर आणि इंग्रजी-हिंदी नाटकांचं जगही यात असलं तरी रामू रामनाथन मराठी नाटकांच्या दुनियेतही खोलवर भिजलेले-मुरलेले आहेत हे जाणवतं. कारण कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांपासून, के. नारायण काळे, मामा वरेरकर, अमर शेख, अण्णा भाऊ साठे, पठ्ठे बापूराव, गडकरी, विजय तेंडुलकर, एलकुंचवार, डॉ. लागू, अशोक रानडे, सुलभा देशपांडे, भक्ती बर्वे, गंगाराम गवाणकर, राम बापट, गो. पु. देशपांडे, सतीश आळेकर, प्रेमानंद गज्वी, जयंत पवार, शफाअत खान, रत्नाकर मतकरी, राजीव नाईक, रामदास भटकळ, अरुण काकडे, दामू केंकरे, मच्छिन्द्र कांबळी, नारायण सुर्वे अशा अनेक मराठी नाटय़कर्मी आणि लेखकांचे किस्से पुस्तकात आधिक्यानं दिसतात. याशिवाय सत्यदेव दुबे, संजना कपूर, आगा हश्र कश्मिरी, जेनिफर कपूर, नादिरा बब्बर, पर्ल पदमसी, इब्राहिम अल्काझी, जावेद सिद्दीकी, बादल सरकार, वायको मोहम्मद बशीर, बी व्ही कारंथ या अन्य भाषी नाटय़कर्मीविषयीच्याही आत्मीय नोंदी आहेत. स्वातंत्र्यापूर्वी नाटकातून छुप्या पद्धतीनं लोकजागरण कसं केलं जाई, टिळकांना उत्तरायुष्यात अकबरोत्सव करावासा वाटत होता, साहित्य संघाचं नाटय़गृह बापूराव नाईकांच्या आराखडय़ानुसार बनवलं गेलं, राजीव नाईकांना ‘ऐन वसंतात अध्र्या रात्री’साठी चंदावरकरांकडूनच संगीत करवून घ्यायचं होतं असे अनेक रोचक किस्से पानापानांवर वाचता येतात. मामा वरेरकरांनी साहित्य संघाच्या नाटय़ महोत्सवात पठ्ठे बापूरावांचा प्रयोग ठेवण्याविषयी सुचवलं आणि ते तयारही झाले होते. त्यात बापूराव नाईक, पठ्ठे बापूराव आणि स्वत: मामाही असतील असं एक दृश्यही लिहिलं गेलं होतं, जे प्रत्यक्षात आलं नाही असा एक किस्सा आहे. त्याचप्रमाणे रामदास भटकळांनी अल्काझींची ओळख मामांशी करून दिली आणि नंतर मामांनी एनएसडीच्या संचालकपदासाठी नेहरूंना अल्काझींचं नाव सुचवलं होतं अशी माहिती रामू देतात. हे खरं असावं; कारण पुण्यात अल्काझींना तन्वीर सन्मान मिळाला, तेव्हा त्यांनी जाहीर भाषणात रामदास भटकळांचे आभार मानले होते. १८६७-१९१५ या सुमारे पन्नास वर्षांत शेक्सपिअरच्या नाटकांची ६५ रूपांतरं मुंबईत सादर झाली. त्यात हॅम्लेटचं ‘विकारविलसित’ हे खरं तर रूपांतराऐवजी भाषांतरच करायला हवं होतं हे आगरकरांनाही मान्य होतं. पण ते तुरुंगात होते आणि त्यांना पैशाची गरज होती तसेच नारायण बापुजी कानिटकरांनी १८८२ साली ‘रोमिओ अॅण्ड ज्युलिएट’चं ‘शशिकला रत्नपाल’ करताना ते सुखान्त करून टाकलं. ही सगळी नाटकं मराठीत आली होती. तर आगा हश्र कश्मिरींनी त्यांच्या हॅम्लेटमध्ये गट्र्रूडला वाइनऐवजी (भावना दुखावतील म्हणून-) दुधातल्या विषानं मरायला लावलं असे भन्नाट किस्से वाचायला मिळतात. घाशीराम जर्मनीला जाऊ देणार नाही अशी बाळ ठाकरेंनी भूमिका घेतली होती. पुण्याहून नाटय़संचाला मुंबईच्या विमानतळावर येऊच न देण्याचा सगळा प्लॅन शिवसेनेनं केला होता. तेव्हा शरद पवारांनी सगळय़ा कलावंतांना पुण्यातून एअरलिफ्ट करून मुंबईत आणलं आणि परस्पर बर्लिनला जाण्याचा मार्ग मोकळा केला हा किस्सा आता सर्वज्ञात आहे, त्याचा उल्लेखही एका नोंदीत आहे. मतकरींना ‘लोककथा ७८’, एलकुंचवारांना ‘प्रतिबिंब’, स्वत: लेखकाला ‘महादेवभाई’ कसं सुचलं, आळेकरांना ‘बेगम बर्वे’ कसं सापडलं याचेही रंजक किस्से आपल्याला सापडतात. आणीबाणीतलं जनांदोलन आणि मराठवाडय़ात दलितांवर झालेले अत्याचार आणि कष्टकरी संघटनेनं त्याविरुद्ध उठवलेला आवाज यादरम्यान एक पॅम्फ्लेट हातात येतं आणि मतकरींना ‘लोककथा -७८’ लिहावंसं वाटतं असं सांगून तळटिपेतल्या गप्पांत ते म्हणतात, तेव्हाची २१ महिन्यांची घोषित आणीबाणी होती, पण आताच्या (दहा वर्षांच्या) अघोषित आणीबाणीत कुणालाही नाटक का लिहावंसं वाटलं नाही? मुंबईतला कुठलाही लहानसा भाग घेतला की त्यात वसाहती कशा तयार होत गेल्या याचं उदाहरण देताना ते मनोहर श्याम जोशींच्या ‘कुरु कुरु स्वाहा’चं वैशिष्टय़ सांगून कार्यशाळेतल्या विद्यार्थ्यांना मस्जिद बंदरच्या भागातून हिंडवतात. एका कच्छी वसाहतीत मग लोहाणा, ओसवाल, भाटिया, खत्री, खोजा, मेमन, मोपले, ज्यू, नागोरी, माथाडी, कुणबी, दलित कसे वसत गेले हे दाखवतात आणि जोशींच्याच ‘हमज़ाद’ या कथेतल्या फिल्ममेकर्स, दलाल, वेश्या, बायकांची अदलाबदल करणारे अशा विद्रूप अधोविश्वाचंही दर्शन घडवतात. मुंबईतल्या चार भाषांमधल्या नाटय़विश्वाची उलाढाल २०१६ पूर्वी महिन्याला २० कोटी होती. पंधराशे प्रयोग होत. ही संख्या न्यू यॉर्क, लंडन आणि बर्लिनमध्ये होणाऱ्या प्रयोगांपेक्षाही जास्त आहे. पण नोटाबंदीनंतर ती १५ कोटी आणि जीएसटी कायद्यानंतर निम्मी झाली हेही ते निदर्शनास आणून देतात. कर्टन कॉल म्हणून अखेरच्या नोंदीत त्यांनी एक आठवण सांगितली आहे. पाब्लो नेरुदा मुंबईत आले तेव्हा नेहमीच्या पाहुण्यांना कंटाळून ते म्हणाले, मला खरा कवी पाहायचा आहे. मग त्यांना शाहीर अमरशेखांची भेट करून देण्यात आली. अमरशेखांनी खडय़ा आवाजात नेरुदाला पोवाडा गाऊन दाखवला. एका कॉम्रेडला दुसऱ्या कॉम्रेडची भाषा कळली. नेरुदा मनापासून खूश झाला. रामू रामनाथन यांचं हे पुस्तक मुंबईतल्या सांस्कृतिक जगाची बखर आहे. त्यात नितळपणा आहे, वाचनीयता आहे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनाचे सल्ले आहेत. कोणतंही पान उघडून कुठल्याही क्रमानं हे वाचता येण्याची सोय आहे. ते करताना लेखकाला आपल्या क्षेत्रातल्या इतिहास-भूगोलाचे अक्ष पक्के माहीत असल्यानं प्रामाणिकताही आहे. आपण नाटय़कर्मी म्हणवत असू तर त्यातलं सगळं जग इतिहास-भूगोलासकट आपल्याला माहीत असायला हवं असा लेखकाचा आग्रहच आहे. ‘शहरातली सात किंवा सत्तर आश्र्चय तुम्हाला आल्हादित करत नसतात, तर तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांना ते शहर उत्तरं पुरवतं यात तुम्हाला जास्त आनंद मिळतो’ असं इटालो काल्विनोनं त्याच्या ‘इन्व्हिजिबल सिटीज’मध्ये म्हणून ठेवलंय. ‘मुंबई मर्मिरग्ज’ अशा अनेक प्रश्नांची कुलपं उघडतं! ‘मुंबई मर्मिरग्ज’ लेखक : रामू रामनाथन, प्रकाशक : मणिपाल युनिव्हर्सल प्रेस पृष्ठे : २२४ ; किंमत : ६४० रु.