आपल्या देशातील सद्यःस्थिती पाहता आपल्या राज्यव्यवस्थेत आणि आपल्या समाजव्यवस्थेत कशी सुधारणा केली जाऊ शकते? असा प्रश्न माझ्या मनात सध्या घोळतो आहे. या प्रश्नाचा पाठलाग करण्याचा मी जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळी त्याचे उत्तर शब्दांचा अचूक वापर करण्यात ते सापडावे असे मला वाटते.

म्हणजे असे की, आपण जेव्हा ‘आई’ म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ ‘आईच’ व्हायला हवा. ‘आई’ या शब्दाच्या उच्चाराबरोबर तिने मला दिलेला जन्म, माझे केलेले पालनपोषण, स्वतः अर्धपोटी राहून मला पोटभर भरविणे आणि तिने मला सुसंस्कारित करून घडविले, मला मोठे केले, या देशाचा नागरिक म्हणवण्यास पात्र केले, हे सारे संदर्भ ‘आई’ या शब्दाबरोबर चिटकून यायला हवेत. ज्यावेळी योग्य शब्द अचूक अर्थांच्या विभिन्न छटा घेऊन प्रकट होतो तेव्हा त्या शब्दाचे मोलही खरे असणारच! अन् या गोष्टीची आवश्यकता सध्याच्या वातावरणात यासाठी आहे की, आपल्यावर विदेशी भाषा व संस्कृतीचा घट्ट ठसा उमटू पाहतो आहे. किंबहुना तो तसा उमटलेला आहे… त्यातून निर्माण होत असलेले सांसदीय लोकशाहीचे प्रात्यक्षिक चित्रवाणी वाहिन्यांवरून आपल्याला दिसते आहे. विदेशी भाषेला, सभ्यतेला अन् संस्कृतीला आपण योग्य प्रकारे ग्रहणही करू शकत नाही अन् त्याचा उपयोगही आपल्याला नीट करता येत नाही, अशी आज आपली अवस्था झाली आहे. खरे तर ही दुर्लक्षित करण्यासारखी छोटी समस्या नाही. ही समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील लोकांना परस्परांमध्ये सामंजस्य राखणे गरजेचे झाले आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याला ब्रिटिशांशी संघर्ष करावा लागला होता. झुंझावे लागले होते. आज स्वतःलाच स्वतःशी, आपल्या माणसांशी झुंजण्याची आपल्यावर वेळ आली आहे.

आणखी वाचा-पुतळे कशासाठी? कुणासाठी?

ख्यातनाम कवी, विचारवंत मैथिलीशरण ह्यांच्या एका कवितेचे या ठिकाणी स्मरण होते, ते म्हणतात, “हम कौन थे, क्या हो गए है और क्या होंगे अभी। आओ विचारें यह समस्या आज हम मिलकर सभी।।” सगळ्यांनी मिळून विचार करण्यासाठी लोकसभा/ राज्यसभा/ विधानसभा या जागा आपल्याला उपलब्ध आहेत. देशाच्या/ राज्याच्या कारभाराला दिशा देण्यासाठीच्या सभा येथे होत असतात. सभा म्हटल्या की त्या पाठोपाठ सभ्यता येणारच! मुद्दा असा आहे की या सभेत जे सभ्य लोक बसतात त्यांनी आपापसात कसा व्यवहार करावा ते तर आपल्याला संस्कृतीच्या माध्यमातूनच ठरवता येणार ना! ही संस्कृती आपल्याला आपल्या परस्परांमधील व्यवहार कसा असावा, आपली इतरांबाबतची वर्तवणूक कशी असावी हे शिकवत असते.

ही संस्कृती असे माणारी आहे की, कोणी दुसराच आहे आणि मोठ्यातला मोठा पुढारी हा त्या निधिपतीचा प्रतिनिधी तेवढा आहे. प्रभू राम निधिपती होते आणि भरत त्यांचा प्रतिनिधी. भरत रामाच्या वतीने म्हणजे प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार चालवत होता. राम जेव्हा राजा झाला तेव्हा त्याने रामेश्वरला निधिपती बनविले अन् स्वतः मात्र ते रामेश्वरचे प्रतिनिधी झाले. आजच्या संदर्भात या कथेचा विचार करायचा झाल्यास; समजा आपण रामेश्वर मानले नाही, परमेश्वराचे अस्तित्वही नाकारले, तरी एक गोष्ट खरी आहे की, ‘भारत’ हाच निधिपती आहे आणि इथे राहणारे प्रत्येक नागरिक हे आपआपल्या क्षेत्रात त्या निधिपतीचे प्रतिनिधीमात्र आहेत. आपण निधिपती नाही. जोपर्यंत संसदेमधील जनतेच्या प्रतिनिधींमध्ये हा भाव जागृत होणार नाही तोपर्यंत त्यांना आपल्या संस्कृतीचे खरे स्वरूप समजले नाही असे म्हणावे लागेल. मंदिराच्या पायरीवर बसण्यातील भाव आपण हरवून बसलो आहोत. या भावाची जननी आपली संस्कृती आहे. ज्यावेळी सभासदस्य सभ्यतेच्या आचरणातून संस्कृतीचे दर्शन घडवतील तेव्हाच ‘सभ्यता’ डोळ्यांत भरते.

आणखी वाचा-आर्थिक उन्नती म्हणजे सामाजिक उन्नती नव्हे

भारताला ‘निधिपती’ मानणे मान्य असेल, तर जे विद्येच्या प्रांतात प्रकांड विद्वान आहेत त्यांना आपण विद्यानिधीचा प्रतिनिधी मानू. जे तंत्रज्ञान-विज्ञान, ललितकला, साहित्यशास्त्र, पर्यावरण, कृषी, आदी क्षेत्रांत पारंगत आहेत ते केवळ आपापल्या क्षेत्रांचेच नव्हे तर ते ज्या देशात राहतात त्या देशाचे प्रतिनिधी ठरतात. प्रतिनिधी असण्याचा भावच जेव्हा सभासद आपल्यातून आज गमावून बसण्याची चिन्हे दिसतात, तेव्हा त्यांना सुसंस्कृत तरी कसे ठरविता येणार! एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करण्यास ऊत आलेल्या या काळात आपल्याला जर योग्य दिशा गवसली नाही तर या देशाला जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल, त्यातून मग देशाची सगळीच घडी विस्कटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जनतेचा हा विक्षोभ रोखायचा असेल तर वर्तमान सांसदीय संक्रमणाची दखल घेणे निकडीचे ठरते. हे सांसदीय संक्रमण, हा सांसदीय धुमाकूळ शमविण्यासाठी विधायक चर्चा आणि जनताभिमुख धोरणांचा/योजनांचा पुरस्कार केला पाहिजे. नुसती धोरणे आखून हे भागायचे नाही तर त्या धोरणांना/योजनांना राबवून त्याचा प्रत्यक्ष लाभ होत असलेला लोकांना दिसायला हवा.

तसे झाले नाही, तर काय होते? याचेही प्रत्यंतर सभोवताली आहेच. ज्या मध्यमवर्गाने स्वातंत्र्योत्तर कालखंडात हा देश उभारणीत अविश्रांत कष्ट उपसले होते, तोच मध्यमवर्ग आज आक्रसून इतका संकुचित झाला आहे की, आपली जमीन, आपले बांधव, आपल्या परंपरा-संस्कृती आणि आपला इतिहास यापासून तुटत चालला आहे. आपण आपल्याच देशात विदेशी झालो आहोत. असे व्हायला नको. एकदा पुन्हा एकत्र येऊन या समस्येवर चिंतन व्हायला पाहिजे. यावर तोडगा निघायला हवा.

आणखी वाचा-आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?

रवींद्रनाथ टागोरांनी एक स्वप्न पाहिले होते. ‘चित्त जेथ भयशून्य, उच्च जेथ शिर’ रवींद्रनाथांचे हे स्वप्न पूर्ण व्हायला हवे. या देशात ज्ञानगंगा मुक्त व्हायला हवी. माझ्या घरात, अंगणात माझ्याच घराच्या, अंगणाच्या संकुचित करणाऱ्या भिंती कधीच उभारल्या जाऊ नये, ज्यामुळे आपल्याला क्षुद्रपणाची जाणीव होईल, असे त्यांना वाटत असावे. प्रत्येकाच्या मनात एक नवीन चेतना ऊर्जित व्हावी आणि त्यातून प्रत्येकाला वास्तविकतेचे चित्र स्पष्ट दिसावे, हे त्यांचे स्वप्न होते. अन् हे शक्य होण्यासाठी विशेष जनांना (नेत्यांना) सामान्य जनांविषयीची आत्मीयता वाटायला हवी.

हे होण्यासाठी तरी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन लक्षात घेतले पाहिजे की, आपण निधिपतीचे प्रतिनिधी आहोत. ‘भारत’ हा खरा निधिपती आहे. त्यासाठी असे शिक्षण, अशी संस्कृती आकाराला येण्याची आवश्यकता आहे की, ज्यामुळे वर्तमानातील सांस्कृतिक धुमाकूळ शांत करता येईल. एका नव्या अभियानाच्या दिशेने पडलेले ते पाऊल ठरावे.

लेखक साहित्य व नाट्य समीक्षक आहेत.

vilasdeshpande1952@gmail