जॉर्ज ऑर्वेलच्या ‘ॲनिमल फॉर्म’मधील ‘मानव’ हा असा एकमेव प्राणी आहे की तो स्वतः काहीही निर्माण करीत नाही, पण सर्व ‘स्वाहा’ मात्र करतो, या विधानाची सत्यता पटू लागण्याच्या अवस्थेला आपण म्हणजे सगळा मानवी समाजच आलेला आहे, असे दिसते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे का झाले असेल? आपल्याला जगण्यापासून नेमके काय हवे आहे, मुळात आपण का जगतो याचा विचार आपण करतो का? तो तसा केला असता तर कसे जगायचे हे समजले असते का? आजचा माणूस खरेतर ‘ह्युमॅनिटी’च्या प्रगत पातळीवर आज जगत आहे. असे असताना त्याला इतके असमाधान, इतका हव्यास का वाटतो आहे?

हेही वाचा – आजकाल ज्याच्या कानात ‘शेंगदाणा’, त्यालाच मिळते सरकारी नोकरी?

शतकानुशतके कमालीचा पारमार्थिक असलेला समाज २०-२५ वर्षांत कमालीचा ऐहिक विचारांचा झाला, कोणताही विधिनिषेध न बाळगता फक्त ऐहिक सुखांच्या मागे लागला आणि ऐहिक सुखांच्या प्राप्तीसाठी अर्थार्जनाची एकमेव भाषा समजून घेऊ लागला. हा टोकाचा बदल त्याच्या मानसिकतेत झालेल्या बदलाचाच परिणाम, हे तर उघड दिसत आहे. अन्यथा ज्या मध्यमवर्गाने आपल्या नैतिक मूल्यांची जपवणूक नेहमीच शिरोधार्थ मानली तो मध्यमवर्ग ‘मग त्यात काय?’, ‘सारेच भ्रष्टाचार करतात’ असे भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ म्हणू लागला. याचे स्पष्टीकरण कसे करता येईल? मोठा भ्रष्टाचार करून करूनच ही धनिक मंडळी साव म्हणून समाजात मिरवतात. त्यांचे कोणी वाकडे करते का, असा सूर मध्यमवर्ग काढू लागला. जुनी मूल्ये मोडीत निघाल्याचे हे लक्षण.

विचार-आचारापासून विभक्त झालेला समाज भावनिक वा अन्य प्रकारच्या विघटनाकडे जातो, हे वास्तव आहे. आजघडीला समाजनेत्यांच्या आचारात, विचारात अंतर पडले आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे आम नागरिकांच्या आचार-विचारांतील तफावत वाढू लागली आहे. धार्मिक कृत्ये मनापासून करणारे व्यावहारिक क्षेत्रात लबाडी व अप्रामाणिकपणा करतात. या जन्मातच, मौजमजा करून घेतलेली बरी, हाच चार्वाकी विचार समाजधारणेत पक्का होत चालला आहे.

पारंपरिक विचारांपासून मध्यमवर्ग दूर गेला, त्याने ऐहिक विचारांना कवटाळले, म्हणून समाजाचे भावनिक विघटन सुरू झाले आहे. मध्यमवर्ग तद्दन स्वार्थी बनला, म्हणून त्याचे पडसाद सर्वच क्षेत्रात उमटले आहेत. राजकारणापासून मध्यमवर्ग अलिप्त राहू लागला आहे, आपल्यापेक्षा उच्च वर्गाचे अनुकरण करू लागला आहे. उच्च वर्गाचा उर्मटपणा येणे व कनिष्ठ वर्गाबाबत अलिप्तता वाढणे यामुळे सामाजिक विघटनाची भावना वाढीस लागली आहे.

समाजोन्नतीचे प्रयत्न सोडून केवळ व्यक्तिगत लाभासाठी आपला समाज प्रयत्नशील झाला. समाजातील भावनिक व इतर ताणतणाव कमी करण्याची जबाबदारी ही समाजधुरीणांची. पण ते त्यापासून परावृत्त झाले. टोकाची वैचारिक भूमिका घेत सामाजिक क्रांतीचे नारे द्यायचे; पण वागायचे मात्र सर्वसामान्यांसारखेच असे त्यांच्याबाबतीत होऊ लागले. विचार आणि आचार एकमेकांच्या उलट यामुळे त्यांना मान मिळेनासा झाला.

हेही वाचा – सिंहांच्या अधिवासात चित्त्यांचे मृत्यू

राजकीय नेत्यांच्या नव्या पिढ्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणासाठी अप्रबुद्ध समाजाला वापरण्यास आरंभ केला. परिणामी गतकालातील समाजकाळ विस्मृतीत जाऊ लागले. विचार पुरोगामी होत गेले पण कृती पुरोगामी होईना. ज्याचे प्रबोधन झाले होते अशांच्या कुटुंबांनी जणू समाजाशी आपला संबंधच नाही असा आर्विभाव आणला. राजकीय, सामाजिक बदल प्रक्रियेत सामील होण्याचे टाळले. आपण आपले कुटुंब, स्नेही, स्वजातीय एवढ्यांभोवती अदृश्य असे संरक्षक कडे तयार केले. उर्वरित समाजातील घडामोडींबद्दल पूर्णपणे औदासीन्य बाळगले. जणू या समाजाशी आपले काही देणे-घेणेच नाही. आपल्या देशाची सर्वच आघाड्यांवर पडझड होत असताना अन्य प्रगत देशांकडे कूच करून तेथे आपले बस्तान बसविण्याचे धाडसही काही मंडळींनी केले. सुशिक्षित आणि प्रशिक्षित प्रबुद्धांनी आपल्या मेहनतीचे फळ आपल्या राष्ट्राला चाखायला न देणे हे आपल्या मातृभूमीचे एका अर्थाने नुकसान आहे, असे मातृभूमी सहजासहजी सोडून जाणाऱ्यांना वाटत नाही आणि ते ती सोडून चालल्याचे दुःख इतरांनाही वाटत नाही.

हे सगळे असेच चालणार की कधीतरी बदलेल? नक्कीच बदलेल.

अखिल समाजाचा कल बदलेल, केवळ आर्थिक यशावर यशस्विता मोजण्याचा निकष बदलेल, त्यावेळी भ्रष्टाचारापासून स्वतःला वाचविणाऱ्यांची संख्याही वाढू लागेल. पारमार्थिकता व ऐहिकता यांचा सुवर्णमध्ये गाठू शकलेला उद्याचा समाज कदाचित अधिक संतुलित असण्याची शक्यता आहे. अशा संतुलीत समाजाचे स्वप्न दाखविणारी समाजहितचिंतक मंडळी आज आपल्याला हवी आहेत. ती आज समाजात नाहीत, असे नाही. पण त्याचा आवाज आज क्षीण झाला आहे.

vilasdeshpande1952@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The middle class moved away from traditional ideas he accepted worldly thoughts hence the emotional disintegration of the society has started ssb
Show comments